चंद्रपूर/ललित लांजेवार:
२०१९ चे लोकसभा निवडणुकीचे कॉंग्रेसचे उमेदवार असलेले बाळू धानोरकर यांनी शिवसेना पक्षातील आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर युतीचा धर्म पाळण्यासाठी शिवसेना अधिकच आक्रमक झाल्याचे दिसत आहे.शुक्रवारी चंद्रपूर शहरात पक्षाच्या झालेल्या बैठकीत, पाठीत खंजिर खुपसणाऱ्यांना धडा शिकवा,असे आवाहन शिवसैनिकांना करण्यात आले.
युतीच्या विरोधात जाणाऱ्याविरुद्ध कडक कारवाई केली जाईल, अशी भूमिका या बैठकीत घेण्यात आली.या बैठकीला भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार हंसराज अहीर, चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे संपर्क प्रमुख सुरेश सावंत, जिल्हा प्रमुख संदीप गिऱ्हे, नितीन मत्ते, यवतमाळचे जिल्हाप्रमुख विश्वास नांदेकर यांच्यासह चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यातील पक्षाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
मागील दोन दशकापासून कट्टर शिवसैनिक म्हणून बाळू धानोरकर यांचा चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा विधानसभा व यवतमाळ जिल्ह्यातील वणी विधानसभा मतदारसंघ,आर्णी विधानसभा मतदारसंघ यात चांगलाच दबदबा होता.मात्र शिवसेनेने भाजपसोबत युती केली,आणि युतीवरून नाराज बाळू कॉंग्रेसमध्ये आले.बाळू धानोरकरांच्या येण्याने अहिरांवर नाराज असलेले छोटे मोठे कार्यकर्ते हे सर्व कॉंग्रेस पक्षात गेले,त्यामुळे चंद्रपुरात सध्या अहिरांच्या धक्का लागलेल्या सीटला सावरण्यासाठी व युतिचा धर्म टिकविण्यासाठी अहीर यांच्या प्रचारासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होण्याची चिन्हे दिसत आहे. यासाठी तसे उद्धव ठाकरे यांचा वेळ देखील घेण्याचे प्रयत्न सुरु आहे.पक्षप्रमुख उद्धव ठाकरे स्वतः येत असल्याने दोन्ही तबल्यावर हात ठेवणाऱ्या कार्यकर्ते सध्या घाबरलेले आहे.तर कॉंग्रेसकडून देखील भाजपवर नाराज काही कार्यकर्ते अंतर्गत कॉंग्रेसकडे खेचल्या जात असल्याचे समजते आहे, त्यामुळे येणाऱ्या दिवसात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले राहणार आहे,