Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, मे १४, २०१९

तीन तालुक्यातील 21 सरपंचांनी पाणीटंचाईची सांगितली सत्यस्थिती


  • दुष्काळग्रस्त गावांमध्ये पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्याची दक्षता घ्या
  • मुख्यमंत्र्यांनी साधला सरपंचांसोबत थेट संवाद
  • पिण्याचे पाणी व गुरांना चारा याला सर्वोच्च प्राधान्य

नागपूर दि. 14 : जिल्ह्यातील काटोल, कळमेश्वर व नरखेड या तालुक्यातील 452 गावे दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आली आहेत. दुष्काळी परिस्थितीत पिण्याचे पाणी, गुरांना चारा तसेच गावातच रोजगाराची उपलब्धता यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑडिओ ब्रीजद्वारे सरपंचांशी थेट संवाद साधून दुष्काळी परिस्थितीची वस्तुस्थिती व करावयाच्या उपाययोजनासंदर्भात माहिती घेतली. दुष्काळग्रस्त गावांमध्ये पिण्याचे पाणी सुरळीत सुरु ठेवण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना राबविण्याच्या सूचना यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिल्यात.

पिण्याच्या पाण्यासाठी विद्युत देयकाअभावी पाणीपुरवठा खंडित होवू नये, यासाठी महावितरण कंपनीला 89 लक्ष रुपये देण्यात आले आहे व सर्व नळ पाणीपुरवठ्याच्या योजनांचा पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. या तालुक्यांमध्ये सद्य:स्थितीत एकही चारा छावणी सुरु नाही. जिल्ह्यातील 79 हजार 551 शेतकऱ्यांना 53 कोटी 98 लक्ष रुपयांचे दुष्काळ अनुदान वाटप करण्यात आले असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली.

शेतकरी पीकविमा योजनेंतर्गत जिल्ह्यात 46 हजार 695 शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. सदर हंगामात नुकसान भरपाईपोटी 9 कोटी 37 लक्ष रुपये इतकी रक्कम अदा करण्यात येणार असून त्यापैकी 7 कोटी 22 लक्ष रुपये इतकी रक्कम 5 हजार 356 पात्र शेतकऱ्यांना अदा करण्यात आली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान येाजनेंतर्गत जिल्ह्यातील 80 हजार 551 शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात आली आहे. त्यापैकी पात्र शेतकऱ्यांना दोन हजार प्रमाणे पहिल्या हप्त्यापोटी 4 कोटी 80 लक्ष इतके अर्थसहाय्य देण्यात आले असून उर्वरित शेतकऱ्यांना लाभ देण्याची कार्यवाही सुरु आहे.

दुष्काळग्रस्त काटोल तालुक्यातील सरपंचांनी गावातील पिण्याच्या पाण्याच्या टंचाईसंदर्भात व त्यावर करावयाच्या उपाययोजनाबाबतही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माहिती दिली. तसेच जनावरांना सुद्धा पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्हावी, याबाबत विनंती केली. श्रीमती मंगला काळबांडे, नितीन गजभिये, विनोद ठाकरे, धनंजय धोटे, प्रवीण अडकिने, संजय डफर, श्रीमती सविता गोतमारे, श्रीमती पूजा रिधोरकर, रेखचंद सावरकर आदी सरपंचांनी गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत असलेल्या तलावातील गाळ काढण्यासोबतच पाणीपुरवठा करणाऱ्या जुन्या जलवाहिन्यांची दुरुस्ती तसेच कायमस्वरुपी पाणीपुरवठा सुरळीत करण्यासंदर्भात सूचना केली असता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हाधिकारी तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांना या योजना प्राधान्याने पूर्ण करण्याचे निर्देश दिलेत.

नरखेड व कळमेश्वर तालुक्यातील सरपंचांनी ‘गाळमुक्त धरण व जलयुक्त शिवार’ या योजनेंतर्गत तलावांचे खोलीकरण त्यासोबतच नदी खोलीकरण करुन बंधारा बांधण्यात आला आहे. या बंधाऱ्यावर विद्युतपंप बसवून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी अशी विनंती केली. गौतम दत्तूजी इंगळे यांनी गावात पाणीपुरवठा करणारी विहीर असून तिला पाणी नसल्यामुळे पर्यायी विहीर अथवा विंधन विहीर करावी, मुख्यमंत्री पेयजल योजनेंतर्गतच्या पाणीपुरवठा योजनेची विशेष दुरुस्ती विजय केशवराव गुंजाळ यांनी केली. तलावाचे खोलीकरण करण्यासाठी तसेच नळ योजनेच्या विशेष दुरुस्तीसाठी निधीच्या माध्यमातून कामे प्राधान्याने व्हावीत, आदी सूचना तसेच पाणीटंचाईसंदर्भात ग्रामस्तरावर सुरु असलेल्या विविध उपक्रमासंदर्भातही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ऑडिओ ब्रीजद्वारे माहिती दिली.

तसेच कळमेश्वर तालुक्यातील उबाळी पाणीपुरवठा व पाणीटंचाई, लिंगा तलाव जलाशयातील पाणीपुरवठा व गाळ काढणे, आष्टीकला पाणीपुरवठा व विहीर खेालीकरण, सावळी बु-पाणीटंचाई व पाण्याची पातळी कमी यावर उपाययोजना करणे, परसोडी वकील येथील पाणीपुरवठा व आडवी बोरवेलबाबत सरपंचांशी मुख्यमंत्र्यांची यावेळी चर्चा झाली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळग्रस्त गावातील सरपंचांसोबत थेट संवाद साधून दुष्काळी परिस्थिती अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या विहिर योजनासंदर्भात संवाद साधताना सरपंचांना दुष्काळ निवारणासाठी तसेच पिण्याच्या पाणी टंचाईसंदर्भात सूचना करण्यासाठी व्हॉट्स ॲपवर सुद्धा सरपंच सूचना करु शकतात. त्यांच्या सूचनांची दखल घेऊन ती कामे प्राधान्याने पूर्ण करण्यात येतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सरपंचांना दिली. मुख्यमंत्री आपल्या सोबत थेट संवाद साधून गावातील दुष्काळासंदर्भात तसेच पिण्याच्या पाण्यासंदर्भात माहिती घेत असल्याबद्दल सरपंचांनी विशेष आनंद व्यक्त केला.

दुष्काळी तालुक्यातील सरपंचांसोबत ऑडिओ ब्रीज संवादात जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, प्रभारी मुख्य कार्यपालन अधिकारी अंकुश केदार, उपजिल्हाधिकारी श्रीमती सुजाता गंधे, निवासी उपजिल्हाधिकारी, रविंद्र खजांजी, उप मुख्य कार्यपालन अधिकारी राजेंद्र भुयार, जिल्हा कृषी अधीक्षक मिलिंद शेंडे तसेच जलसंपदा, ग्रामीण पाणीपुरवठा, रोजगार हमी योजना, कृषी, फलोत्पादन, महावितरण आदी विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरपंचांसोबत संवाद साधताना ग्रामीण पाणीपुरवठा तसेच रोजगारांसदर्भात दिलेल्या निर्देशांचे पालन करण्याच्या सूचना यावेळी करण्यात आल्या.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.