मुंबई-लखीमपुर खीरी हिंसाचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडी सरकारने पुकारलेल्या राज्यव्यापी बंदच्या पार्श्वभूमीवर कडक गस्त घालण्यात येणार आहे . यासाठी एसआरपीएफच्या 3 तुकड्या , 500 होमगार्ड आणि स्थानिक शस्त्रास्त्र युनिटमधील 700 जवान मोक्याच्या ठिकाणी तैनात करण्यात येतील , अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे .
किसान सभेचा महाराष्ट्र बंदला पाठिंबा
संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने सुरू असलेल्या अखिल भारतीय शेतकरी आंदोलनाचा भाग म्हणून उत्तर प्रदेशमध्ये आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाचा समावेश असणाऱ्या वाहन ताफ्याने चिरडून मारले . सबंध देशभर जनतेमध्ये या घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे . विविध पक्ष व संघटनांनी महाराष्ट्रामध्ये या घटनेचा निषेध करण्यासाठी आज (सोमवारी) 11 ऑक्टोबर 2021 रोजी महाराष्ट्र बंदची घोषणा केली आहे . अखिल भारतीय किसान सभेच्या महाराष्ट्र राज्य कौन्सिलने या बंदला सक्रिय पाठिंबा जाहीर केला आहे .