निफन्द्रा (प्रतिनिधी)
- मिरची तोडण्यासाठी गेलेले सावली तालुक्यातील 3945 मजूर तेलंगणा राज्यात अडकले असून तेलंगणा राज्याने 3 जूनपर्यंत लॉकडाऊन वाढविल्याने मजुरांना गावाकडे परतता येणार की नाही हा संभ्रम मजूर व नातेवाईकांमध्ये आहे.
सावली तालुक्यात शेतीशिवाय दुसरे मजुरीचे साधन नसल्यामुळे सोयाबीन काढणी, मिरची तोडणी या हंगामी कामांकरिता हजारो मजूर जात असतात. तालुक्यातील हजारो मजूर मिरची तोडणी कामाकरिता तेलंगणा राज्यातील खंमम जिल्ह्यात गेलेले आहेत. देशात लॉकडाऊन लागू झाल्यानंतर आहेत तिथेच अडकून पडले. चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे लक्षात ही बाब आणून दिली व जिल्हाधिकारी चंद्रपूर याना कोठले मजूर तेलंगणा राज्यात आहेत त्यांची माहिती काढण्याचे आदेश दिले. तहसीलदार यांचे आकडेवारीनुसार 3945 मजूर तेलंगणा राज्यात अडकले आहेत. तेलंगणा सरकारने मजुरांची काळजी घेत प्रती व्यक्ती 12 किलो तांदूळ व 500 रुपये मदत दिली. 14 एप्रिल नंतर गावाकडे जाऊ या आशेने मिरची तोडणीचे काम करीत आहेत. मात्र तेलंगणा सरकारने आणखी 3 जूनपर्यंत लॉकडाऊन वाढविल्याने जाता येणार की नाही या संभ्रमावस्थेत असून मजुरांमध्ये असंतोष वाढलेला आहे.
तालुक्यातील अनेक मजुर नियमित संपर्कात आहे. तेलंगणा सरकारकडून 12 किलो तांदूळ व 500 रुपये मदत मजुरांना मिळालेली आहे. वाढीव 3 जूनच्या लॉकडाऊनमुळे मजूर घाबरलेले आहेत मात्र ही बाब पालकमंत्री विजयभाऊ वडेट्टीवार यांचे लक्षात आणून दिली आहे व शासन स्तरावर उपाययोजना सुरू आहेत. तरी नातेवाईकांनी मजुरांना धीर देण्याचे काम करावे.
- विजय कोरेवार
सभापती
पं स सावली