१३३ लोक तापानी त्रस्त
७७आरडीचे तपासासाठी ४ लोकांचे रक्त पॅथालाजीत तपासणीला पाठविले
वाडी (नागपूर)/अरूण कराळे:
वाडीतील डॉ .आंबेडकर नगरमधील रहिवाशी गेल्या चार महिन्यापासून पाण्याच्या समस्येमुळे त्रस्त झाले असुन दूषित पाणीपुरवठयामुळे कावीळसारख्या घातक रोगाने नगरात धुमाकुळ घातला आहे . आजपर्यत कावीळमुळे चार जणांचा मृत्यू झाला आहे . त्यामुळे व्याहाड प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे वैद्यकीय अधिकारी डॉ. सोनाली बंसोड यांच्या नेतृत्वात तीन दिवसापासून डॉ . आंबेडकर नगरात नागरीकांची आरोग्य तपासणी करून औषधोपचार सुरू आहे . आरोग्य कर्मचारी आणि आशा वर्कस असे एकूण २० जणांची टीम प्रत्येक घरी जात आहेत आणि लोकांच्या आरोग्याविषयी चौकशी करीत आहेत.तीन दिवसांच्या सर्वेक्षणात ९०४७ नागरिकांची तपासणी करण्यात आली.
त्यापैकी ४१ लोकांना कावीळ झालेला असून , १३३ नागरीक तापामुळे त्रस्त आहे .७७ आरडीचे तपासासाठी ४ लोकांचे रक्त पॅथालाजीत पाठविले अशी माहिती डॉ .सोनाली बन्सोड यांनी दिली . हा अहवाल जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे दिला आहे . या अभियानात जिल्हा परीषदच्या आरोग्य विभागाचे रविंद्र सुखदेवे, पंचायत समितिचे आरोग्य विस्तार अधिकारी विनोद वातकर ,सहायक डॉ. मिलींद गणवीर,संचालक हिवताप नागपुरे, डॉ. दीपक शलोकर, डॉ . सचिन हेमके,वाडी उपकेंद्राचे आरोग्य सहाय्यक भय्याजी यवतकर, मधुकर माकडे, आरोग्य सेवक अमोल शिंदे,राजेन्द्र महल्ले, सुनील पेंदोर,बबन अडले,वरुण भोयर यांनी तपासणीस सहकार्य केले.
प्राथमिक स्वास्थ्य केंद्र व्याहाडच्या डॉक्टरांनी नगर परिषदेला पत्र पाठवून औषधाची मागणी केली ज्यात क्लोरोस्कोप,ओटी सॉल्यूशन, मेडिक्लोर बॉटल्स .पत्राद्वारे असेही सांगितले की, वाडीच्या डॉ .आंबेडकर नगरमध्ये कावीळचे रोगी आढळले असून नालीच्या पाईपलाइनचे पाणी एकत्रीत होऊन पाण्याच्या गळतीमुळे दूषित होत आहेत. अश्या पद्धतीचे लीकेज बंद करण्याची मागणी डॉ. सोनाली बंसोड यांनी केली . नागरिकांनी पिण्याचे पाणी उकळून पिण्याचे आवाहन नगराध्यक्ष प्रेम झाडे यांनी केले आहे.