मायणी दि.७ ता.खटाव. जि.सातारा(सतीश डोंगरे): "राष्ट्रीय सेवा योजना म्हणजे मानवतेची जोपासना करण्याचे व्यासपीठ आहे. श्रमसंस्काराच्या माध्यमातून समाज सेवेचे मूल्य विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्यासाठी शिबिर महत्त्वाचे असते. ग्राम स्वच्छतेबरोबर मनाची स्वच्छता झाली तर शिबिर यशस्वी झाले, असे म्हणता येईल ", असे प्रतिपादन मायणी भाग शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक दिगंबर पिटके यांनी केले. ते येथील कला, वाणिज्य महाविद्यालयाच्या मौजे गुंडेवाडी (मराठानगर) येथील श्रमसंस्कार शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ. पूनम दादासाहेब निकम होत्या. यावेळी प्राचार्य डॉ. सयाजीराजे मोकाशी, सौ. अाक्काताई निकम, सुभाष निकम, सदाशिव निकम, श्रीरंग उदंडे, सौ. लतिका देशमुख, उपसरपंच श्री संतोष निकम, श्री दत्तात्रय निकम, श्री महादेव निकम, मुख्याध्यापक श्री घोसपुरकर आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी प्रा शिवशंकर माळी यांनी उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक केले. 'स्वच्छ भारत, स्वस्थ भारत' हे चालू वर्षाचे ब्रीद वाक्य आहे. यावेळी कोमल माळी, निलोफर जमादार, वैभव चव्हाण आदींची मनोगते झाली. उपसरपंच श्री संतोष निकम यांनी ग्रामस्थांच्या वतीने संपूर्ण सहकार्य करण्याचे अभिवचन दिले.
सात दिवसाच्या या शिबिरात शनिवार दि. ८ फेब्रुवारी रोजी कैलास सुतार यांचे 'संमोहन आणि अंधश्रद्धा निर्मूलन' या विषयावर व्याख्यान होणार आहे. रविवार दि. ९ फेब्रुवारी रोजी शांतिनाथ मांगले यांचे कथाकथन, तर सोमवार दि. १० फेब्रुवारी रोजी कृषी अधिकारी अरुण जाधव यांचे 'कृषी विषयक शासकीय योजना' या विषयावर व्याख्यान होणार आहे. मंगळवार दिनांक ११ फेब्रुवारी रोजी डॉ. विजया कदम यांचे 'महिला सबलीकरण' या विषयावर व्याख्यान होईल. बुधवार दि. १२ फेब्रुवारी रोजी डॉ. लक्ष्मण जठार यांचे 'स्वच्छ भारत, स्वस्थ भारत' या विषयावर व्याख्यान होईल.
गुरुवार दिनांक 13 फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद सदस्य व मायणी भाग शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन श्री सुरेंद्र गुदगे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिबिराचा समारोप होणार आहे. शिबिरामध्ये दररोज ग्रामस्वच्छता, जलसंधारण व वृक्षारोपणाचे काम केले जाणार आहे. तसेच रक्तदान शिबिर घेण्यात येणार आहे. शिबिराचे संयोजन डॉ. उत्तम टेंबरे व प्राचार्य डॉ. सयाजीराजे मोकाशी यांनी केले आहे.