Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, जुलै ११, २०२१

विद्यावंतांचे प्रेरक महानुभाव : डॉ. तु. वि. गेडाम

रा. तु. म. नागपूर विद्यापीठाद्वारे डॉ. तु वि. गेडाम यांना D.Lit.(पंडित) या उपाधीने सन्मानित केल्याबद्दल विशेष लेख




एके काळी नागपूर महाविद्यालय, नागपूर येथे इतिहासाचे प्राध्यापक म्हणून मोठया निष्ठेने अध्यापनाचे कार्य करणारे थोर इतिहासतज्ज्ञ, बिनीचे संशोधक, साक्षेपी विचारवंत, बुद्धिमान, व्यासंगी, ज्ञानोपासक, धर्मशील आणि समाजनिष्ठ व्यक्तिमत्त्व डॉ. तु.वि. गेडाम यांनी आज १० जुलै रोजी ९८ व्या वर्षात पदार्पण केले तसेच कालच ९ जुलै रोजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या १०८ व्या दीक्षांत समारंभात त्यांना डी.लिट. या उपाधीने सन्मानित करण्यात आले.
१० जुलै १९२४ साली चंद्रपूर जिल्ह्यातील तळोधी बाळापूर या छोट्याशा गावी अत्यंत गरीब कुटुंबात त्यांचा जन्म झाला. प्रथम तळोधी येथे, त्यानंतर ब्रह्मपुरी येथे प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते हायस्कूल व उच्च शिक्षणासाठी नागपूरला आले. १९४० साली तळोधी ते नागपूर असा १०५ किलोमीटरचा पायी प्रवास करीत त्यांनी वडिलांसोबत नागपूर गाठले. येथील पटवर्धन हायस्कूलमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. तेथून ते मॅट्रिक पास झाले. १९५० साली ते नागपूर महाविद्यालयातून इतिहास या विषयात एम. ए. झाले. प्रशासनात उच्चाधिकारी होण्याचे ध्येय उराशी बाळगून त्यांनी आय.ए.एस. व आय.ए.ए.एस. या परीक्षांचा जोमाने अभ्यास केला. त्यांनी १९५० साली आय.ए.एस. व १९५१ साली आय.ए.ए.एस या लेखी परीक्षा उत्तीर्ण केल्या. मुलाखतीत त्यांना यश येऊ शकले नाही, त्यामुळे त्यांचे आयएएस होण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले.
अमर्याद ज्ञानलालसा बाळगणार्‍या तु. वि. गेडाम यांनी १९५२ साली एलएल. बी., १९५३ साली एम. ए. (राज्यशास्त्र) या पदव्या संपादित केल्या. दोन विषयांत एम. ए. होणारे ते त्या काळचे अस्पृश्य वर्गातील पहिले विद्यार्थी होते. 'अस्पृश्यता व तिचे मूळ' या विषयावर त्यांनी पीएचडीसाठी इंग्रजीत शोधनिबंध लिहिला व आचार्य पदवी प्राप्त केली. १९५७ साली त्यांनी इतिहासाचे प्राध्यापक म्हणून नागपूर महाविद्यालय, नागपूर (जुने मॉरिस कॉलेज, आताचे वसंतराव नाईक शासकीय कला व समाज विज्ञान संस्था) येथे अध्यापन कार्याला प्रारंभ केला. याच महाविद्यालयातून ते १९८२ निवृत्त झाले.
रावसाहेब ठवरे, नाशिकराव तिरपुडे, डॉ. वि. भि. उपाख्य भाऊसाहेब कोलते, ग. त्र्यं. माडखोलकर,शरच्चंद्र मुक्तिबोध, किसन फागुजी बनसोड, ना. रा. शेंडे, डॉ.गंगाधर पानतावणे, डॉ. गो.ब.देगलूरकर, डॉ. उषा देशमुख, डॉ.भाऊ लोखंडे यांसारख्या दिग्गज समकालीनांच्या सहवासात त्यांचे व्यक्तिमत्त्व घडत गेले.
डॉ. गेडाम यांनी तरुण वयातच स्वतःला समाजकार्यासाठी झोकून दिले होते.अस्पृश्यांच्या हक्कासाठी लढणे हे त्यांचे जीवितकार्य होते. महाविद्यालयीन जीवनात त्यांच्या संघर्षाला प्रारंभ झाला. १९४६-४७ या काळात सी.पी. अँड बेरार डिप्रेस्ड क्लास स्टुडंट फेडरेशनचे (मागासवर्गीय विद्यार्थी संघ) ते सरचिटणीस राहिले.१९४७ साली नागपूर येथील कस्तुरचंद पार्कवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निकटवर्तीय श्री जोगेंद्रनाथ मंडल यांच्या अध्यक्षतेत त्यांनी अखिल भारतीय अस्पृश्य विद्यार्थी संघाच्या परिषदेचे यशस्वी आयोजन केले होते. या परिषदेला विरोध करणाऱ्या फेडरेशनच्या त्यावेळच्या पदाधिकाऱ्यांना शांत करण्यासाठी प्रत्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडून त्यांना आश्वासक असे पत्र सुद्धा प्राप्त झाले होते.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भेटण्याची, त्यांचे मार्गदर्शन घेण्याची संधीही त्यांच्या जीवनात त्यांना लाभली.  त्यांच्या सरचिटणीसपदाच्या कारकिर्दीत अस्पृश्य वर्गाला भरावे लागणारे शिक्षणशुल्क, परीक्षा शुल्क, शालेय व महाविद्यालयीन शिक्षण शुल्क हे प्रश्न मार्गी लागले. त्यांनी सी.पी. अँड बेरार मागासवर्गीय विद्यार्थी संघाच्या परिषदेचे गोंदिया येथेसुद्धा यशस्वीआयोजन केले.  त्यांच्या समाजकार्याची तळमळ पाहून शासनाने त्यांना विभागीय अस्पृश्यता निवारण समिती, महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय वसतिगृह समिती, महाराष्ट्र राज्य अनुदान निर्धारण समिती आदी समित्यांवर सदस्य म्हणून नियुक्त केले. या विविध समित्यांवर राहून त्यांनी दलितांचे विकासासाठी प्रयत्न केले. समाजकार्य करीत असताना त्यांनी कधीही अध्यापनसेवेकडे दुर्लक्ष केले नाही. त्यांचे अध्यापन विद्यार्थ्यांमधील ज्ञानलालसेला आणि वैचारिकतेला रुंदावणारे होते. म्हणूनच एक आदर्श शिक्षक म्हणून त्यांची छाप निर्माण झाली होती.
इ.स.१९७५,१९७८,१९८१ साली ते तीनदा नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरूपदाच्या तालिकेवर निवडून गेले परंतु  त्यांना कुलगुरू होण्याचा मान मिळू शकला नाही. डॉ. गेडाम यांचे शिक्षणाची अतूट नाते होते, अजूनही ते कायम आहे. त्यांनी शिक्षणाला समाजपरिवर्तनाचे माध्यम मानून शहरापासून ते खड्यापर्यंतच्या गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी युगांतर शिक्षण संस्था व कल्याण शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शिक्षणाची दारे खुली करून दिली. तळोधी या आपल्या जन्मभूमीला कर्मभूमी बनवून त्या भूमीत कल्याण शिक्षण संस्थेद्वारे समाजपरिवर्तनाचे उदगाते महात्मा जोतीराव फुले यांच्या नावाने विद्यालय सुरू केले. पुढे कनिष्ठ महाविद्यालय, वरिष्ठ महाविद्यालय, शारीरिक शिक्षण महाविद्यालय, शिक्षण महाविद्यालय, मागासवर्गीय मुला- मुलींचे वसतिगृह इत्यादी स्थापन करून विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणापर्यंतची संधी त्यांनी उपलब्ध करून दिली. सर्व कार्य करीत असताना वाचन आणि लेखनाची सवय मात्र त्यांनी कधीच सोडली नाही. त्यांचा लेखनप्रपंचही फार मोठा आहे. वय ९७ पार झाले परंतु त्यांचे शरीर आणि मन मात्र थकले नाही. ते दररोज पहाटे साडेतीन चारला उठून नित्यनेमाने लेखन करतात. जोवर हाताला कंप येत नाही तोवर माझी लेखणी सुरूच राहील असे ते मोठ्या आत्मविश्वासाने सांगतात .आजवर त्यांनी विविध ग्रंथाचे लेखन व  संपादन केले. धर्म,नीती, समाजकारण, इतिहास आदी विषयांवर त्यांनी लिहिलेली पुस्तके प्रसिद्ध आहेत. आजही आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात ते समाजहितासाठी लेखन करीत आहेत. 'निष्काम कर्मयोगी', 'अस्पृश्यता व तिचे मूळ' 'चातुर्वर्ण्य व्यवस्था व दहशतवाद', 'कथा आरक्षणाची व्यवस्था वंचितांची', 'शूद्र इत्यादी मूलभूत स्वरूपाचे ग्रंथ त्यांनी लिहिले. तसेच 'स्वाभिमान',  'परिवर्तन ', 'केशर' हे ग्रंथ त्यांनी संपादित केले. त्यांच्या साहित्यकृतीतील विचार अत्यंत चिंतनीय स्वरूपाचा आहे. अस्पृश्यता व तिचे मूळ हा त्यांचा ग्रंथ मुळात पीएचडीचा प्रबंध असून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना प्रस्तुत ग्रंथ त्यांनी अर्पण केला आहे. या ग्रंथातील अर्पणपत्रिका वाचल्यानंतर डॉ. आंबेडकरांविषयी त्यांच्या मनात असलेले अगाध प्रेम आणि प्रस्तुत ग्रंथाची दिशा आपणास सूचित होते. 
इतके सगळे त्यांच्याकडे असूनही समाजापासून आणि माध्यमांपासून ते अलक्षितच राहिलेत. ते स्वतः कधीही प्रसिद्धीच्या मागे लागले नाहीत. अत्यंत अभावग्रस्त परिस्थितीतून त्यांनी स्वतःचं असामान्यत्व सिद्ध केलं, परंतु त्यांनी कधीही आपल्या दुःखाचे भांडवल केले नाही.  जे जे शक्य होईल ते कार्य ते करीत गेले आणि या वयातही ते करीत आहेत. तारुण्याला लाजविणारी त्यांची ही ऊर्जा केवळ अभिनंदनीयच नाही तर ती खरोखरच अनुकरणीय अशी आहे. आयुष्यभर अत्यंत साधे जीवन जगणाऱ्या  या  नि:स्पृह, निर्लेप, निराभिलाषी साध्या सरळ  ज्ञानवंताला वयाच्या ९८ व्या वर्षी 'शूद्र' या त्यांच्या प्रबंधाला नागपूर विद्यापीठातून डी.लिट. मिळणे ही अत्यंत अभिमानास्पद दुर्मीळ अशी घटना आहे. नागपूर विद्यापीठातून डी.लीट. पदवी प्राप्त करणारे डॉ.  गेडाम हे कदाचित पहिलेच दलित समाजातील व्यक्ती असावेत.विद्यापीठाने त्यांच्या संशोधनाचा खऱ्या अर्थाने गौरव केलेला आहे. त्यांच्यातील ज्ञानाला आदरपूर्वक दंडवत. 


*लेखक*
*डॉ. राष्ट्रपाल मेश्राम*
मराठी विभाग प्रमुख,
समाजकार्य महाविद्यालय कामठी
चलभाष 9860049638

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.