Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, मार्च १७, २०१९

आजपासून नामनिर्देशन पत्र स्विकारण्यास सुरुवात

  •  लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज
  •  जिल्हाधिका-यांनी घेतला आढावा

नागपूर, दि. 17 - रामटेक व नागपूर लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचीतयारी जिल्हा प्रशासनाकडून पूर्ण करण्यात आली असून उद्या सोमवार (दि.18)पासून जिल्हाधिकारी कार्यालयात नामनिर्देशन पत्र स्विकारण्यास सुरुवात होणार आहे. जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी आज निवडणूक कामाच्या तयारीचा आढावा घेतला. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी श्रीकांत फडके उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी मुदगल यांनी अधिकारी व कर्मचा-यांना विविध सूचना केल्या.


लोकसभा निवडणुकीसाठी चंद्रपूर मतदारसंघांमध्ये 11 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याची सुरुवात उद्या दिनांक 18 मार्चपासून सुरू होत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात रविवारी सायंकाळी या संदर्भातील आढावा बैठक घेण्यात आली. जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी या संदर्भात आज सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना निर्देशित केले असून यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे.

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेसाठी होणाऱ्या निवडणुकीकरिता नामनिर्देशन पत्रे उद्या दिनांक 18 मार्च 2019 ते 25 मार्च 2019 पर्यंत सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत निवडणूक निर्णय अधिकारी चंद्रपूर मतदार संघ तथा जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्याकडे दाखल करता येणार आहे.

जिल्‍हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांच्या कक्षालगत असणाऱ्या वीस कलमी सभागृहांमध्ये अर्जाची प्राथमिक तपासणी करण्यात येईल व त्यानंतर जिल्हाधिकारी यांच्या कक्षामध्ये सदर अर्ज दाखल करता येईल. अर्ज दाखल करण्यासाठी पंचवीस हजार रुपये अनामत रक्कम आवश्यक असून अनुसूचित जातीच्या व अनुसूचित जमातीच्या उमेदवारांसाठी ही रक्कम साडेबारा हजार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू करण्यात आलेल्या मदत कक्षातून हा अर्ज उपलब्ध करण्यात येईल. जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज दाखल करताना उमेदवार व त्यांच्यासोबत जास्तीत जास्त 4 व्यक्तीला प्रवेश देण्यात येणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ सकाळी 11 ते दुपारी 3 या काळात असेल. 18 मार्च ते 25 मार्च या काळातील सार्वजनिक सुट्ट्या व्यतिरिक्त शासकीय कामकाजाच्या दिवशीच हा अर्ज दाखल करता येईल.

नामनिर्देशन पत्रांची छाननी 26 मार्च रोजी सकाळी 11 वाजेपासून जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर येथे सुरू करण्यात येईल. ज्या उमेदवारांना आपले अर्ज मागे घ्यायचे असेल त्यांना 28मार्च 2019 रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात तसा अर्ज सादर करता येईल. 11 एप्रिल रोजी निवडणूक घ्यायची झाल्यास सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान घेण्यात येईल, अशी निवडणुकीची सूचना आज मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी जारी केली आहे.
निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार हे नामनिर्देशनपत्रे 25 मार्च 2019 पर्यंत (सार्वजनिकसुटीव्यतिरीक्त)सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत स्विकारले जाणार आहेत. उमेदवारांना नामनिर्देशन पत्र विहीत नमुना 2 –अमध्ये सादर करणे आवश्यक आहे. उमेदवार मान्यताप्राप्त राजकीय पक्षाचे असल्यास एक प्रस्तावक आवश्यक आहे. सदर प्रस्तावक हा संबंधीत लोकसभा मतदारसंघाचा मतदार असावा. स्वतंत्र व मान्यताप्राप्त नसलेल्या पक्षाचा उमेदवार असल्यास त्यांना 10 प्रस्तावक असणे आवश्यक आहे. व तो नामनिर्देशनपत्र ज्या लोकसभा मतदारसंघातून भरणार आहे. त्या लोकसभा मतदारसंघातील मतदार असणे आवश्यक आहे.

नामनिर्देशन पत्रासोबत निवडणूक आयोगाचे आदेशानुसार विहीत प्रपत्रातील प्रपत्र 26 (भाग-अ, भाग-ब आणि सत्यापण)चे शपथपत्र शपथआयुक्त किंवा प्रथमश्रेणी दंडाधिकारी किंवा लेख प्रमाणक यांच्यासमोर शपथबद्ध करणे आवश्यक आहे. शपथपत्रातील सर्व रकाने भरणे आवश्यक असून, कोणताही रकाना रिक्त ठेवू नये. कोणत्याही बाबींच्या संबंधात कोणताही रकाना न लिहिता रिक्त ठेवू नये. निरंक (Nil) किंवा लागू नाही (Not Applicable) किंवा माहित नाही (Not Known) असे त्या रकान्यामध्ये नमूद करावे. भारत निवडणूक आयोगाचे निर्देशानुसार शपथपत्रात भाग ‘अ’ मध्ये नमूद केलेल्या ठिकाणी ई-मेल आयडी, संपर्क दूरध्वनी क्रमांक, समाजमाध्यम खाते असल्यास नमूद करणे आवश्यक आहे.

ज्या लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवावयाची आहे, त्या मतदारसंघात उमेदवारांचे नाव नसल्यास ज्या मतदारसंघातील मतदार यादीत उमेदवाराचे नाव आहे, त्या मतदारसंघातील मतदार यादीची प्रमाणित प्रत नामनिर्देशन पत्रासोबत सादर करणे आवश्यक आहे. राष्ट्रीय पक्ष, राज्यस्तरीय पक्ष, मान्यता प्राप्त पक्षाचा उमेदवार असल्यास अ व ब फॉर्म नामनिर्देशन पत्रासोबत किंवा नामनिर्देशन पत्र सादर करावयाच्या अंतिम दिनांकास दुपारी 3 वाजेपर्यंत सादर करणे आवश्यक आहे. मतदारसंघ राखीव असल्यास नामनिर्देशन पत्रासोबत सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेले जातीचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. अमानत रक्कम सर्वसाधारण उमेदवारांसाठी 25 हजार व अनुसूचित जाती - जमातीसाठी 12 हजार 500 रुपयेप्रमाणे आवश्यक आहे. अनामत रक्कम रोख किंवा रिझर्व बँक ऑफ इंडिया, शासकीय कोषागार येथे चालानद्वारे भरावी, धनादेश स्विकारले जाणार नाही. नामनिर्देशन पत्रासोबत रोख रक्कमेची पावती, चालान सादर करणे आवश्यक आहे. एक व्यक्ती जास्तीत-जास्त चार नामनिर्देशन पत्रे सादर करु शकतात.

तसेच एक व्यक्ती जास्तीत जास्त दोन लोकसभा मतदार संघातून नामनिर्देशन पत्र सादर करु शकतात. नामनिर्देशन पत्र सादर करतांना उमेदवार व इतर जास्तीत - जास्त चार व्यक्ती असे एकूण जास्तीत-जास्त पाच व्यक्ती निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कक्षात हजर राहू शकतात. नामनिर्देशन पत्र सादर करण्यासाठी येणारे व्यक्ती कमाल तीन वाहनांच्या मर्यादेस अधीन राहून निवडणूक निर्णय अधिकारी यांचे परिसरात वाहने आणू शकतात. (100 चौ.मी. परिसर) निवडणूक खर्चाचे नियंत्रण सुलभ व्हावे, म्हणून उमेदवाराने नामनिर्देशन पत्र सादर करावयाच्या किमान एक दिवस अगोदर बँकेत स्वत:चे नावे व फक्त निवडणूक खर्चासाठी खाते उघडणे आवश्यक आहे व सदर खाते क्रमांकाची माहिती नामनिर्देशन पत्रासोबत लेखी स्वरुपात निवडणूक निर्णय अधिकारी यांना देणे आवश्यक आहे. सोमवार, दि.25 मार्च रोजी दुपारी 3 वाजेपर्यंतनामनिर्देशन पत्रे स्विकारली जातील. 

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.