वेणा जलाशयाच्या पाईप लाईनमध्ये गळती
वाडी ( नागपूर )/अरुण कराळे :
पाणी आणि वाणी जपून वापरा कारण वाणीमुळे तुमचा वर्तमानकाळ व पाण्यामुळे तुमचा भविष्यकाळ
सुरक्षीत राहणार आहे. वाडी व परिसरातील नागरीकांना महाराष्ट्र जीवन प्राधीकरण , वेणा जलाशय द्वारे पाण्याचा पुरवठा सुरू आहे .परंतु पुरवठा करणारी पाईपलाइनला जागोजागी गळती लागल्यामुळे लाखो लिटर पाणी नाल्यात जात आहे .
एकीकडे पाण्याची टंचाई सुरु आहे त्यामुळे वाडीतील सत्य साई सोसायटी, इंद्रायणी सोसायटी, हरिओम सोसायटी , गुरुप्रसाद नगर आदी भागात आठ आठ दिवस वेणाचे पाणी येत नाही तर दूसरीकडे वेणा जलाश्याचे लाखो लीटर पाणी नाल्यातून वाया जात आहे.डॉ.आंबेडकर नगरमधील नागरिकांना पाणी मिळविण्यासाठी जिवाचा आटापिटा करावा लागत आहे . तर दुसरीकडे हेच पाणी रस्त्याने वाहत आहे . वाडी परिसरात प्रत्येक ठिकाणी नव्याने पाईपलाईनचे काम सुरू आहे.मजीप्राच्या बील भरण्याच्या केंद्रा समोर जूनी पाईपलाईनला गेल्या दोन महिन्यापासून गळती लागल्यामुळे लाखो लीटर पाण्याची नासाडी होत आहे.
या रस्त्यावरून दररोज मजीप्राचे अधिकारी,कर्मचारी ये-जा करतात त्यांना पाणी वाहत आहे हे दिसत नसेल का ? असा प्रश्न आवासून उभा आहे .डॉ .आंबेडकर नगरमधील नागरीक ३ कि .मी. अंतरावर असलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधीकरण(वेणा) च्या केंद्रातून रोज पाणी नेतात व पाण्याचा उपयोग करतात. तसेच इतर नगर मधील रहीवासी सूद्धा महाराष्ट्र जीवन प्राधीकरण(वेणा) च्या केंद्रातून पाणी नेतात . वेळेवर निधी उपलब्ध करून न दिल्याने वाडीतील नवीन पाइपलाइन टाकण्याचे काम अजून पर्यंत पूर्ण झाले नाही.त्यामुळे गेले वीस ते तीस वर्षापासूनची जुनी पाईपलाईन जीर्ण अवस्थेत आहे . आणि त्यामधून सतत दोन वर्षापासून मोठ्या प्रमाणात गळती लागलेली आहे . जर नवीन पाइपलाइन टाकण्याचे काम वेळेवर पूर्ण झाले असते तर पाण्याची नासाडी थांबविता आली असती.मात्र याकडे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण तसेच संबंधित विभागाने दुर्लक्ष असल्यामुळे आज वाडीसह इतर क्षेत्रामध्येही पाण्याची समस्या निर्माण झाली आहे.
यासंदर्भात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे उपशाखा अभियंता नरेश शनवारे यांना विचारले असता,त्यांनी सांगितले की सदर ठिकाणी नवीन पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू आहे, आणि जुन्या पाईपलाईन मधून गळती असल्यामुळे पाणी वाहून जात आहे.तेव्हा लवकरात लवकर पाणी बंद करण्यात येईल .वेणा जलाशयामध्ये आजच्या स्थितीत फक्त ५ टक्के जलसाठा आहे. येणाऱ्या काळात पाऊस जर वेळेवर आला नाही तर मे आणि जून या महिन्यात पाण्याची स्थिती गंभीर होणार आहे. असेही त्यांनी सांगीतले .