Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, मार्च २५, २०२१

ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर


ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. आशा भोसले यांचं संगीत क्षेत्रात मोठं योगदान आहे. त्यांनी असंख्य मराठी आणि हिंदी गाणी गायली आहेत. प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांना 2020 या वर्षीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पुरस्कार निवड समितीची बैठक झाली. मुख्यमंत्री व उप मुख्यमंत्र्यांनी आशाताईंचे अभिनंदन केले

आशा भोसले (८ सप्टेंबर, इ.स. १९३३ - हयात) या लोकप्रिय मराठी गायिका आहेत. मराठीसह हिंदी आणि अनेक भाषांतील चित्रपटांत त्यांनी पार्श्वगायन केले आहे.

सुरांच्या साहाय्याने केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील व जगभरातील लोकमनावर अधिराज्य गाजवणारा एक आवाज. त्या गळ्याला गाता येत नाही असे कुठलेच गाणे नाही; तो आवाज चैतन्य निर्माण करू शकत नाही अशी कुठलीच मैफिल नाही: त्या गळ्याला त्याज्य आहे असा कुठलाच संगीत-प्रकार नाही असे म्हटले जाते.


बालपण 

आशा भोसले यांचा जन्म मंगेशकर कुटुंबातला असून त्यांना मास्टर दीनानाथांचा गाण्याचा वारसा मिळाला. ते कलाकार आणि गायक होते.[१] लता मंगेशकर, हृदयनाथ मंगेशकर आदी भावंडांचे मार्गदर्शन व त्यांची साथ या सगळ्यांतून आशाताईंचा गळा घडत गेला. दीनानाथ मंगेशकरांचे वडील कऱ्हाडे ब्राह्मण आणि आई देवदासी होत्या. अशा अपत्यांना आता गोमंतक मराठा म्हणतात.
कारकीर्द[संपादन]

आशा भोसले यांनी चित्रपट गायनाची सुरुवात माझा बाळ या चित्रपटातून केली. १९५० च्या सुमारास त्यांनी हिंदी चित्रपटांतही अनेक गाणी गायली खरी, पण ते चित्रपट विशेष गाजले नाहीत. त्या काळात हिंदी चित्रपटसंगीतावर लता मंगेशकर, शमशाद बेगम, गीता दत्त अशा गायिका राज्य करत होत्या. त्यामुळे आशाताईंना संधी मिळणे अवघड होते. या गायिकांच्या राज्यात राहून, गाऊन, आपले वेगळे अस्तित्व निर्माण करण्याचे, स्वतःला सिद्ध करण्याचे फार मोठे आव्हान आशाताईंपुढे होते. या दरम्यान त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील अडचणी, मुलांची जबाबदारी, प्रतिकूल परिस्थिती या सगळ्या विपरीत घटकांशी सामना करत करत आशाताईंनी ते आव्हान स्वीकारले आणि ते स्वबळावर, आत्मविश्वासाने यशस्वीपणे पेलून दाखवले.

इ.स. १९५७- इ.स. १९५८ हे वर्ष आशा भोसले यांचेच होते. सचिन देव बर्मन यांच्याकडे गाण्याची संधी त्यांना मिळाली. त्या संधीचे त्यांनी सोने केले. कालाबाजार, लाजवंती, नौ दो ग्यारह, चलती का नाम गाडी, सुजाता हे आणि असे असंख्य चित्रपट त्यांनी आपल्या आवाजाने अजरामर केले. पुढची पाच दशके आशाताईंनी गाजवली. अनेक संगीतकारांबरोबर काम केले. अनेक कवींच्या काव्यरचनांना सुरांचे कोंदण दिले. एवढेच नाही तर आपल्या गाण्यांबरोबर त्या चित्रपटांना, त्यांतल्या अभिनेत्रींनादेखील अजरामर केले.

ओ. पी. नय्यर आणि आशाताई एक अफलातून जोडी होती. इ.स. १९६० च्या सुमारास नय्यर यांचे संगीत असणारे ‘ऑखोसे जो उतरी है दिलमे’ (फिर वही दिल लाया हूॅं ) हे गाणे; इ.स. १९६५ चे जाइये आप कहॉं (मेरे सनम); इ.स. १९६८ मधील वो हसीन दर्द देदो (हम साया); चैन से हमको कभी - अशी अनेक प्रसिद्ध गाणी त्यांनी गायली.

राहुल देव बर्मन यांच्याबरोबर काम करताना पिया तू अब तो आजा हे इ.स. १९७१ चे कारवॉं चित्रपटातील गीत, इ.स. १९७१ चेच फिल्मफेअर पुरस्कार विजेते ‘दम मारो दम’; ‘जाने जा’ हे इ.स. १९७२ चे जवानी दिवानीतले गाणे, ही गाणी आशा भोसलेंच्या आवाजाचा नवा बाज दाखवून गेली. इ.स. १९८१ चा ‘उमराव जान’ हा चित्रपट आशाताईंमधली गझल गायिका रसिकांसमोर घेऊन आला. आशाताईंचा आवाज, खय्याम यांचे संगीत आणि दिल चीज क्या है, इन ऑंखोंकी मस्तीसारखी शब्दरचना हे सगळेच जमून आले. ‘दिल चीज क्या है’ या गीताला इ.स. १९८१ चा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. पुढे ‘इजाजत’ चित्रपटातल्या ‘मेरा कुछ सामान’ या त्यांच्या गाण्यालाही इ.स. १९८६ चा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.

हिंदीबरोबर आशा भोसलेंची मराठी गाण्यांची कारकीर्द बहरतच होती. सुधीर फडके, हेमंत कुमार, लता मंगेशकर, सुरेश वाडकर, अनुराधा पौडवाल अशा गायक-गायिकांबरोबरची गाणी मराठी रसिकमनात घर करून राहिली आहेत. बा. भ. बोरकर, आरती प्रभू, ग. दि. माडगुळकर, शांता शेळके, सुरेश भट, सुधीर मोघे यांच्या कवितांबरोबर सौमित्रसारख्या नव्या दमाच्या कवींच्या कविताही आशाताईंच्याच आवाजात रसिकांपुढे आल्या. सर्व कवींच्या शब्दांना आशाताईंनी सुरेल न्याय दिला. तरुण आहे रात्र अजुनी, जिवलगा राहिले रे दूर, ही वाट दूर जाते, फुलले रे क्षण माझे, झिनी झिनी वाजे, गेले द्यायचे राहूनी, गंध फुलांचा गेला सांगून, आज कुणीतरी यावे, एका तळ्यात होती - अशा लोकप्रिय गीतांची यादी प्रचंड आहे. ‘रेशमाच्या रेघांनी’तला लावणीचा ठसका, ‘सैनिक हो तुमच्यासाठी’तला कृतज्ञता भाव, ‘केव्हा तरी पहाटे’तली हुरहुर, ‘जे वेड मजला लागले’ची गोडी, सगळेच विलक्षण!

त्यांनी ज्यांच्यासाठी गाणी गायली ते संगीतकार, ते गीतकार, त्या अभिनेत्री आणि आशा भोसलेंचा आवाज - या सर्वांच्या परस्परसंबंधांचे संख्यात्मक व गुणात्मकदृष्ट्या वर्णन करणे हे एक अशक्यप्राय काम आहे. त्याचबरोबर आशाताईंनी गायलेली चित्रपटगीते (मराठी, हिंदी व अन्य भाषांतील), भावगीते, गझल, भजने-भक्तिगीते इत्यादी गाण्यांची व संबंधित चित्रपटांची केवळ यादी करायची ठरवली, तरी ते एक आव्हानात्मक काम आहे.

हिंदी चित्रपट गीतांचा विचार करता आशा भोसले यांनी एस.डी.बर्मन यांच्यापासून ते ए.आर. रहमानपर्यंतच्या विविध कालखंडांतील, अनेक प्रकारच्या संगीतकारांबरोबर काम केले आहे. मराठीतही दत्ता डावजेकर-श्रीनिवास खळे यांच्यापासून ते श्रीधर फडके यांच्यापर्यंत असंख्य संगीतकारांच्या रचनांना त्यांनी सुरेल साज चढवला आहे. मधुबाला-मीनाकुमारीपासून ते अलीकडच्या तब्बू-उर्मिला मातोंडकर-ऐश्वर्या रायपर्यंतच्या अभिनेत्रींना त्यांनी आपला आवाज दिला आहे. त्यांनी मोहम्मद रफी, किशोर कुमारसुधीर फडके यांच्याबरोबरचा काळ तर गाजवला आहेच, तसेच त्या आज हृषीकेश रानडे सारख्या तरुण गायकाबरोबरही गात आहेत. आशाताई आजपर्यंत सुमारे ९०० चित्रपटांशी गायिका म्हणून जोडल्या गेल्या आहेत. तसेच त्यांनी आत्तापर्यंत १४ भाषांमध्ये सुमारे १२००० गाणी गायली आहेत.

नाच रे मोरा, आईए मेहेरबॉं, दिव्य स्वातंत्र्य रवी (नाट्यगीत), तनहा तनहा यहॉं पे जीना, जिवलगा राहिले रे दूर घर माझे, रंग दे मुझे रंग दे, सांज ये गोकुळी, जानम समझा करो, मागे उभा मंगेश... ही ‘रेंज’च अफाट आहे, हा आवाकाच अविश्वसनीय आहे. उपशास्त्रीय संगीत, मराठी भावगीते, मराठी-हिंदी चित्रपट गीत्गे, नाट्यगीते, गझली, लावण्या, डिस्को-रॉक-पॉप गाणी, अन्य भाषांतील गाणी - अशा सर्वच प्रकारच्या संगीतामध्ये आशाताई आजही तेवढ्याच ताकदीने गाऊ शकतात.

कॅनडा, इंग्लंड, अमेरिकेची संयुक्त संस्थाने, स्वीडन आदि अनेक देशांत झालेले कार्यक्रम, परकीय संगीतकारांबरोबर केलेले काम, ‘राहुल ॲंड आय’ सारखा अल्बम, लेस्ली लुईसबरोबरचे काम असे अनेक नवनवे प्रयोग आशाताई आजही करतात. वयाच्या ७४ व्या वर्षी त्यांनी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू ब्रेट ली, अभिनेता संजय दत्त यांच्याबरोबर गाण्याचा प्रयोग केला. ‘आशा ॲंड फ्रेन्ड्‌स’ या अल्बमचा हा प्रयोग कमालीचा यशस्वी ठरला आहे. अभिजात संगीत कलेला जसे स्थळ-काळ-वेळाचे बंधन नाही, तसेच आशाताईंच्या आवाजालाही या कशाचेच बंधन नाही.

आशा भोसले या मंचावरून एक ‘उत्कृष्ट परफॉर्मर’ म्हणून रसिकांसमोर येतातच, पण त्या स्वयंपाकाची आवड असलेल्या, मुलांना सांभाळणार्‍या एक परिपूर्ण गृहिणी आहेत; क्रिकेटच्या दर्दी रसिक असलेल्या भारतीय नागरिक आहेत. एवढे यश, मानसन्मान मिळूनही पाय घट्टपणे जमिनीवरच असलेल्या, साधी राहणी असलेल्या स्त्री-कलाकार आहेत. इतर मंगेशकर भावंडांप्रमाणेच त्यांना वडिलांचा (दीनानाथांचा) अभिमान आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे जुना काळ, प्रचंड कष्ट, धडपड, जुने सहकारी (सहगायक, संगीतकार, गीतकार, सहवादक, स्टुडिओतील कर्मचारी ... इत्यादी) या गोष्टी न विसरणाऱ्या, किंबहुना आवर्जून लक्षात ठेवणाऱ्या आशाताई ह्या एक ‘संवेदनशील माणूस’ आहेत.

पुरस्कार 

राष्ट्रीय पुरस्कार, अनेक फिल्मफेअर पुरस्कार, मध्य प्रदेश सरकारचा लता मंगेशकर पुरस्कार, महाराष्ट्र सरकारचे १५ पेक्षा जास्त पुरस्कार आणि नुकताच इ.स. २००८ मध्ये मिळालेला पद्मविभूषण पुरस्कार- हे पुरस्कार आशा भोसलेंना बहाल करण्यात आले आहेत. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे चित्रपट क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार ‘दादासाहेब फाळके सन्मान’ आशाताईंना २०००-२००१ मध्ये देण्यात आला. भारत-पाकिस्तान असोसिएशनचा ‘नाईटिंगेल ऑफ एशिया’ हा पुरस्कार त्यांना प्राप्त झाला आहे. तसेच ब्रिटनचे तत्कालीन पंतप्रधान टोनी ब्लेअर यांच्या हस्ते, बी.बी.सी.आकाशवाणीच्या वतीने जीवनगौरव पुरस्कारही त्यांना देण्यात आला.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.