मान्यवरांचा सूर : किसानपूत्र फाउंडेशनतर्फे अन्नत्याग उपोषण
चंद्रपूर : शेतक-यांच्या आत्महत्या महाराष्ट्रातील कोणत्याच घटकासाठी भूषणावह नाहीत. देशाचा पोशिंदाच जर खचत गेला तर समाजात भयाण परिस्थिती निर्माण होईल. शेतकरी माझा आहे. त्यांच्या दुःखाशी समरस व्हावे. शेतक-यांना न्याय मिळवून देण्याकरिता भूमिपूत्रांनी समोर यावे, असा सूर येथे उमटला.
शेतक-यांप्रति संवेदना व्यक्त करण्यासाठी येथील किसानपुत्र फाउंडेशनच्या माध्यमातून अन्नत्याग उपोषण करण्यात आले. याची सांगता शुक्रवार (ता. १९) सायंकाळी इन्स्पायर इन्स्टिट्यूट येथे झाली. किसानपुत्र फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा. विजय बदखल, रवी झाडे, उमाकांत धांडे, प्रमोद काकडे, बळीराज धोटे, प्रदीप देशमुख, संदीप गिर्हे , हबीब शेख, शाहू धांडे,यांची उपस्थिती होती. १९ मार्च १९८६ ला यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण गावात साहेबराव करपे या शेतक-याने आपल्या कुटुंबासह आत्महत्या केली. राज्यातील ही पहिली शेतकरी आत्महत्या होती. त्यानंतर लाखो शेतक-यांनी आत्महत्या केल्या. शेतक-यांच्या हलाखीच्या परिस्थितीला आणि आत्महत्येला सीलिंगचा कायदा, अत्यावश्यक वस्तूचा कायदा, जमीन अधिग्रहणाचा कायदा जबाबदार आहेत. या कायद्यांचा निषेध व शेतक-यांविषयी सहवेदना व्यक्त करण्यासाठी या उपोषणाचे आयोजन करण्यात आले होते. आपल्या कामाच्या ठिकाणी अन्नत्याग करण्याचे आवाहन किसानपुत्र फाउंडेशनने केले होते. याला प्रतिसाद देत अनेकांनी अन्नत्याग केले. सायंकाळी ५ वाजता इन्स्पायर इन्स्टिट्यूट येथे अन्नत्याग उपोषणाची सांगता झाली. व्यवस्था बदलणार नाही तोपर्यंत परिवर्तन शक्य नाही. त्यामुळे परिवर्तन करण्यासाठी आता किसानपूत्रांनी समोर यावे. शेतक-यांना जागृत करण्याची गरज असल्याचे मतही यावेळी व्यक्त करण्यात आले. याअगोदर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या फोटो ला माल्यार्पण करून सुरुवात करण्यात आली. प्रस्ताविक विजय बदखल यांनी केले. मान्यवरांची यावेळी समयोचित भाषणे झाली. शेवटी आत्महत्याग्रस्त शेतक-यांना आदरांजली वाहण्यात आली.