घटनेमुळे परिसरात हळहळ
वाडी ( नागपूर )/अरूण कराळे:
कारने दिलेल्या धडकेत तीन वर्षीय यशवी या चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवार १५ मार्च रोजी रात्री ८.३० दरम्यान कळमेश्वर पोलीस ठाणाअंतर्गत गोंडखैरी येथे वार्ड क्रमांक दोन व तीनच्या वस्तीत येणाऱ्या मुख्य मार्गावर घडली.
यशवी लक्ष्मीकांत देशमुख वय ३ वर्षाची चिमुकली हि आपल्या घरासामोरील रस्त्याच्या बाजूला खेळत असतांनी गुड्डू धनराज शेवाळे वय ३० राहणार गोंडखैरी हे आपल्या कार एमएच ३१/सीआर ९८६८ क्रमांकाची टाटा इंडीका डिलक्स कारनी स्थानिक वार्ड क्रमांक दोन व तीनच्या मुख्य मार्गाने राष्ट्रीय महामार्गावर जाण्यास निघाला असता लक्ष्मीकांत देशमुख यांच्या घराशेजारी गतिरोधक असल्याने कारची स्पीड कमी झाली. त्यातच यशवी हि चिमुकली कारला बघताच घाबरून पळायला लागली. यातच कारची यशवी लक्ष्मीकांत देशमुख या तीन वर्षीय चिमुकलीला धडक बसली. यात तीच्या डोक्याला जबर मार लागल्याने ती गंभीर जखमी झाली. अशा अवस्थेत चिमुकलीला सर्वप्रथम रविनगर, नागपूर येथील खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आले.
परंतु तिची प्रकृती अत्यवस्थ असल्याने पुढील उपचारासाठी मेडीकल रुग्णालयात हलविण्यात आले. मेडिकल ला उपचारादरम्यान यशवी या चिमुकलीचा शुक्रवार १५ मार्चला रात्री १०.३० दरम्यान मृत्यु झाला. यानंतर शनिवार १६ मार्चला मेडिकल रूग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर गोंडखैरीमध्ये तीच्यावर दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आला. याप्रकरणी फिर्यादी सागर शामराव देशमुख यांनी कळमेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यावरून कारचालक गुड्डू धनराज शेवाळे वय २९ याच्या विरूध्द भादविच्या कलम २७९, ३०४ अ सहकलम आरडब्ल्यु १८४ मोटर विकल अॕक्टनुसार गुन्हा दाखल केला. व कारसह आरोपीला अटक करण्यात आली. पुढील तपास ठाणेदार मारोती मुळूक यांच्या मार्गदर्शनात स्थानिक पोलीस मदत केंद्रातील पोलीसकर्मी अधिक तपास करीत आहेत. या दुर्देवी घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात येत असून देशमुख परिवारांवर दुःखाचे सावट पसरलेले आहे.
मृत्यू झालेल्या यशवी या तीन वर्षीय चिमुकली वडीलाला एकटीच मुलगी होती. वडील लक्ष्मीकांत देशमुख यांचे गावातच घरी जनरल स्टेशनरी दुकान आहे. यामुळे लक्ष्मीकांत यांना धक्काच बसला. अतिशय दुर्देवी या घटनेमुळे परिसरात दु:खद छाया पसरली आहे. वडीलांनी आपल्या चिमुकलीची पाच मिनीटाआधी घेतलेली भेट ही शेवटची भेट ठरली.गोंडखैरी येथे जाण्यास दोन मुख्य मार्ग आहे. त्यातच एका मार्गावर शुक्रवार आठवडी बाजार भरतो. त्यामुळे दुसऱ्या मुख्य मार्गाने जाणाऱ्या येणाऱ्या चारचाकी दुचाकी वाहनांची व पादचाऱ्यांची गर्दी वाढतो. त्यातच स्थानिकांची वाहने व सामान रस्त्यावर उभी असतो त्यामुळे या मार्गाने ये जा करणे म्हणजे मुठीत जिव घेवून प्रवास करावा लागतो.