3 व 4 च्या प्रशिक्षणाला हजर राहण्याचे प्रशासनाचे निर्देश
चंद्रपूर/प्रतीनिधी:
लोकसभा निवडणुकीच्या कामाला सर्वोच्च प्राधान्य देऊन यासंदर्भात प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. निवडणूक कामे टाळण्यापासून अलिप्त राहण्याचा व अनावश्यक सबबी सांगणाऱ्या 361 कर्मचाऱ्यांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. 3 व 4 एप्रिल रोजी 9 हजार 412 कर्मचाऱ्यांचे 6 विधानसभा क्षेत्रात प्रशिक्षण होणार असून सर्व कर्मचाऱ्यांनी महत्वाच्या प्रशिक्षणाला उपस्थित रहावे, असे आदेश प्रशासनाने दिले आहेत.
सरकारी यंत्रणेमध्ये कार्यरत असणाऱ्या या सर्व कर्मचाऱ्यांनी निवडणूक काळामध्ये सर्वोच्च प्राथमिकता निवडणूक कार्याला देणे बंधनकारक आहे. मात्र वेगवेगळ्या ठिकाणी निवडणूक कामांचे वाटप झाले असताना सुद्धा अनेक जण प्रशिक्षणापासून स्वतःला अलिप्त ठेवत असून अशा कर्मचाऱ्यांवर थेट कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.
कोणत्याही कारणाशिवाय निवडणुकीच्या कामांना टाळणे कायदेशीररित्या चुकीचे असून यासंदर्भात असलेल्या या कायद्यानुसार त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल,असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
प्रत्येक कर्मचाऱ्याला निवडणुकीसंदर्भात प्रशिक्षण घेणे अनिवार्य आहे. यामध्ये मतदानाच्या प्रत्यक्ष कामात असणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याला ईव्हीएम व व्हीव्ही पॅट मशीन हाताळण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. याशिवाय या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण घेतलेल्या बाबतचे प्रमाणपत्र देखील देण्यात येणार असून यंत्रणा संपूर्णपणे हाताळण्याची जबाबदारी यामध्ये निश्चित करण्यात आली आहे. जिल्ह्यामध्ये शासकीय निमशासकीय व खाजगी क्षेत्रातील जवळपास पंधरा हजार कर्मचारी निवडणूक काळात वेगवेगळ्या कामांवर तैनात आहेत.
यापूर्वी 16 व 17 मार्च रोजी 10,712 कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण झाले. यामध्ये 10290 कर्मचारी उपस्थित होते. 412 कर्मचारी अनुपस्थित होते. अनुपस्थित राहणाऱ्या 412 पैकी 361 कर्मचाऱ्यांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत.
3 व 4 एप्रिल रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील राजूरा, चंद्रपूर, बल्लारपूर ,वरोरा, ब्रह्मपुरी व चिमूर या उपविभागीय कार्यालयाच्या ठिकाणी आणि सर्व कर्मचाऱ्यांचे पुन्हा प्रशिक्षण होणार आहे. 9 हजार 412 कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार असून या सर्व कर्मचाऱ्यांना ईव्हीएम,व्हीव्हीपॅड, मशीन वापराचे प्रशिक्षण व प्रात्यक्षिकाद्वारे सादरीकरणाची संधी दिली जाणार आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याला मतदानाच्या संदर्भातील सर्व जबाबदाऱ्या पार पाडता चालला पाहिजे. या संदर्भातील हमीपत्र देखील भरून घेतले जाणार असून 3 व 4 तारखेच्या प्रशिक्षणामध्ये कोणीही अनुपस्थित राहू नये, अन्यथा कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट निर्देश प्रशासनाने दिले आहे