Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, मार्च २७, २०२१

दीपाली चव्हाण आत्महत्या : अमरावतीत तणाव; आरोपी शिवकुमारला पोलिसांची मानवी साखळी करून कोर्टात नेले




वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येनंतर अमरावतीत तणाव निर्माण झाला आहे. आरोपी शिवकुमारला ताब्यात देण्याची मागणी करीत शेकडो महिलांनी पोलिस ठाण्यात धडक दिली. यावेळी महिला आक्रमक झाल्यामुळे पोलिसांनी मानवी साखळी करून आरोपीला कोर्टात हजर केले.  शिवकुमारला धारणी न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.  

last Update 26/3/2021
#RFO दीपाली आत्महत्या : उपवनसंरक्षक शिवकुमार सेवेतून निलंबित

विशाखा समित्या तात्काळ कार्यरत होणार; संकटग्रस्त महिलांनी थेट संपर्क साधण्याचे आवाहन

अप्पर प्रधान मुख्य संरक्षक श्रीनिवास रेड्डी यांना सहआरोपी करणार

दीपालीच्या पार्थिवावर मोरगाव येथे होणार अंत्यसंस्कार

अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येचे पडसाद राज्यभर उमटले आहेत. प्रारंभी दीपालीच्या कुटुंबातील सदस्य व बेलदार समाज संघटना यांचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी नकार दिला. शवविच्छेदन गृहासमोर दिवसभर धरणे आंदोलन केले. त्यांनतर पोलिसांनी सहआरोपी म्हणून अप्पर प्रधान मुख्य संरक्षक श्रीनिवास रेड्डी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे पोष्टमार्टेम सुरू झाले. त्यानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले. दिपालीच्या पार्थिवावर मोरगाव ता. नांदगाव जि. अमरावती येथे अंत्यसंस्कार होणार असून, पार्थिव गावी रवाना करण्यात आले.

दरम्यान, आत्महत्येप्रकरणी उपवनसंरक्षक शिवकुमार यांना अमरावती पोलीसांनी आज नागपुरातून अटक केली. दक्षिणेतील कर्नाटक या त्यांच्या मूळगावी पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या शिवकुमार यांना नागपूर रेल्वे स्थानकावरून पोलिसांनी ताब्यात घेतले. आज सायंकाळी त्यांना सेवेतून निलंबित करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.


दिवंगत श्रीमती दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येसंदर्भात श्री . विनोद शिवकुमार , उपवनसंरक्षक , गुगामल वन्यजीव विभाग , चिखलदरा यांचेविरुध्द धारणी पोलीस ठाणे येथे भारतीय दंड विधान संहितेमधील कलम ३०६ नुसार गुन्हा दाखल झाला असून त्यामध्ये त्यांना अटक करण्यात आली आहे . त्यांच्या निलंबनाचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत . यास्थितीत उपवनसंरक्षक , गुगामल वन्यजीव विभाग , चिखलदरा या पदाचा अतिरिक्त कार्यभार श्री . अविनाश कुमार , भावसे , उपवनसंरक्षक ( वन्यजीव ) , सिपना विभाग यांचेकडे पुढील आदेश होईपर्यंत सोपविण्यात येत आहे . त्याचप्रमाणे , दिवंगत श्रीमती दीपाली चव्हाण यांनी श्री . विनोद शिवकुमार यांच्या वर्तणुकीबाबत वेळोवेळी अवगत करुनही श्री . एम . एस . रेड्डी , अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक , मेळघाट व्याघ्र प्रकल्प , अमरावती यांनी त्यांच्या तक्रारीची दखल घेतली नाही . सदरची बाब देखील गंभीर आहे . त्यामुळे त्यांना सदर पदावरुन अन्यत्र पदस्थापना देण्याबाबतची कार्यवाही सुरु आहे . यास्तव , श्री . रेड्डी यांची अन्यत्र पदस्थापना होईपर्यंत त्यांनी प्रधान मुख्य वनसंरक्षक ( वनबल प्रमुख ) , नागपूर यांचे कार्यालयात हजर राहून पुढील आदेशाची प्रतिक्षा करावी व सद्यस्थितीत त्यांच्या पदाचा कार्यभार श्री.प्रविण चव्हाण , भावसे , मुख्य वनसंरक्षक ( प्रा . ) , अमरावती यांचेकडे सोपविण्यात येत आहे . सदरचे पत्र सक्षम प्राधिकृत अधिकाऱ्यांचे मान्यतेने निर्गमित करण्यात येत आहे .






मेळघाट व्याघ्र प्रकल्पातंर्गत येणाऱ्या हरीसाल येथील वन परिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी शासकीय निवासस्थानी गोळी झाडून गुरूवारी आत्महत्या केल्याने खळबळ माजली होती. वरिष्ठ अधिकार्‍यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दीपाली चव्हाण यांच्या सुसाइड नोटमध्ये काही वरीष्ठ अधिकार्‍यांच्या नावाचा उल्लेख केला आहे. या अनुषंगानेच उपवनसंरक्षक शिवकुमार यांना ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणी चौकशी करून आणखी काही वरिष्ठ अधिकारी दोषी आहेत का हे तपासून पुढील कारवाई करण्यात येईल असे अमरावतीचे पोलीस अधीक्षक डॉ. हरीबालाजी एन यांनी सांगितले. अटक करण्यात आलेल्या शिवकुमार यांना अमरावतीच्या न्यायालयात आज हजर करण्यात येणार आहे. अत्यंत धाडसी स्वभावाच्या चव्हाण यांनी आत्महत्या केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

दीपाली चव्हाण आपल्या आईसोबत मेळघाटात राहात होत्या. मिळालेल्या माहितीनुसार गुरूवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास चव्हाण यांनी आईला बाहेरगावी पाठवले. गावाला गेल्यानंतर आईने फोन केला असता त्यांनी मोबाइल उचलला नाही. म्हणून त्यांच्या आईने हरिसाल येथे शेजारील गार्डशी संपर्क साधून घरी जाऊन पाहायला सांगितले. गार्डने घरी जाऊन पाहिले असता त्या घरात पडलेल्या आढळल्या. त्यांच्या शेजारी पिस्तुल पडलेले होते. चव्हाण यांच्या आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट झालेले नसले तरी वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची चर्चा गावकर्‍यांमध्ये होती. चव्हाण यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेली सुसाइड नोट पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.


आत्महत्येप्रकरणीउपवनसंरक्षक शिवकुमार यांना अमरावती पोलीसांनी आज नागपुरातून अटक केली. दक्षिणेतील कर्नाटक या त्यांच्या मूळगावी पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या शिवकुमार यांना नागपूर रेल्वे स्थानकावरून पोलिसांनी ताब्यात घेतले. गुरूवारी ही घटना घडल्यानंतर शिवकुमार शुक्रवारी नागपूर रेल्वे स्थानकातून कर्नाटककडे जाणार्‍या एक्स्प्रेसमध्ये बसत असताना, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. शिवकुमारना घेऊन पोलीस आता अमरावतीच्या दिशेने निघाले आहेत. त्यांना आधी अमरावती येथे आणि नंतर धारणी येथे नेण्यात येईल. शिवकुमार यांच्या वरिष्ठांची देखील आवश्यकता भासल्यास चौकशी केली जाईल, असे अमरावतीचे पोलीस अधीक्षक डॉ. हरीबालाजी एन यांनी सांगितले.


महिला वन परिक्षेत्र अधिकारी आत्महत्या प्रकरणी

जबाबदार अधिकाऱ्यावर कठोर कारवाई व्हावी

मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांची मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी

·      विशाखा समित्या तात्काळ कार्यरत करण्याचे सर्व विभागीय आयुक्तांना निर्देश

 

            मुंबईदि. 26 : हरीसालता. धारणी (जि. अमरावती) येथे कार्यरत वन परिक्षेत्र अधिकारी श्रीमती दिपाली चव्हाण यांच्या आत्महत्येस जबाबदार अधिकाऱ्यावर त्वरित गुन्हे दाखल करून निलंबित करावेअशी मागणी महिला व बालविकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

            श्रीमती दिपाली चव्हाण यांनी स्वत:च्या रिव्हॉल्वरने गोळ्या घालुन दि. 25 मार्च2021 रोजी आत्महत्या केलेली आहे. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्रात त्यांनी गुगामल वन्यजीव विभागचिखलदराचे उप वनसंरक्षक विनोद शिवकुमार यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे नमूद केले आहे. तरी या प्रकरणामध्ये संबंधित अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करुन त्वरित निलंबन करण्यात यावेअशी मागणी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

            त्याचबरोबर या आत्महत्या प्रकरणात दोषींवर तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश मंत्री ॲड. ठाकूर यांनी अमरावतीचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना दिले आहेत.

विशाखा समित्या तात्काळ कार्यरत करा

            कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण अधिनियमानुसार राज्यात सर्व शासकीय कार्यालयांमध्ये विशाखा समित्या स्थापन करण्याच्या सूचना यापूर्वीच देण्यात आल्या असून जर कोठे या समित्या कार्यान्वित नसल्यास त्या तातडीने पंधरा दिवसांच्या आत कार्यान्वित कराव्यात तसेच या समित्यांच्या नियमित बैठका घेऊन महिलांच्या तक्रारींचे निवारण करण्यात यावेअसे निर्देशही ॲड. ठाकूर यांनी सर्व विभागीय आयुक्तांना दिले आहेत.

संकटग्रस्त महिलांनी थेट संपर्क साधावा

            लैंगिकमानसिक छळाची समस्या असल्यास महिलांनी आपल्याशी थेट संपर्क साधावाअसे आवाहनही मंत्री ॲड. ठाकूर यांनी केले आहे.



या नोट मधुन लक्षात येते की, मागील वर्षापासुन कशा पध्दतीने एक महिला अधिकारी वरिष्ठांच्या जाचाला सामोरं जात होती. वेळोवेळी वरिष्ठांना याबाबत सांगुन सुध्दा, तक्रार करून सुध्दा सुधारणा होण्याएवजी यात भरच पडत गेलेली दिसुन येते. सोबत आरोग्याच्या समस्या, प्रेगनंट असतांना सुध्दा त्याकडे दुर्लक्ष करीत नाहक त्रास दिला गेला. वेळोवेळी कित्येकदा कनिष्ठ कर्मचारी, गावकरी यांचेसमोर अपशब्द बोलणे, रात्रीच्या वेळेस एकाटयाने बोलावणे, एकटेपणाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करणे, वरिष्ठाच्या मर्जीप्रमाणे न वागण्याची शिक्षा दिली जात असल्याचे अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक यांचे नावाने ही नोट लिहीत उपवनसंरक्षक शिवकुमार यांचेविषयी लिहतांना, दिपाली चव्हाण हिने आपल्या आत्महत्येस सर्वस्वी जवाबदार विनोद शिवकुमार, उप वनसंरक्षक यांना ठरविले आहेत.

यांसदर्भात शासन आणि वनविभागाने त्वरीत गंभीर दखल घेत, आरोपीस शिक्षाच नाही तर या प्रकरणाची सखोल चैकशी करून यात दोषी असणारे इतर अधिकारी यांचेवर कायदेशीर कार्यवाही झाली पाहीजे. तसेच महीला अधिकारी-कर्मचारी विषयी अशा पध्दतीने वागणारी मानसिकताच ठेचुन काढली पाहीजे याकरीता कठोर पावले उचलण्याची गरज आहे. आपणाकडून अपेक्षा आहे की, या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन वरिष्ठ पातळीवरून चौकशी करण्यात यावी, ही विनंती...!
बंडू धोतरे,
अध्यक्ष, इको-प्रो...

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.