Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

महाराष्‍ट्र लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
महाराष्‍ट्र लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, डिसेंबर २१, २०२२

जीवती तालुका वनक्षेत्रातून वगळण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठविणार: सुधीर मुनगंटीवार Maharashtra Vidarbha Chandrapur Sudhir Mungantiwar

जीवती तालुका वनक्षेत्रातून वगळण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठविणार: सुधीर मुनगंटीवार Maharashtra Vidarbha Chandrapur Sudhir Mungantiwar




नागपूर, दि. 21 डिसेंबर 2022:
जीवती तालुका वनक्षेत्रातून वगळण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठविण्याचा निर्णय आज वनमंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. तालुक्यातील 11 गावातील 8195 हेक्टर जमिन वनखंडात समाविष्ट नसून ती जमिन वनक्षेत्रातून बाहेर असल्याची घोषणाही लवकरच करण्यात येणार आहे.

हरिसिंग वनसभागृहात यासंदर्भात झालेल्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले. या बैठकीत वन विभागाचे प्रधान सचिव वेणुगाेपालजी रेड्डी, प्रधान मुख्य वनबल प्रमुख वायएलपी राव जी, विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी जी बिद्री, चंद्रपूर जिल्हाधिकारी विनयजी गौडा, भाजपा जिल्हाध्यक्ष देवरावजी भोंगळे, माजी आमदार संजयजी धोटे, माजी आमदार सुदर्शनजी निमकर, केशवजी गिरमाजी, महेशजी देवकते यांच्यासह चंद्रपूर जिल्हा आणि जीवती तालुक्यातील प्रमुख कार्यकर्ते आणि वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.

केंद्र सरकारकडे असा विनंती अर्ज करण्यासाठी सर्व प्रशासकीय तयारी गतीने पूर्ण करण्याचे निर्देश या बैठकीत ना.श्री सुधीर मुनगंटीवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. तालुक्याचे उपग्रह सर्वेक्षण मॅपिंग करून घेण्याचे आणि ती अद्यावत माहिती पुढील नियोजनासाठी उपयोगात आणावी असेही निर्देश श्री मुनगंटीवार यांनी दिले. ही सर्व कामे कालबद्ध पद्धतीने पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

Maharashtra Vidarbha Chandrapur Sudhir Mungantiwar
दोन लाखांची खंडणी मागताना मनसे सेनापती सापडला | MNS Vidarbha-Aditya Durugkar

दोन लाखांची खंडणी मागताना मनसे सेनापती सापडला | MNS Vidarbha-Aditya Durugkar

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी तीन महिन्याआधी विदर्भाचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी ग्राऊंड लेव्हलवरची परिस्थिती जाणून घेतली आणि कार्यकारिणी बरखास्त केली आणि घटस्थापनेला नवीन कार्यकारिणी स्थापन करण्याची घोषणा केली. त्यानुसार मुंबईत झालेल्या बैठकीत जुन्यांपैकी तिघांना डच्चू देत विद्यार्थी सेनेचे विदर्भ (Vidarbha) प्रमुख आदित्य दुरुगकर (Aditya Durugkar) यांना नागपूर (Nagpur) ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष म्हणून बढती दिली. मात्र, एका दुकानदाराला दोन लाखांची खंडणी मागणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जिल्हाध्यक्ष आदित्य दुरुगकरला गावकऱ्यांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.




ही घटना उमरेड तालुक्यातील कुही येथे घडली. दुरुगकर हा चार-पाच कार्यकर्त्यांना घेऊन कुही गावात गेला. आम्ही अन्न व प्रशासन विभागाचे (एफडीए) अधिकारी आहोत, असे सांगून एका दुकानाची झाडाझडती घेतली. दुकानात सुगंधी तंबाखू आढळल्याचे सांगून दोन लाखांची खंडणी मागितली. दुकानदाराला खरंच अधिकारी असल्याचे समजले. ३० हजार रुपये देण्याची त्याने तयारी दर्शवली. दुकानात धाड पडल्याने गावकरीसुद्धा येथे गोळा झाले होते. या दरम्यान दुकानात नेहमी येणारा डेली कलेक्शन करणारा एक व्यक्ती आला. त्याने अधिकारी असल्याचा पुरावा मागितला. आपले बिंग फुटत असल्याचे बघून दुरुगकर सोबत असलेले कार्यकर्ते पळून गेले. मात्र दुरुगकर गावकऱ्यांच्या तावडीत सापडला. त्यांनी दुरुकरला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. यामुळे मनसेमध्ये एकच खळबळ उडाली. बदनामी टाळण्यासाठी काही प्रदेशच्या पदाधिकाऱ्यांनी तातडीने हालचाली करून प्रकरण दडवण्याचे प्रयत्न केले. एक बडा पदाधिकारी पोलिस उप अधीक्षकाच्या संपर्कात असून गुन्हा दाखल होऊ नये याकरिता दबाव टाकत आहे. दुरुगकर याच्यावर यापूर्वीसुद्धा खंडणी मागण्याचे आरोप आहेत. अलीकडेच मनसेच प्रमुख राज ठाकरे यांनी नागपूर जिल्हा (ग्रामीण) दुरुगकर यास बढती देऊन जिल्हाध्यक्ष केले आहे.
जिल्‍हा स्‍टेडियम येथे जलतरण तलावासाठी १ कोटी ५७ लक्ष १५ हजार रू. निधी मंजूर

जिल्‍हा स्‍टेडियम येथे जलतरण तलावासाठी १ कोटी ५७ लक्ष १५ हजार रू. निधी मंजूर

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने जिल्‍हा स्‍टेडियम येथे जलतरण तलावासाठी १ कोटी ५७ लक्ष १५ हजार रू. निधी मंजूर

*माजी उपमहापौर राहूल पावडे यांनी मानले पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आभार.




वने, सांस्‍कृतीक कार्य, मत्‍स्‍यव्‍यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्‍हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने चंद्रपूर जिल्‍हा क्रिडा संकुल येथील जलतरण तलावाचे फिल्‍टरेशन प्‍लॅन्‍ट व विद्युतीकरण करणे या कामासाठी १ कोटी ५७ लक्ष १५ हजार रू. निधी मंजूर करण्‍यात आला आहे. सर्वसाधारण जिल्‍हा वार्षीक योजना सन २०२२-२३ अंतर्गत या कामाला दिनांक २० डिसेंबर २०२२ रोजीच्‍या पत्रान्‍वये जिल्‍हाधिकारी चंद्रपूर यांनी प्रशासकीय मान्‍यता प्रदान केली आहे.

चंद्रपूर जिल्‍हा क्रिडा संकुल येथील जलतरण तलावाबाबत नागरिकांच्‍या अनेक तक्रारी होत्‍या. यासंदर्भात चंद्रपूर महानगरपालिकेचे माजी उपमहापौर राहूल पावडे यांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना निवेदन देत निधी मंजूरीसाठी सातत्‍याने पाठपुरावा केला. त्‍यांच्‍या पाठपुराव्‍याला यश प्राप्‍त झाले असून सुधीर मुनगंटीवारांच्‍या पुढाकाराने जलतरण तलावाचे फिल्‍टरेशन प्‍लॅन्‍ट व विद्युतीकरणाच्‍या कामासाठी १ कोटी ५७ लक्ष १५ हजार रू. मंजूर करण्‍यात आला आहे.

यामुळे चंद्रपूर महानगरातील जलतरण पटूंची समस्‍या कायमची दूर होणार असून त्‍यांच्‍यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. चंद्रपूर महानगरपालिकेचे माजी महापौर राहूल पावडे यांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे अभिनंदन व आभार व्‍यक्‍त केले आहे.
नवेगावबांध ग्रामपंचायतमध्ये भाजपाचा किल्ला ढासळला

नवेगावबांध ग्रामपंचायतमध्ये भाजपाचा किल्ला ढासळला



सरपंचपदी काँग्रेसच्या हिराबाई पंधरे.काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीकडे सत्तांतर.

संजीव बडोले प्रतिनिधी.
नवेगावबांध दि.२१ डिसेंबर:-
परिसरातील सर्वात मोठी ग्रामपंचायत समजल्या जाणाऱ्या नवेगावबांध ग्रामपंचायतच्या सरपंच पदासह १७ सदस्यांच्या निवडणुकीचा निकाल हाती आला असून, गेल्या पंधरा वर्षापासून चा भारतीय जनता पक्षाचा किल्ला यंदा ढासळला असून,या निवडणुकीत प्रस्थापितांविरुद्ध भारतीय राष्ट्रीय काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष  या आघाडीला घवघवीत यश यंदा मिळाले आहे. ग्रामपंचायतला स्वतःची मक्तेदारी समजणार्‍या  विद्यमान सदस्यांना मतदारांनी त्यांना त्यांची जागा दाखवून दिली. सरपंच पदासह आघाडीला ११ जागा, १ अपक्ष व भारतीय जनता पक्ष समर्थित विकास पॅनलला ५ जागा मिळाल्या आहेत. सरपंच पदावर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या हिराबाई नीलमचंद पंधरे या विजयी झाल्या आहेत. तर प्रभाग क्रमांक २ मधून भारतीय जनता पक्षाचे दिग्गज व किंगमेकर म्हणून ओळखले जाणारे, माजी सरपंच व विद्यमान उपसरपंच रघुनाथ लांजेवार,प्रभाग ६ मधून संजय उजवणे यांचा या निवडणुकीत यंदा दारूण पराभव झाला आहे. त्यांच्या पराभवाने भाजपा प्रणित विकास पॅनलला फार मोठा धक्का बसला आहे.रघुनाथ लांजेवार यांचे पारंपारिक प्रतिस्पर्धी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे देवाजी कापगते यांचा विजय झाला आहे.
 प्रभाग २ व ६ ची निवडणूक लक्षवेधी होती.संपूर्ण गावाचे लक्ष या निवडणुकीत या प्रभागाकडे लागले होते. 
सरपंच पदाच्या निवडणूक साठी एकूण  ५ उमेदवार रिंगणात होते. सरपंच पदासाठी ६ प्रभागामध्ये ही निवडणूक चुरशीची  झाली होती.१८ डिसेंबरला झालेल्या निवडणुकीत उमेदवारांची भवितव्य ईव्हीएम पेटीत बंद झाले होते.
सरपंच पदासाठी एकूण ५ उमेदवार रिंगणात होते. सहाही प्रभागात सरपंच पदा साठी चुरशीची लढत झाली होती. 
काँग्रेसच्या हिराबाई नीलमचंद पंधरे यांनी भारतीय जनता पक्षाच्या इंदू डीडेश्वर पंधरे  व माजी सरपंच खंबायती मडावी यांचा पराभव करून, विजयी झाल्या. यात माजी सरपंच खांबाबाई राजेंद्र मडावी, अपक्ष उमेदवार डिंपल दिलीप पंधरे ह्या पराभूत झाल्या. 


प्रभाग क्रमांक १ मधून 
सर्वसाधारण पुरुष गटातून अपक्ष उमेदवार प्रेमचंद चांदेवार यांनी काँग्रेसचे दिग्गज जगदीश पवार, भाजपाचे हितेंद्र राऊत यांच्यात झालेल्या तिरंगी लढतीत पराभूत केले आहे. दोन्ही पक्षाच्या मातब्बर उमेदवारांना हरवून प्रेमचंद चांदेवार यांनी बाजी मारली.सर्वसाधारण महिला राखीव गटातून भारतीय जनता पक्षाच्या सीमा योगेश बडोले यांनी काँग्रेसच्या सुप्रिया हितेंद्र डोंगरे यांचा पराभव करून विजय मिळविला.
अनुसूचित जमाती गटातून  काँग्रेसचे विजय नीलकंठ कुंभरे यांनी भारतीय जनता पक्षाचे बाबुराव तुळशीराम कोरेटी, अर्चना संतोष मलगाम यांचा पराभव करून विजय मिळविला आहे.
प्रभाग २ मध्ये अनुसूचित जमाती महिला राखीव गटातून भाजपाच्या सुरेखा येळाम यांनी विजय मिळवला. त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वर्षा पुराम, वृंदा सयाम यांना पराभूत केला.तर सर्वसाधारण महिला गटातून  भाजपाच्या मीना पहाडे यांनी काँग्रेसच्या जयश्री लोकेश पसीने व शालू झोळे
यांचा पराभव केला. 
प्रभाग क्रमांक ३ मध्ये नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग या गटातून भारतीय जनता पक्षाचे अशोक हांडेकर यांचा पराभव करून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पितांबर काशीवार विजयी झाले आहे.अनुसूचित जमाती महिला गटातून भाजपाच्या शितल पुसाम यांचा पराभव करून,भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या सरिता नाईक विजयी झाल्या आहेत. 
प्रभाग क्रमांक ४ मधून सर्वसाधारण गटातून भारतीय जनता पक्ष प्रणित विकास पॅनलचे रेशीम काशीवार निवडून आले आहेत. त्यांनी महाविकास आघाडीचे  ऋषी पुस्तोडे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शैलेश शर्मा. यांचा पराभव केला. अनुसूचित जाती महिला गटातून प्रियंका निलेश सांगोळकर ह्या विजयी झाल्या,त्यांनी भाजपाच्या उमेदवार उषा राजेंद्र साखरे  यांचा पराभव केला. सर्वसाधारण महिला गटातून काँग्रेसच्या दुर्गा दीपक शहारे ह्या विजय झाल्या असून,त्यांनी भाजपाच्या दीपलता विलास राऊत यांच्या पराभव केला
प्रभाग क्रमांक ५ मध्ये झालेल्या तिरंगी लढतीत  सर्वसाधारण गटातून राष्ट्रवादी काँग्रेसचे व माजी सरपंच लीना डोंगरवार यांचे पती रमेश डोंगरवार यांनी भाजपाचे नितेश्वर मस्के व आघाडी पॅनल चे
धनंजय डोंगरवार यांचा पराभव करून विजय संपादन केला आहे. अनुसूचित जाती महिला गटातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या हेमलता बडोले यांनी भाजपाच्या पल्लवी भूमके यांना पराभूत करून विजय संपादन केले. तर सर्वसाधारण राखीव महिला गटातून कांग्रेसचे जयश्री पशीने यांचा पराभव झाला असून भाजपाच्या पूजा कापगते यांचा विजय झाला आहे.प्रभाग क्रमांक दोन प्रमाणे प्रभाग क्रमांक सहा ची निवडणूक रंगतदार, चुरशीची व लक्षवेधी आहे.
प्रभाग क्रमांक ६ मधून सर्वसाधारण पुरुष गटातून भारतीय जनता पक्षाचे राकेशकुमार  कोल्हे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे  उमेदवार दिलीप शिपानी व काँग्रेस पक्षाला सोडचिट्टी देऊन महाविकास आघाडीचे उमेदवार, संजय उजवणे यांच्यात झालेल्या तिरंगी काट्याच्या  लढतीत काँग्रेस पक्षाचे दिलीप शिपानी यांनी ही जागा स्वतः कडे खेचून आणली.प्रभाग क्रमांक २ प्रमाणेच प्रभाग क्रमांक ६ मध्ये कोण बाजी मारतो याकडे  साऱ्या गावकऱ्यांचे लक्ष लागले होते.विद्यमान ग्रामपंचायत सदस्य संजय उजवणे हे तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उभे होते.हम करे शो कायदा त्यांच्या चांगलेच अंगलट आल्याचे दिसून आले.ग्रामपंचायतचे किंग मेकर म्हणून,त्यांना गावात ओळखले जाते.मात्र या निवडणुकीत मतदारांनी त्यांना चांगलाच दणका दिला.  मतदारांची  नाराजी त्यांनी ईव्हीएम मधून दाखवून दिली. दिलीप शिपानी यांच्यामुळे एक प्रबळ उमेदवार म्हणून मतदारांना एक नवीन पर्याय मिळाला आहे. गावात एक मनमिळाऊ,गरजेच्या वेळी धावून जाणारे सामाजिक कार्यकर्ते,असे दिलीप उर्फ बबलू शिपानी यांची ओळख असून,ऐनवेळी मतदारांच्या कल शिपानी यांच्याकडे झुकल्यास नवल वाटू नये.
अनुसूचित जाती गटातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे चेतन साखरे,भाजपाचे नवीनकुमार उके, ईश्वर शहारे यांचा पराभव करून काँग्रेस पक्षाचे  लेनीन राऊत यांनी या प्रभागात विजय मिळवला आहे. 
ग्रामपंचायत करिता झालेल्या निवडणुकीत अर्जुनी मोरगाव तालुक्यातील सर्वात मोठ्या नवेगाव बांध ग्रामपंचायत मध्ये भारतीय जनता पार्टीला धूळ चाखवून मतदारांनी ग्रामपंचायत मधून भाजपाकडून काँग्रेस राष्ट्रवादीकडे सत्तांतर केले आहे.काँग्रेस पक्षाच्या हिराबाई नीलमचंद पंधरे या थेट जनतेतून सरपंच पदाकरिता निवडणूक जिंकल्या तर उपसरपंच पदासाठी राष्ट्रवादीच्या उमेदवाराची वर्णी लागणार?अशी चर्चा आहे. विशेष म्हणजे नवेगावबांध या ग्रामपंचायत निवडणुकीत मतदारांनी प्रस्थापितांना धक्के देत पराभवाचा दणका देत सत्तांतर घडवून आणला आहे.मतदारांनी  नवख्या उमेदवारांना संधी दिली आहे.आमच्या शिवाय ग्रामपंचायत चालूच शकत नाही, आमचीच गरज आहे?या अहंकारी वृत्ती बाळगणाऱ्या उमेदवारांना जनतेने मतदान नाकारून विद्यमान सत्तापिपासुना सत्तेच्या बाहेर फेकले आहे.विशेष म्हणजे या निवडणुकीने गावामध्ये गावकऱ्यांना नवचैतन्य आले असून, परिवर्तन झाल्याने जनतेमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. ग्रामपंचायत मधील गैर कारभार  निर्वाचित सरपंच व सदस्या कडून दूर होण्याची व स्वच्छ प्रशासन ची आशाबाळगून  नवेगावबांधवांसीयांनी सर्व नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचे स्वागत करीत समाधान व्यक्त केले आहे. सरपंचासह सर्व सदस्य येत्या पाच वर्षाच्या काळात नागरिकांच्या अपेक्षांची पूर्ती करतात की कसे याबाबत गावकरी अपेक्षा ठेवून आहेत.
बोगस आदिवासी प्रश्नी जुन्नर मध्ये राज्यस्तरीय एल्गार परिषद | Elgar Parishad in Junnar on bogus tribal question

बोगस आदिवासी प्रश्नी जुन्नर मध्ये राज्यस्तरीय एल्गार परिषद | Elgar Parishad in Junnar on bogus tribal question

बोगस आदिवासी प्रश्नी जुन्नर मध्ये राज्यस्तरीय एल्गार परिषद

बोगस आदिवासी प्रश्नी जुन्नर मध्ये राज्यस्तरीय एल्गार परिषद
बोगस आदिवासी प्रश्नी जुन्नर मध्ये राज्यस्तरीय एल्गार परिषद


जुन्नर /आनंद कांबळे

: आदिवासींचे खोटे जमात प्रमाणपत्र सादर करून अनेकांनी सरकारी नोकऱ्या बळकावलेल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अशा लोकांची नोकरीतून हकालपट्टी करणे आवश्यक आहे. ज्या खऱ्या आदिवासींसाठी संविधानाने आरक्षण दिलेले आहे, त्यांना त्यांच्या अधिकारांपासून वंचित ठेऊन त्या जागा बळकावणे म्हणजे संविधानाच्या प्रती गुन्हा आहे. कोणतेही सरकार एखादा शासन निर्णय किंवा परिपत्रक काढून अशा बोगस व्यक्तींना संरक्षण देऊ शकत नाही असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे नोंदविले आहे. असे असूनही राज्यात अशा बोगस आदिवासींना संरक्षण देणारा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने घेतला आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, किसान सभा, जनवादी महिला संघटना, सिटू, डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया व स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया, सरकारच्या, या कृतीचा धिक्कार करत आहे. या निर्णयाविरोधात नवीन कांदा मार्केट, जुन्नर येथे दिनांक 23 डिसेंबर 02022 रोजी भव्य राज्यस्तरीय एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे तालुका सचिव गणपत घोडे व किसान सभेचे जिल्हा सचिव विश्वनाथ निगळे यांनी दिली.

या परिषदेस मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे डहाणू चे आमदार विनोद निकोले, किसान सभेचे नेते माजी आमदार जे. पी. गावीत, माकपचे राज्य सरचिटणीस डॉ. उदय नारकर, किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले, तलासरी नगरपंचायत चे सभापती नंदकुमार हडाळ, सुरगाणा पंचायत समिती माजी सभापती इंद्रजित गावित, माकपचे जिल्हा सचिव गणेश दराडे, स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाचे राज्य अध्यक्ष सोमनाथ निर्मळ, आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंचाचे संजय साबळे आदींसह उपस्थित रहाणार आहेत.

राज्यात समोर आलेल्या आकडेवारीनुसार राज्यात १२,५०० पदांवर बोगस लोकांना आदिवासी आरक्षणाचा लाभ देण्यात आला आहे. संघटनांनी व जागरूक नागरिकांनी आवाज उठविल्यानंतर यापैकी केवळ ३,०४३ पदे रिक्त करण्यात आली आहेत. रिक्त केलेल्या या पदांपैकी केवळ ६१ पदे भरण्यात आलेली आहेत. उर्वरित ९,४५७ पदे रिक्त करून ही पदे खऱ्या आदिवासींमधून भरण्याबाबत निर्णय शासनाकडून त्वरित घेण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे. राज्यव्यापी आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी ही परिषद होत असून राज्यभरातून मोठ्या संख्येने प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.

शनिवार, जुलै १६, २०२२

‘‘स्‍वातंत्र्याच्‍या अमृत महोत्‍सवी’’ नि‍मित्‍य भारतीय राष्‍ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्‍या वतीने  1 लक्ष वृक्ष लागवडीच्‍या कार्यक्रम |

‘‘स्‍वातंत्र्याच्‍या अमृत महोत्‍सवी’’ नि‍मित्‍य भारतीय राष्‍ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्‍या वतीने 1 लक्ष वृक्ष लागवडीच्‍या कार्यक्रम |

‘‘स्‍वातंत्र्याच्‍या अमृत महोत्‍सवी’’ नि‍मित्‍य भारतीय राष्‍ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्‍या वतीने

1 लक्ष वृक्ष लागवडीच्‍या कार्यक्रम


नागपूर, 15 जुलै 2022

 

       ‘‘स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी’’ नि‍मित्य भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने

1 लक्ष वृक्ष लागवडीचा कार्यक्रम रविवार दिनांक 17 जुलै 2022 रोजी सकाळी 7.30 वाजता लक्ष्‍मीनारायण इन्सि्टटयूट ऑफ टेक्‍नॉलॉजी (एलआयटी) परिसर, भरत नगर समोर, अमरावती रोड येथे आयोजित करण्‍यात आले आहे.

     याप्रसंगी केंद्रीय रस्‍ते परिवहन आणि महामार्ग मंत्री श्री. नितीन गडकरी यांच्‍या शुभ हस्‍ते वृक्ष लागवडीचा कार्यक्रम होईल.

     या कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी श्री. देवेन्‍द्र फडणवीस, उपमुख्‍यमंत्री, महाराष्‍ट्र राज्‍य राहतील तर सम्‍माननीय अतिथी म्‍हणून डॉ. सुभाष चौधरी, कुलगुरू, राष्‍ट्रसंत तुकडोजी महाराज नागपुर विद्यापीठ, नागो गाणार, वि.प. सदस्‍य, प्रविण दटके, वि.प. सदस्‍य, एड. अभिजीत वंजारी, वि.प. सदस्‍य, चंद्रशेखर बावनकुळे, वि.प. सदस्‍य, तसेच आमदारव्‍दय कृष्‍णा खोपडे, डॉ. नितीन राऊत, विकास कुंभारे, मोहन मते, विकास ठाकरे आणि समीर मेघे उपस्थित राहतील.


1 Lakh Tree Plantation Program on behalf of National Highways Authority of India on the occasion of 'Swatantrya Amrit Mahotsavi'

 1 Lakh Tree Plantation in a Day Programme

 Shri Nitin Gadkari Union Minister of Road Transport & Highways, Govt. of India will begin The plantation programme


Laxminarayan Institute of Technology, (LIT) Premises, Opposite Bharat Nagar, Amravati Road, Nagpur



 

मंगळवार, जुलै ०५, २०२२

ऑगस्‍ट महिन्‍यात विधानसभा अध्‍यक्ष येणार चंद्रपूर दौ-यावर

ऑगस्‍ट महिन्‍यात विधानसभा अध्‍यक्ष येणार चंद्रपूर दौ-यावर


माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधानभेचे नवनिर्वाचित अध्‍यक्ष अॅड. राहूल नार्व्‍हेकर (Rahul narvekar) यांची भेट घेत त्‍यांचे अभिनंदन केले व यशस्‍वी कार्यकाळासाठी शुभेच्‍छा दिल्‍या. यावेळी बांबुपासून तयार करण्‍यात आलेला तिरंगा ध्‍वज  भेट देत आ. मुनगंटीवार यांनी विधानसभा अध्‍यक्षांचे स्‍वागत केले.


न्‍यायप्रियता हे विधानसभा अध्‍यक्षपदाचे शक्‍तीस्‍थळ आहे. हे शक्‍तीस्‍थळ जपत रामशास्‍त्री प्रभुणे यांचा आदर्श बाळगावा अशी अपेक्षा आ. मुनगंटीवार यांनी व्‍यक्‍त केली. विधानसभेच्‍या सार्वभौम व पवित्र सभागृहाच्‍या माध्‍यमातुन महाराष्‍ट्रातील सर्वच घटकांना न्‍याय मिळेल, उपेक्षित, वंचितांच्‍या आयुष्‍यात समृध्‍दीचा प्रकाश निर्माण होईल अशा पध्‍दतीचे सत्‍कार्य आपल्‍या हातुन घडावे असेही आ. मुनगंटीवार शुभेच्‍छा देताना म्‍हणाले. ऑगस्‍ट महिन्‍यात आपण चंद्रपूर दौ-यावर यावे असे निमंत्रण आ. मुनगंटीवार यांनी विधानसभा अध्‍यक्षांना दिले. अॅड. राहूल नार्व्‍हेकर यांनी आ. मुनगंटीवार यांचे निमंत्रण स्विकारत ऑगस्‍ट महिन्‍यात चंद्रपूर दौ-यावर येण्‍याचे मान्‍य केले.