Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, नोव्हेंबर १५, २०१७

राज्यात कायद्याचे राज्य आहे का?; शरद पवारांची सरकारवर टीका

गडचिरोली – सांगलीतील अनिकेत कोथळे हत्या प्रकरण तर खूपच धक्कादायक आहे, आजच्या वर्तमानपत्रामध्ये नागपूरमध्येही  काही हत्या झाल्याचे वाचले. या सर्व गोष्टी पाहता या राज्यात कायद्याचे राज्य आहे का, असा प्रश्न उपस्थित होत असल्याचे शरद पवार यांनी म्हंटले आहे.

शरद पवार यांच्या चार दिवसांच्या विदर्भ दौऱ्याला आजपासून गडचिरोली येथून सुरुवात झाली. त्यावेळी ते  पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. राज्यात अशा घटना घडत असतांना त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री म्हणून नैतिक जबाबदारी घेऊन प्रतिक्रिया देणे गरजेचे होते. पण त्यांच्याकडून एकही प्रतिक्रिया पाहिली नाही, असे म्हणत पवारांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.

देशाचा विकासदर खाली आला आहे . खरे तर देशाचा विकासदर ८ टक्क्यांच्या वर असायला हवा. पण तसे न झाल्यामुळे वास्तव लपवण्यासाठी विकास दाखवण्याचे निकष बदलण्यात येत आहेत. मी लाभार्थी हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. या जाहिरातीमध्ये फार गाजावाजा करण्यात आला आहे. पण प्रत्यक्षात मात्र कर्जमाफीचे किती लाभार्थी आहेत, हे अदयापही कळलेले नाही. तसेच गोहत्याप्रकरणी केंद्र सरकारने संवेदनशील राहायला हवे. कालही राजस्थानमध्ये एक हत्या घडली आहे. केंद्राने राज्यांना सूचना देऊन या घटना थांबवायला हव्यात, असा सल्ला पवार यांनी दिला.
गडचिरोलीबाबत बोलताना शरद पवार म्हणाले की, हा हैदराबाद आणि महाराष्ट्राला जोडणारा जिल्हा आहे. हा जिल्हा विकास व दळणवळणापासून वंचित राहिला आहे. इथे विकास करायचा असेल तर फक्त पोलीस दल पुरेसे नसून इतर माध्यमातूनही काम केले जाणे गरजेचे आहे. हे माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी ओळखले व तसे प्रयत्न केले. त्यासाठी तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी त्यावेळी स्वत:हून गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्रिपद मागितले होते. गडचिरोलीचा विकास करण्यासाठी पाटील यांच्यासोबत माजी मंत्री अनिल देशमुख यांनीही मंत्रिमंडळात असताना सहकार्य केले. या सरकारनेही असे प्रयत्न करायला हवेत, असेही मत त्यांनी व्यक्त केले.
दरम्यान गुजरातमध्ये भाजपाविरोधी वातावरण आहे. हे चित्र काँग्रेससाठी अनुकूल आहे. आमच्या तिथे दोनच जागा आहेत. या निवडणुकीत काँग्रेससोबत एकत्रपणे लढण्याबाबत आमची चर्चा सुरू असल्याची माहिती यावेळी पवार यांनी दिली.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.