Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, डिसेंबर १५, २०२१

नाणेघाट येथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा कार्यकर्ता मेळावा





चार पंचायत समिती व दोन जिल्हा परिषदेच्या जागा लढविण्याचा निर्धार !
जुन्नर /आनंद कांबळे
घाटघर येथील जीवधन किल्ल्याच्या पायथ्याशी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माकपचे पुणे जिल्हा सचिव ऍड नाथा शिंगाडे होते.

मेळाव्यास ज्येष्ठ कामगार नेते अर्थतज्ञ अजित अभ्यंकर, डॉ महारुद्र डाके,प्रा.डॉ अमोल वाघमारे, विश्वनाथ निगळे, माकप जुन्नर तालुका सचिव गणपत घोडे यांसह कार्यकर्ते, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील पक्षाचे मान्यवर सदस्य उपस्थित होते.

यावेळी बोलताना विश्वनाथ निगळे म्हणाले, पडकई योजनेचे जुन्नर आंबेगाव मिळून तीन कोटी शेतकऱ्यांना मिळवून दिले आहेत. तर रोजगार हमीतून 87 लाख रुपये ची कामे जुन्नर तालुक्यात झाली आहेत. पुढील काळात रोजगार हमी योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रयत्न सुरू आहेत.

आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकांत जनतेचे खरेखुरे प्रश्न राजकीय पक्षांच्या अजेंड्यावर आणणे आणि खोटी आश्वासन देणाऱ्याचे पोलखोल करणे गरजेचे आहे. त्यासाठी लोकहिताचे मुद्दे आणि त्यासाठी काम करणे गरजेचे असल्याचे निगळे म्हणाले.

यावेळी अर्थतज्ञ अजित अभ्यंकर म्हणाले, भ्रष्ट नोकरशाही, तिला पाठीशी घालणारी शासकीय यंत्रणा, ठेकेदारी च्या हिताला प्राधान्य देणारे लोकप्रतिनिधीं आणि विश्वसार्हता गमावलेले भांडवली पक्ष याला केवळ डावे पक्षच पर्याय ठरू शकतात. भाजप, शिवसेनेचे राजकीय जनविरोधी धोरण आणि जातीपातीचे राजकारणावर टीका करताना त्यांनी सर्व जण समाजाने एकोप्याने सामाजिक राजकीय एकजूट घडवून भांडवलशाही जनविरोधी शक्तींचा पाडाव करता येईल असे प्रतिपादन केले.

डॉ.महारुद्र डाके यांनी अस्मितेच्या नावाखाली समाजात फूट पडण्याचे भांडवली पक्षांचे धोरण समोर आणून वंचित घटकांना जात - धर्मासह एकत्र आणण्याची ताकत फक्त लाल बवट्यात असून तोच खरा न्यायचा मार्ग असल्याचे सांगितले.

प्रा .डॉ. अमोल वाघमारे म्हणाले, अनुभव व अभ्यास याच्या आधारे क्रांतिकारक आदिवासी बिरसा मुंडा,राघोजी भांगरे,ब्रिटिश असताना केलेला शशस्र लढा याची तत्कालीन ऐतिहासिक पार्श्वभूमी सांगून लोकशाही काळात स्वतंत्र भारतातील भांडवली व्यवस्थेतील लोकशाही मार्गात त्यांच्या कार्याची आणि प्रतिकांचे महत्व सांगून प्रत्यक्ष निवडणुकीतील सहभागाचे महत्व आणि सर्व कष्टकऱ्यांची एकजूट विशद करून प्रलोभन, आर्थिक आमिषे याला बळी न पडता व जनतेला हक्क मिळवून देण्यासाठी सहभागी करत आपले मुद्दे आणि काम याच्या आधारे व्यक्ती विरोध न करता ठोस धोरणांच्या व प्रश्नांना केंद्रित ठेवून लोकशाही निवडणुका खुल्या दिलाने लढवण्याचा अनुभव आणि अभ्यास याद्वारे पुढे नेण्याचे आव्हान त्यांनी केले.

या मेळाव्यात कष्टकरी-शेतकरी-आदिवासी-दलित-विद्यार्थी-महिला यांच्या हक्काच्या लढ्यासाठी निर्धाराने निवडणूक लढवण्याचा निर्णय एकमताने घेतला. तसेच जुन्नर तालुक्यातील दोन जिल्हा परिषद व चार पंचायत समितीच्या जागा लढ्याची घोषणा करण्यात आली.

पश्चिम आदिवासी भाग येथील शिक्षण, आरोग्य, सार्वजनिक वाहतूक, रस्ते, पाणी, शेतीसाठी पाणी, रोजगार हमीतुन मजुरी, विजप्रश्न, आरोग्य सुविधा, पेसा कायद्याची अंमलबजावणी यासाठी काम करण्याचे तसेच पूर्व भागात शेतीसाठी पाणी, वाहतूक प्रश्न, रस्ते, विजेचा प्रश्न, शेतमालाला हमीभावाचा प्रश्न, दूध उत्पादक शेतकरी, ऊस उत्पादक शेतकरी यांच्या - शिक्षण - आरोग्य - रोजगार या प्रश्नासाठी लढा तीव्र करण्याचा निर्धार करण्यात आला.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.