ग्रामीण भागातील नागरिकांना सध्या कोरोनाच्या संचारबंदीमुळे हाताला रोजगार नाही. सध्या शेतीची कामेही नाहीत. त्यामुळे जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी गरिबांचे हाल होत आहेत. ही गैरसोय दूर करण्यासाठी रेशन दुकानातून गोडे तेल आणि साखर पुरवठा करण्याची मागणी आम आदमी पार्टीच्या नेत्या अॅङ पारोमिता गोस्वामी यांनी जिल्हाधिकारी कुणाल खेमणार यांच्या मार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.
जगात कोरोणाच्या महामारी मुळे व भारतातही कोरोणाची साथ पसरत असल्याने लाॅकडाऊन करण्यात आलेले आहे. अचानक लाॅकडावून जाहीर केल्यामुळे गरीब शेतकरी, शेतमजुर, निराधार महिला, कारागिरांना जगणे असह्य झालेले आहे. या मजुरांना रेशन दुकानातून गहू आणि तांदूळ दिले जात आहे. मात्र जीवनावश्यक असलेले गोडे तेल आणि साखर दिली जात नाही. लाॅकडावून च्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणावर गोड तेल आणि साखरेचे भाव दीडपट वाढविण्यात आलेले आहे आणि याचा फटका सर्वसामान्य गरिबांना बसत आहे. मजुरी नसल्याने व हातात नगदी पैसे नसल्याने हे मजूर महागडे तेल आणि साखर विकत घेऊ शकत नाही.
रेशन दुकानातून गोडेतेल व साखर पुरवठा करण्यात यावा, अशी विनंती अॅड. पारोमिता गोस्वामी यांनी केली आहे.