शिरीष उगे(भद्रावती प्रतिनिधी) :
स्थानिक विजासन रोड लगत असलेली प्राचीन बोढी ले-आऊट मालकातर्फे बुजविण्याचे काम चालू आहे. जैवविविधतेच्या अनुषंगाने हे करणे चुकीचे आहे. त्यामुळे सदर बोढी बुजविण्याचे काम त्वरीत बंद करुन भविष्यात भुजल साठा अबाधित रहावा करीता शहरातील पानथळ संवर्धित करण्याची मागणी ईको-प्रो द्वारे करण्यात आली आहे.
भद्रावती शहरात अनेक पुरातन तलाव, मामा तलाव, बोडी अस्तित्वात आहे. यामुळे शहारातील भुजल पातळी राखून तर आहेच मात्र पर्यावरण अबाधित राखले जात आहे. या तलावा मधे विविध प्रजातींच्या पक्षांचा वावर आहे, ज्यात स्थानिक पक्षांसोबतच प्रवासी पक्षी मोठ्या प्रमाणात येत असल्याची नोंद आहे. शहरातील काही तलावांचा वापर हे प्रवासी पक्षी प्रजनना करिता वापरतात मात्र मागील काही वर्षात या तलावांची परिस्तिथी वाईट झाली आहे. काही तलावांचे लेआऊट मधे रूपांतर झाल्याचे पाहावयास मिळत आहे. एका तलावाचे रूपांतर लेआऊट मध्ये यशस्वीरित्या केल्यामुळे या बिल्डर लॉबी चे मनोबल वाढले आहे त्यांनी आता तलावांचे रूपांतर लेआऊट मध्ये करण्याचा सपाटा लावला आहे.
नैसर्गिक रित्या कुठेही पाणी जमा होत असेल त्यास पानथड असे संबोधल्या जाते आणि असे पानथड़ नष्ट करणे बेकायदेशीर आहे.
आज दिनांक ११ /२/२०२२ ला स्थानिक विजासन रोड लगत असलेली प्राचीन बोढी बुजविण्याचे काम चालू आहे. जैवविविधते च्या अनुषंगाने हे करणे चुकीचे आहे. जैवविवीधता कायदा २००२ नुसार असे करणे गुन्हा आहे. सदर कृत्य करणाऱ्या बिल्डर लॉबी वर त्वरित गुन्हा दाखल करून कार्यवाही करण्याची मागणी स्थानिक इको-प्रो संघटनेचे तालुका अध्यक्ष संदीप जीवने यांनी केली आहे.
----------------------------------------------
सदर खासगी मालमत्ता असल्याने तशी पालिका प्रशासनाकडे अडविण्याची तरतूद नाही. तरीही माहिती घेतली असता त्या तलावाचे आरक्षण अजून बदलले नसल्याने संबधीत ले-आऊट मालकाला नोटीस देण्यात येईल.
- सूर्यकांत पिदुरकर,
मुख्याधिकारी
न.प. भद्रावती
----------------------------------------------
शहरांच्या पर्यावरणाच्या दृष्टीने तलाव, पाणस्थळे अत्यंत महत्वाचे आहे, पूर्वीपासुनच ही तलाव फक्त रोजगारच देत नव्हती, तर एकंदरीत जैवविवीधता, स्थानिक पर्यावरण व मानवांच्या दृष्टीने, महत्वाचे होती. अशाप्रकारे ही तलाव रहिवाशी स्थानासाठी वापर होऊन हा तलावांचा नैसर्गिक वारसा नष्ट होतो आहे. भद्रावती ऐतिहासिक नगरी असुन ऐतिहासिक वारसा सोबतच तलावाच्या रूपाने नैसर्गिक वारसा सुध्दा या शहराने जोपासला आहे. हळू हळू एक-एक तलाव नष्ट होत आहे. भद्रावती शहरातील सर्वच तलावाच्या संवर्धनासाठी नगरपालिकेने त्वरीत हस्तक्षेप करीत संवर्धनाच्या दॄष्टिने आवश्यक प्रस्ताव तयार करून जिल्हा प्रशासनकड़े पाठवावे.
- बंडू धोत्रे
अध्यक्ष
ईको-प्रो, चंद्रपुर