नागपूर/प्रतीनिधी:
भिवापूर परिसरात मागील वर्षभरात महावितरणच्या साहित्याची चोरी करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी छडा लावला असून यातील चोरट्याना अटक करण्यात यश आले असले तरी टोळीचा सूत्रधार अद्याप फरार आहे. जानेवारी-फेब्रुवारी या दोन महिन्यात या टोळीने परिसरात ४ ठिकाणी महावितरणच्या सुमारे ४ लाख किंमतीच्या साहित्याची चोरी केली. सोबतच मागील वर्षी केलेल्या २ चोरीच्या घटनेची कबुली चोरांनी दिली आहे.
महावितरणच्या भिवापूर उपविभागात येणाऱ्या सालोटी,बोडतला, पाहामी, उखळी,मुगलाई या गावात चोरटयांनी महावितरणच्या वीज वाहिन्या, रोहित्रातील तांब्याच्या तारा लंपास केल्या होत्या. सोबतच परिसरातील शेतकऱ्यांच्या कृषी पंपातील साहित्याची चोरी केली. घटना घडल्यावर महावितरणकडून वेळोवेळी भिवापूर ठाण्यात तक्रारी दाखल करण्यात आल्या. भिवापूर येथील सहायक अभियंता नंदकिशोर थोटे यांनी महावितरणकडून तक्रार दाखल केली होती.
सालोटी शिवारात चोरांनी महावितरणचे वीज खांब जमिनीवर पाडून वीज वाहिनी लंपास केली होती. याची अंदाजित किंमत पावणे दोन लाख रुपये आहे.
महावितरण साहित्याची सातत्याने चोरी होत असल्याने स्थानिक पोलीस चोरांच्या मागावर होते . मागील २ वर्षांपासून या टोळीने भिवापूर, उमरेड, कुही परिसरात चोऱ्या केल्याची कबुली पोलीस यंत्रणेकडे दिली आहे.
नागपुरातील कळमना येथे राहणाऱ्या एकाला पोलिसांनी ताब्यात घेऊन विचारणा केली असता त्याने केलेल्या कृत्याची कबुली दिली. अद्याप या टोळीचा सूत्रधार पोलिसांना सापडला नाही. पोलीस यंत्रणा सूत्रधाराच्या शोधात आहे. दादू उर्फ किसान खारोडे,राजकुमार संतोषी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपीची नावे असून टोळीचा सूत्रधार संतोष साहू अद्याप फरार आहे.
महावितरणकडून ग्रामीण भागात कृषी पंपासोबतच घरगुती वीज ग्राहकांना वीज पुरवठा करण्यासाठी वीज वितरणाचे जाळे उभे केले आहे. जर महावितरणच्या वीज वाहिनीजवळ अथवा रोहित्राजवळ अनोळखी व्यक्ती संशयास्पद हालचाली करताना आढळून आल्यास नागरिकांनी जवळच्या पोलीस ठाण्यात अथवा महावितरणच्या कार्यालयात माहिती देण्याचे आवाहन कार्यांत येत आहे.