Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, मार्च १४, २०१९

आदर्श आचारसंहितेसाठी नागरिक वापरणार "सी व्हिजिल"


आदर्श आचारसंहितेसाठी नागरिक वापरणार "सी व्हिजिल" अस्त्र

पच्या माध्यमातून निवडणूक आयोगाची करडी नजर
चंद्रपूर/प्रतीनिधी:
पुढील काळात होणाऱ्या लोकसभा निवडणुकी दरम्यान आदर्श आचारसंहितेच्या उल्लंघनाच्या तक्रारीचा आढावा घेण्यासाठी असलेल्या यंत्रणेतील त्रुटी दूर करण्यासाठी "सी व्हिजिल" या ॲपची निर्मिती भारतीय निवडणूक आयोगाने केली आहे. पूर्वी आचारसंहितेच्या उल्लंघनाच्या तक्रारीची सत्यता तपासून त्यावर कारवाई करताना यंत्रणेची दमछाक होत असे. तसेच सबळ पुरावा अभावी संबंधितावर कारवाई करताना मर्यादा येत असत. या नवीन ॲपमुळे या त्रुटी आणि मर्यादा कमी होणार आहेत.

"सी व्हिजिल" हे ॲप निवडणुकांदरम्यान आदर्श आचारसंहिता आणि खर्चाच्या उल्लंघनाची तक्रार करणाऱ्या नागरिकांसाठी एक नाविन्यपूर्ण अस्त्र आहे. या माध्यमातून नागरिक स्वतंत्र व नि:पक्षपाती निवडणुकांच्या संचलनासाठी सक्रिय आणि जबाबदार भूमिका बजावू शकतात. हे ॲप "युजर फ्रेंडली" असून ॲपचा वापर निवडणुकांच्या अधिसूचनांच्या तारखेपासून मतदानाच्या दुसऱ्या दिवसापर्यंत केला जाऊ शकतो. यातील प्रमुख वैशिष्ट्ये म्हणजे तक्रारीचे छायाचित्र अथवा व्हिडिओ पुरावा म्हणून थेट अपलोड करण्याची सुविधा आहे. कॅमेरा, चांगले इंटरनेट कनेक्शन आणि जीपीएस प्रवेशासह सज्ज असलेल्या कोणत्याही अँड्रॉईड स्मार्टफोन वरून या ॲपच्या माध्यमातून आदर्श आचारसंहिता भंगाची तक्रार करता येऊ शकते.
तीन टप्प्यात होणार तक्रार निवारण
1. आदर्श आचारसंहितेचा भंग होत असल्याचे वाटत असल्यास नागरिकांनी त्या घटनेचे एक छायाचित्र अथवा दोन-तीन मिनिटाचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करावे. भौगोलिक माहिती प्रणाली द्वारे (जीपीएस) स्वयंचलित स्थान मॅपिंगसह फोटो अथवा व्हिडिओ अपलोड करावा. नंतर त्या तक्रारदार नागरिकाच्या मोबाईलवर एक युनिक आयडी प्राप्त होतो. नागरिक अशा प्रकारे अनेक घटना नोंदवू शकतात, प्रत्येक अहवालासाठी एक आयडी मिळवू शकतात. "सी व्हिजिल" द्वारे आपली ओळख लपून सुद्धा तक्रार नोंदविण्याचा पर्याय आहे. यामध्ये मोबाईल क्रमांक आणि इतर प्रोफाइल तपशील या प्रणालीवर पाठवले जात नाही. त्यामुळे निनावी तक्रारीबाबत तक्रारकर्त्यास पुढील स्थिती, संदेश मिळणार नाहीत. मात्र त्याच्या तक्रारीवर कारवाई होणार आहे.

2. नागरिकांनी तक्रार नोंदवल्यानंतर ती अवघ्या पाच मिनिटातच जिल्हा नियंत्रण कक्षाकडे दाखल होईल. त्या माहितीच्या आधारे तक्रारीचा आढावा घेण्यासाठी नियुक्त केलेल्या एसएसटी, व्हीएसटी आणि भरारी पथकाकडे ती माहिती पाठवण्यात येईल. त्यानुसार संबंधित पथकाकडे असणाऱ्या 'जीव्हीआयजीआयएल अन्वेषक' नामक जीआयएस आधारित मोबाइल अँप्लिकेशनच्या सहाय्याने जीआयएस संकेत आणि नेव्हिगेशन तंत्रज्ञानाचा वापर करून संबंधित पथक घटनास्थळावर अवघ्या 15 मिनीटाच्या आत पोहोचणे अपेक्षित आहे. संबंधित तक्रारीबाबत प्राथमिक तपास आणि तक्रारीतील तथ्यांची तपासणी करून त्यासंबंधीचा अहवाल ॲपद्वारेच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तातडीने पाठविला जाईल. हा कालावधी 30 मिनिटांपेक्षा अधिक नसेल.

3. भरारी पथकाने तक्रारीवर कारवाई केल्यानंतर क्षेत्रीय अहवाल तपास पथकाने ॲपद्वारे संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे पाठवल्यावर त्या घटनेतील तथ्य पुरावा आणि अहवालाच्या आधारे निवडणूक निर्णय अधिकारी ती तक्रार रद्द करावी, की निकाली काढावी अथवा पुढे पाठवायची याचा निर्णय घेतील. त्या तक्रारीत तथ्य आढळले तर भारत निवडणूक आयोगाच्या राष्ट्रीय तक्रार पोर्टल वर माहिती पाठवण्यात येईल. तक्रार अपलोड केल्यापासून अवघ्या 100 मिनिटाच्या आत तक्रारीची स्थिती तक्रारकर्त्याला प्राप्त होईल. त्यानंतर तक्रार योग्य असल्यास त्या तक्रार कर्त्याच्या मोबाईलवर तसा संदेश पाठवला जाईल.

"सी व्हिजिल" चा दुरुपयोग होऊ नये म्हणून"सी व्हिजिल" ॲपचा उपयोग केवळ निवडणूक होत असलेल्या राज्याच्या भौगोलिक सिमांतर्गत करता येईल. फोटो अथवा व्हिडिओ क्लिक केल्यानंतर "सी व्हिजिल" वापरकर्त्यास केवळ पाच मिनिटांचा अवधी मिळेल. हे ॲप आधीच मोबाईलवर रेकॉर्ड केलेल्या फोटो आणि व्हिडिओ अपलोड करण्याची परवानगी देणार नाही.

ॲपवरून क्लीक केलेले फोटो अथवा व्हिडिओ थेट फोन गॅलरीमध्ये जतनही करता येणार नाहीत. एक सारख्या तक्रारी दरम्यान किमान पाच मिनिटांचा विलंब लागतो. जिल्हा नियंत्रण कक्ष भरारी पथकाला नेण्याआधी डुप्लिकेट फ्रिवोलेस आणि असंबंधित प्रकरणे रद्द करण्याचा पर्याय आहे. या ॲपचा वापर केवळ आदर्श आचारसंहिता उल्लंघनाची संबंधित खटले दाखल करण्यासाठी केला जाणार.

याशिवाय नागरिकांनी तक्रारी नोंदवण्यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या मुख्य वेबसाईटचा तसेच 1800 111 950 किंवा 1950 या क्रमांकावर संपर्क करावा. चंद्रपूरमध्ये 1950 या क्रमांकावर संपर्क करून आपल्या मतदान संदर्भातील माहिती घेण्याची देखील तरतूद करण्यात आली आहे. या टोल फ्री क्रमांकाचा वापर करून आपण मतदार आहात अथवा नाही व त्या संदर्भातील अन्य माहिती देखील या क्रमांकावरून मिळणार आहे.

यासाठी "सी व्हिजिल" वर करता येईल तक्रार

1. मतदारांना पैसा, मद्य आणि अमली पदार्थाचे वाटप.
2. शस्त्रसाठा अथवा शस्त्र वापर.
3. मतदारांना मारहाण अथवा दमबाजीच्या प्रकारात.
4. जमावाला चिथावणीखोर भाषण देणे.
5. पेड न्यूज आणि फेक न्युज संबंधी.
6. मतदारांना आमिष म्हणून वस्तूंचा वापर.
7. मतदान केंद्रापर्यंत मतदारांची मोफत वाहतूक करणे.
8. उमेदवारांच्या मालमत्ता अपात्रतेसंबंधी व इतर.
तथापि, ॲपचा उपयोग निवडणुकी पुरताच राहणार आहे. यावर थेट अपलोड करण्याची सुविधा उपलब्ध आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे अवघ्या 100 मिनिटात कारवाई केली जाणार आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.