गुजरातचा नवरदेव दवलामेटीच्या नवरीसोबत झाला लॉक
नागपूर:अरूण कराळे:
एप्रिल व मे शुभमंगल सावधानचा महीना असतांनाही चिननिर्मीत कोरोनामुळे मंगल कार्यालय सुनीसुनी पडली आहे. मात्र काही लोक संचारबंदीच्या काळातही ठरल्याप्रमाणे विवाह करत आहेत . त्यासाठी मग थाटमाट आणि गर्दीला फाटा देत लग्न उरकून घेत आहे .
हिंदू वैदिक संस्कृतीत सोळा संस्कारापैकी विवाह एक पवित्र संस्कार असून विवाह दोन आत्म्यांच्या मिलनासोबत दोन परिवाराला एकत्र आणणारा सोहळा आहे . त्यामुळे सहाजिकच विवाह सोहळा दोन्ही परिवाराकरिता आनंदोत्सव असल्यामुळे तो धुमधडाक्यात साजरा केला जातो . तोच सोहळा धुमधडाक्यात साजरा करण्यासाठी गुजरातमधील कटोदरा जि. सुरत येथील भावी नवरदेव आई ,वडील व मोठा भाऊ नागपूर तालुक्यातील दवलामेटी येथे ठरलेली भावी वधु दिक्षा सुनील पेंदाम यांच्या आईवडीलांकडे लग्नाचे कपडे काही वस्तुची देवाण घेवाण करण्यासाठी आले असता लॉकडाऊन मध्ये लॉक झाले .
मुलीची आई कमल पेंदाम या दवलामेटी ग्रामपंचायतच्या सदस्य आहे . नवरदेव आकाश रेवतकर हे गुजरातमध्ये रहीवाशी आहे . लॉकडाऊन वाढल्यामुळे गुजरातला जाणे अशक्य होते त्यामुळे वाडी येथील नातेवाईकाच्या घरीच नवरदेवा कडील मंडळी थांबली. दोघांचा साक्षगंध सहा महीन्यापूर्वीच झाला होता. आता काय करायंच आपण तर भावी नवरीच्या घराशेजारीच फसलो आहोत .
हाच विचार करीत काही दिवस काढले . लॉक डाऊन १७ मे पर्यंत वाढल्यामुळे अगोदरच ठरलेली १ मे ही लग्नाची तारीख जवळच असून सामाजिक जबाबदारी ओळखून १ मे रोजीच लग्न सोहळा पार पाडण्यासाठीच वर वधु पक्षाकडील मंडळीनी पुढाकार घेतला . शुक्रवार १ मे रोजी संध्याकाळी दवलामेटी ग्रामपंचायतचे उपसरपंच गजानन रामेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संचारबंदी नियमाचे तंतोतंत पालन करीत हा विवाह १० लोकांच्या उपस्थितीत साध्या पध्दतीने साजरा करण्यात आला.