Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, जुलै २९, २०२०

कोलामगुड्यांवरील आरोग्य व्यवस्था सुधारण्याची नितांत गरज : डाँ. श्रुती आष्टणकर




कोलाम विकास फाऊंडेशनतर्फे आरोग्य शिबिर

चंद्रपूर, ता.29 : माणिकगड पहाडावरील आदिम कोलाम समुदायात आरोग्याबाबत असलेली अनास्था ही अत्यंत गंभीर बाब असून, कोलामांच्या आरोग्यासाठी राबविली जाणारी व्यवस्था तोकडी व नादुरूस्त असल्याचे दुर्दैवी चित्र जिवती तालुक्यात पहावयास मिळते. ही व्यवस्था यथाशिघ्र दुरुस्त करण्याची गरज असल्याचे मत सामाजिक कार्यकर्त्या डाँ. श्रुती आष्टणकर यांनी व्यक्त केले आहे.
कोलाम विकास फाऊंडेशन तर्फे दिनांक 27 व 28 जुलै रोजी जिवती तालुक्यातील सितागुडा, भोक्सापूर, आनंदगुडा, खडकी, रायपूर, कलीगुडा व मारोतीगुडा या अतीदुर्गम व उपेक्षीत कोलामगुड्यांवर आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर घेण्यात आले. या शिबिरात लहान मुले, नवजात बालके, गर्भार माता, वयात आलेल्या युवती, महीला व वयस्क पुरूष असे सुमारे एकशे पस्तीस रूग्णांची तपासणी करून औषधोपचार करण्यात आले. यापैकी गर्भार मातांमध्ये पौष्टीक व सकस आहाराच्या कमतरतेमुळे अशक्तपणा व निस्तेजपणा तर लहान बालकांमध्ये कुपोषण आणि त्वचेचे व संसर्गाचे आजार मोठ्या प्रमाणात दिसून आले. वयात आलेल्या तरूणींमध्ये मासिक पाळी विषयक दोष व हीमोग्लोबीनची कमतरता असे प्रकार दिसून आले. अनेक तरूण व वयस्क नागरीकांना गंभीर आजाराने पछाळलेले असून, निरक्षरता व गरीबीमुळे असे रुग्ण उपचारापासून वंचित आहेत. अनेक गुड्यांवरील कोलामांना आरोग्य व्यवस्थेचा पुरेपुर लाभ मिळत नसल्याने आदिम कोलामांचा आरोग्याशी जिवघेणा संघर्ष सुरु असल्याचे दुर्दैवी चित्र जिवती तालुक्यात पहावयास मिळते. या बाबींची गंभीर दखल घेण्याची गरज असून, येथील आरोग्य व्यवस्था तातडीने सुधारण्याची नितांत गरज आहे. आंगणवाडी केंद्रांमधून दिले जाणारे सकस आहार नियमीतपणे व योग्य प्रमाणात पुरविण्याची गरज आहे. शारीरीक स्वच्छतेबाबतही मोठ्या प्रमाणात जाग्रुती करण्याची गरज असल्याचे या शिबिराच्या निमीत्ताने प्रकाशझोतात आले आहे.
कोलाम समुहातील मुलांचे बुध्दांक वाढीसाठी व माता-बाल संगोपनासोबतच दुर्धर आजारावरील उपचारासाठी विशेष उपक्रम राबविण्याची गरज असून, यासाठी कोलाम विकास फाऊंडेशन व जनसंघर्ष मंच लोकसहभागातून संयुक्तपणे उपक्रम राबविणार असल्याची भावना कोलाम विकास फाऊंडेशनचे अध्यक्ष विकास कुंभारे व जनसंघर्ष मंचचे अध्यक्ष दत्ता शिर्के यांनी मांडले आहे. लवकरच आरोग्यविषयक बाबींच्या निराकरणासाठी प्रशासकीय यंत्रणेसोबत नियोजन करण्याची गरज असल्याचेही विकास कुंभारे व दत्ता शिर्के यांनी सांगितले आहे.
या शिबिराच्या आयोजनाकरिता कोलाम विकास फाऊंडेशनचे अध्यक्ष विकास कुंभारे, सचिव मारोती सिडाम, जनसंघर्ष समिती नागपूरचे अध्यक्ष दत्ता शिर्के, अभिषेक सावरकर, महेश ढोबळे, बापूराव आत्राम, नानाजी मडावी यांनी परिश्रम घेतले.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.