Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, ऑगस्ट २८, २०२१

नागपूर विद्यापीठात भटक्या विमुक्तांच्या सखोल अभ्यासासाठी अभ्यास केंद्राची स्थापना करणार


📌 उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सावंत यांचे आश्वासन 

📌भटक्या विमुक्तांचे अभ्यासक व शिक्षक नेते श्री मिलिंद वानखेडे यांची मागणी मान्य 

📌 अभ्यास केंद्र सुरु होईस्तोवर पाठपुरावा करणार



नागपूर - राज्यातील भटक्या विमुक्तांच्या सर्वांगीण विकासासाठी व सखोल अभ्यासासाठी रातुम नागपूर विद्यापीठात कर्मवीर दादासाहेब कन्नमवार अभ्यास केंद्र ( Studies Centre to Nagpur University)सुरू करण्यात येईल, असे आश्वासन उच्च तंत्र शिक्षणमंत्री उदय सावंत यांनी भटक्या विमुक्तांचे अभ्यासक व शिक्षक नेते श्री मिलिंद वानखेडे यांना दिले. या संदर्भात आज (ता २८) रविभवन येथे उच्च तंत्र शिक्षण मंत्री ना. सावंत यांना निवेदन सादर करुन हि मागणी रेटून धरली.

आज रविभवनात (२८) उच्च माध्यमिक विभागातील प्राचार्य, प्राध्यापक व शिक्षक संघटनांची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीच्या अध्यक्षस्थानी तंत्र शिक्षण मंत्री उदय सावंत तर प्रमुख अतिथी म्हणून आमदार अभिजित वंजारी, आमदार आशीष जयस्वाल, राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्राचार्य डॉ बबनराव तायवाडे उपस्थित होते. 

यावेळी भटक्या विमुक्तांचे अभ्यासक, शिक्षक नेते श्री मिलिंद वानखेडे यांनी भारतीय समाजातील एक अविभाज्य घटक असलेला भटका विमुक्त समुदाय ७० वर्षानंतरही विकासापासून कोसो दूर आहे. भटक्या विमुक्तांच्या भोवतालची भौतिक कुंपणे ३१ आॅगस्ट १९५२ रोजी काढून टाकली असली तरी, समाज मनातील कुंपणे काढून टाकण्यात इथला पुरोगामी, मानवतावादी विचार व शासन कमी पडले आहे. शिक्षणाचा अभाव, कमालीचे दारिद्रय, रोजगाराचा अभाव यासह अनेक समस्यांनी हा समाज गर्तेत सापडला आहे. भटक्या विमुक्तांचे प्रश्न, समस्या, ती सोडविण्यासाठी उपाययोजना या मुख्य भूमिकेवर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या माध्यमातून ठोस कार्य झाले पाहिजे. यासाठी रातुम नागपूर विद्यापीठात "कर्मवीर दादासाहेब कन्नमवार अध्यासन व संशोधन केंद्र" स्थापन करण्यात यावे. यामाध्यमातून दादासाहेब कन्नमवार यांचे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील योगदान, मध्य प्रांतातील विकासाचे योगदान, विमुक्त भटक्या जमातीचा सामाजिक, आर्थिक विकास, भटक्या विमुक्त जमातीवर उपलब्ध साहित्याचे एकत्रिकरण, सरकारी आयोग, समित्या, अभ्यासगट यांचे अहवाल जतन - भाषांतर, नवीन साहित्य निर्मिती, भटक्या विमुक्तांच्या समकालीन प्रश्नांसंदर्भात संशोधन प्रकल्प राबविणे या सारख्या विषयावर कार्य करण्यात यावे अशी मागणी  उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सावंत यांच्याकडे रेटून धरली. 


यापूर्वी या संदर्भात राज्यपाल, कुलगुरू व उच्च तंत्र शिक्षण विभागाकडे पत्रव्यवहार केल्याचे निदर्शनास आणून दिले. हा विषय अत्यंत महत्वाचा असून भटक्या विमुक्तांच्या प्रश्नांची उकल करण्यासाठी पुणे विद्यापीठाच्या धर्तीवर अभ्यास व प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्याबाबत पुढाकार घेऊ, असे आश्वासन उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिले. 

या बैठकीला भटक्या विमुक्तांचे अभ्यासक व शिक्षक नेते श्री मिलिंद वानखेडे, विदर्भ प्राथमिक शिक्षक संघाचे विभागीय सचिव खिमेश बढिये, कर्मवीर दादासाहेब कन्नमवार प्रचार प्रसार समितीचे सदस्य मुकुंद अडेवार, सिनेट सदस्य शरयु तायवाडे, प्राचार्य फोरमचे पदाधिकारी रामकृष्ण टाले, अनिल शिंदे (चंद्रपूर), चेतन मसराम (भंडारा) प्राचार्य गोतमारे, राजू गोस्वामी, शरद वानखेडे यांच्यासह उच्च शिक्षण विभागातील पदाधिकारी उपस्थित होते.


 Studies Centre to Nagpur University


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.