जिल्हा बाल संरक्षण कक्ष व रेल्वे सुरक्षा बलाची कारवाई
चंद्रपूर, दि.3 एप्रिल - जिल्हा बाल संरक्षण कक्ष चंद्रपूर व रेल्वे सुरक्षा बल, बल्लारशाह यांनी संयुक्तरीत्या कारवाई करून पाच अल्पवयीन मुलांना संशयास्पदरित्या रेल्वे प्रवास करतांना ताब्यात घेतले आहे. त्यांची रवानगी शासकीय निरिक्षण गृहात करण्यात आली असून या संबंधात पुढील कारवाई बाल कल्याण समिती चंद्रपूरद्वारे सुरु आहे.
रेल्वे सुरक्षाबल, बल्लारशाह येथील ठाणे प्रभारी आर.एस.यादव त्यांच्या टिमच्या सतर्कतेमुळे सदर घटना उघडकीस आली आहे. 2 एप्रिल रोजी दानापूर - सिकंदराबाद एक्सप्रेस नंबर 12792 च्या जनरल डब्ब्यात पाच अल्पवयीन बालके प्रवास करतांना आढळून आली. त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने यादव व त्यांच्या टिमने सदर बालकांना आपल्या ताब्यात घेऊन जिल्हा बाल संरक्षण कक्षातील संरक्षण अधिकारी यांना फोनद्वारे घटनेची माहिती दिली. या माहितीच्या आधारे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अपर्णा कोल्हे, अजय साखरकर, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यांच्या मार्गदर्शनात राजेश भिवदरे, जयसेन कसारे यांनी रेल्वे सुरक्षा बल, बल्लारशाह गाठून घटनेची माहिती घेतली व सदर बालकांना आपल्या ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान पाच अल्पवयीन मुलांपैकी दोन मध्यप्रदेशातील असून तीन मुले ही छत्तीसगढ येथील असल्याचे समोर आले आहे. या मुलांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. बाल कल्याण समिती, चंद्रपूरच्या आदेशान्वये सदर मुलांना रात्री 9.45 वाजता शासकीय निरीक्षण गृह/बालगृह येथे दाखल करण्यात आले आहे. या संदर्भातील पुढील कारवाई बाल कल्याण समिती चंद्रपूर द्वारे सुरु आहे.