चंद्रपूर:
राज्यात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव हा दिवसेंदिवस वाढत आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून सर्व राज्यांमध्ये लॉगडाऊन करण्यात आले आहे. परंतु, या लॉगडाऊनच्या काळामध्ये मुकी प्राणी अन्नाविना आहे.अशा भटक्या मुक्या प्राण्यांना बल्लारपूर शहरात श्रुती लोणारे स्वतः अन्न तयार करून त्यांची भुक भागवित आहे, त्यांच्या या प्रयत्नांचे कौतुक बल्लारपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विपिन मुद्धा यांनी केले आहे.
जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे. तसेच अनेक स्वयंसेवी संस्था,नागरिक मानवता दाखवून या युद्धात आपले योगदान देत आहे. अशाच प्रकारची मानवता व दयाभाव बल्लारपूर शहरांमध्ये पाहायला मिळत आहे. बल्लारपूर शहरांमधील आंबेडकर वार्ड येथील श्रुती लोणारे हे आपल्या पती सोबत स्वतः अन्न बनवून भटक्या मुक्या प्राण्यांना खाण्यास देत आहे. अशा प्रकारचे कार्य 24 मार्च पासून त्या निरंतर करीत आहे.
या कार्याची दखल अनेक स्वयंसेवी संस्था, समाज सेवकांनी घेतली आहे. विशेषत: या कार्याची दखल मेनका गांधी यांनी देखील घेतली आहे. मेनका गांधी यांनी बल्लारपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विपिन मुद्धा यांना स्वतः दूरध्वनीवरून श्रुती लोणारे यांचे कौतुक करून त्यांना योग्य ती मदत करावी,असे सांगितले आहे.
12 एप्रिल रोजी बल्लारपूर शहराचे नगराध्यक्ष हरिष शर्मा, मुख्याधिकारी विपिन मुद्धा, उपमुख्याधिकारी जयवंत काटकर, अभिजीत मोटघरे, लेखापाल राजेश बांगर, माजी नगरसेवक देवेंद्र आर्य यांनी श्रुती लोणारे यांची भेट घेऊन स्वयंसेवी संस्थाद्वारे 60 किलो गहू आणि 60 किलो तांदूळ दिले आहेत.
शहरातील सर्व नागरिक आणि प्राणी प्रेमी यांनी श्रुती लोणारे (मो.8149594443)आणि त्यांचे पती राकेश चिकाटे (मो.9112435955) यांना प्राण्यांसाठी खाद्य मिळावे यासाठी योगदान करावे, असे आवाहन देखील यावेळी करण्यात आले.