Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, फेब्रुवारी १८, २०१९

बाबुपेठ नगिनाबाग येथे ४ कोटींच्या विकास कामांचे भूमिपूजन



बाबुपेठ येथील सुसज्ज स्टेडीयमचा तरुणांनी लाभ घ्यावा
 - ना.सुधीर मुनगंटीवार


चंद्रपूर - काश्मीरमध्ये झालेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. संपूर्ण देश या प्रसंगी भारतीय सैन्यदलांच्या पाठीशी उभा आहे. आपली देशभक्ती, देशाप्रतीची भावना सदैव जागरूक ठेवा. आपण जे कार्य करतो ते प्रामाणिकपणे करून त्याचा देशाला कसा लाभ होईल याचा विचार करण्याची वेळ आलेली आहे. केंद्र व राज्य शासनाच्या सर्व योजना सामान्य जनतेपर्यंत पोहचवून त्यांच्या आयुष्यात बदल आणण्यासाठी आपण सर्वानी प्रयत्न करायला हवे. भारत मातेच्या प्रगतीसाठी, उन्नतीसाठी सिद्ध होण्याचे आवाहन राज्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

चंद्रपूर शहर महानगरपालिका अंतर्गत कोट्यावधीच्या विकास कामांचा भूमिपूजन व लोकार्पण सोहळा दि. १७ फेब्रुवारी रोजी मा. पालकमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते पार पडला. महापौर अंजली घोटेकर व आयुक्त संजय काकडे यांच्या मार्गदर्शनात वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी विशेष अनुदान निधीअंतर्गत विविध विकास कामे राबविली जात आहेत, त्या कामांचा भूमिपूजन व लोकार्पण सोहळा बाबुपेठ स्टेडिअमवर महानगरपालिकेतर्फे आयोजित करण्यात आला होता. यात बाबुपेठ येथील सुसज्ज अश्या श्री अटल बिहारी वाजपेयी क्रीडा स्टेडीयमचे लोकार्पण करण्यात आले. तसेच नगिनाबाग प्रोफेसर कॉलनी येथील समाजभवन बांधकामाचे व संत कंवरराम चौक ते ईरई नदी पर्यंत पथदिवे लावण्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला शहीद जवानांना श्रद्धांजली व्यक्त करण्यात आली. यावेळी युवकांशी संवाद साधतांना पालकमंत्री यांनी पुलवामा घटनेचा उल्लेख करून त्यांनी सर्वप्रथम शहीद सैनिकांच्या प्रती संवेदना व्यक्त केल्या. सीमेवर झालेल्या दुर्घटनेनंतर सर्व कार्यक्रम रद्द करण्याचा आपला मानस होता मात्र जनतेच्या सुविधांसाठी विकास कार्ये सुरु करणे व ती लवकरात लवकर पूर्ण होतील याची काळजी घेणे, हे देशभक्तीचेच काम आहे. आपले जवान लढत असताना एक नागरिक म्हणून आपली जबाबदारी अधिक प्रामाणिकपणे पार पडणे आपले कर्तव्य आहे.

जिल्ह्याचा, शहराचा विकास व्हावा यासाठी आम्ही शक्तीने काम करतो आहे. येत्या दीड वर्षात भव्यदिव्य असे मेडिकल कॉलेज चंद्रपूरला सुरु होणार आहे. टाटा ट्रस्टने दिलेल्या निधीतून २०० कोटीचे टाटा कॅन्सर हॉस्पीटल आपल्या शहरात बनणार आहे. संपूर्ण भारतात केवळ वाराणसी व चंद्रपूर येथेच हे कॅन्सर हॉस्पीटल बनणार आहे. बॉटनीकल गार्डन, स्किल यूनिव्हर्सिटी, वन अकादमी, पोंभुर्ण्यात १०० टन अगरबत्ती बनवण्याचा उद्योग सुरु होतो आहे, चायना कडून आवक करण्याऐवजी आपल्या गावात निर्माण झालेली अगरबत्ती आता आपल्या देवघरात असेल. साधी दातकोरणी सुद्धा आपल्याकडे कोरियाकडून आयात करावी लागायची मात्र ती आता आपल्या देशात बनणार आहे.

बाबुपेठ येथील स्टेडियमचे स्वरूप पाहून हा पूर्वी हागणदारी परिसर म्हणून ओळखला जायचा यावर कुणाचाही विश्वास बसणार नाही. बाबुपेठ परिसरातील लोकांनी स्टेडियमची व्यवस्थीत काळजी घेतल्यास तरुण खेळाडूंना कुठल्याही सुविधेची कमतरता पडू देणार नसल्याची ग्वाही त्यांनी दिली. परिसरात होणाऱ्या विकास कामांकडे या वार्डातील नागरिकांनी देखील आत्मीयतेने लक्ष वेधावे. त्याचा दर्जा उत्तम राखला जातो अथवा नाही याबाबत जागरूक असावे. श्री बजरंग व्यायाम प्रसारक मंडळ यांच्या मागणीनुसार शक्ती देवता हनुमानाची भव्य मूर्ती क्रीडांगणात उभारण्यात येणार आहे. सबका साथ सबका विकास या धोरणानुसार स्थानिक रहिवासींच्या हिताला धक्का ना पोहचविता बाबुपेठ उड्डाण पुलाची निर्मिती करण्यात येणार आहे

यावेळी उपस्थित युवकांना काश्मीर मध्ये घडलेल्या घटनेचा उल्लेख करून ते म्हणाले, प्रधानमंत्री यांनी सीमेच्या पलीकडे असणाऱ्या आतंकवादी संघटनांचा खात्मा करण्याचे स्पष्ट केले आहे. सैन्यदल आपले काम चोख बजावेल यावर विश्वास ठेवा .या जिल्ह्यामध्ये १ जुन पासून विसापूर नजीक भारतातील सर्वात सुंदर सैनिक शाळा सुरू होत आहे. या सैनिक शाळेमध्ये बाबुपेठमधील ज्यास्तीत ज्यास्त तरुणांचा प्रवेश होईल अशी बाबुपेठवासीयांकडून अपेक्षा आहे.

मिशन शक्ती लवकरच सुरू होत असून त्या माध्यमातून ऑलिम्पिक क्रीडा प्रकारांमध्ये चंद्रपूरच्या मुलांकडून ऑलिम्पिक पदकाची आपण अपेक्षा करीत आहोत. मिशन मंथन, मिशन सेवा, मिशन सारथी अश्या गेल्या चार वर्षात सुरू करण्यात आलेल्या विविध योजनांचा युवकांनी लाभ घेण्याचे आवाहन केले . बाबुपेठ परिसरातील या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते

बाबुपेठ परिसरातील कार्यक्रमाच्या व्यासपीठावर आमदार नानाभाऊ शामकुळे, महापौर अंजलीताई घोटेकर, वर्ध्याचे आमदार पंकज भोयर, , उपमहापौर अनिल फुलझेले, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगडे ,स्थायी समिती सभापती राहुल पावडे, आयुक्त संजय काकडे, समाजकल्याण सभापती ब्रिजभूषण पाझारे, , सभागृह नेता वसंत देशमुख, महिला व बालकल्याण सभापती जयश्री जुमडे, झोन १ सभापती माया उईके, झोन १ सभापती स्वामी कनकम, यांच्यासोबतच नगरसेविका नीलम आक्केवार, कल्पना बगुळकर, ज्योती गेडाम, शिलाताई उईके, सहायक आयुक्त विजय देवळीकर, विजय बोरीकर, महेश बारई, अनिल घुमडे, सुहास अलमस्त उपस्थित होते.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.