चांपा/अनिल पवार:
कोरोना विषाणूच्या पार्श्वभुमीवर शहरी भागासोबतच ग्रामीण भागातही खबरदारीच्या उपाय योजना हाती घेतल्या जात असून उमरेड तालुक्यातील चांप्याच्या गावकऱ्यांनी उमरेड नागपूर महामार्गावर प्रवास करणाऱ्यांना वगळता चांपा गावाच्या सर्व सीमा बंद करण्यात आल्या असून नवीन व्यक्तींना गावात नो एंन्ट्री केली आहे.
चांप्याचे सरपंच अतिश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वेळोवेळी ग्रामपंचायत मार्फत कोरोना विषाणू संदर्भात विविध उपाययोजना केल्या त्यात गावकऱ्यांना घराबाहेर न जाणं, सतत हात धुणे, सॅनीटायझरचा वापर करणे यासह इतर सुचना दिल्या जात आहेत.
उमरेड तालुक्यातील चांपा येथे सुमारे पंधराशे लोकसंख्येचे गाव आहे. गावात कोरोनाच्या पार्श्वभुमीवर ग्रामपंचायत तर्फे खबरदारी घेतली जात आहे. त्यानंतर गावकऱ्यांची आज सकाळी बैठक झाली. यावेळी कोरोनासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजना सांगण्यात आल्या. त्यानंतर गावात नवीन व्यक्तींना प्रवेश बंदी करण्यात आली आहे.
गावातून बाहेरगावी जाणाऱ्या व्यक्तींना ग्रामपंचायतीच्या रजिस्टरला नोंद करूनच बाहेरगावी जायचे आणि परत आल्यानंतर त्याची नोंद करणं बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच गावात प्रवेश करतांना हात धुऊनच प्रवेश करण्याच्या सुचनाही देण्यात आल्या आहेत. कोरोनावर अशा प्रकारची खबरदारी करणारं तालुक्यातील चांपा हे पहिलेच गाव आहे.