सिंदेवाही/ प्रतिनिधी
तालुक्यातील वाकल या गावात नळ योजनेच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जातो. मात्र, पाणीपुरवठा करणारी वीज मोटार जळाली. त्यामुळे ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर त्या गावात पाणी पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली. या गावातील नागरिक आता थेट नदीच्या पात्रात उतरून चुहा तयार करुन पाणी मिळवीत असल्याची माहिती श्रमिक एल्गारला मिळाली. पाठपुरावा केल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले आणि दोन दिवसात पाणी पुरवठा सुरू केला.
कोरोना या जागतिक महामारीपासून बचाव करण्यासाठी देशभरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्याची पुरेपूर अंमलबजावणी ग्रामीण भागातही होत आहे. नागरिकांचे घराबाहेर पडणे बंद झाले आहे. मात्र, वाकल या गावात उमा नदीच्या पात्रातील पाणीपुरवठा करणारी वीजमोटार अचानक जळाली. या संदर्भातील सर्वप्रथम श्रमिक एल्गारने पुढाकार घेऊन प्रशासनाकङे पाठपुरावा केला. वाकल येथे आठ दिवसापासून बंद असलेला पाणी पुरवठा सुरू झाल्याने गावकऱ्यामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. वाकल हे गाव 1048 लोकसंख्या असलेला गाव असून, 183 वैयक्तिक नळ कनेक्शन आहेत. व सामूहिक नळ गावामध्ये असून मोटार जळाल्याने पिण्याच्या पाण्याचा तुटवडा पडला होता. त्यांना उमा नदीतून पाणी प्यायला आणावे लागत होते. ग्राम पंचायात कमेटीने तातडीने दुरुस्ती करून गावकऱ्यांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले.