कारंजा तालुक्यातील लादगड येथील नवरी
प्रतिनिधी कारंजा(घाडगे)
:राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे अनेकांची लग्न पुढे ढकलण्यात आली आहे. याच दरम्यान वर्धा-यवतमाळच्या सीमेवर एक अनोखा लग्न समारंभ पार पडला आहे. लॉकडाऊनमुळे जिल्हाबंदी असल्याने वधू-वराचे लग्न थेट वर्धा जिल्ह्याच्या सीमेवर करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या लग्न समारंभात पोलिसांनीही सहभाग घेतला. तसेच एका पोलिसाने वधूच्या मामाची भूमिका निभावली.
यवतमाळ जिल्ह्यातील घारफळच्या रावबाजी आहाके यांचा मुलगा विठ्ठला याचे वर्धा जिल्ह्यातील कारंजा(घाडगे) तालुक्यातील लादगड येथील अशोकराव मरसकोल्हे यांची मुलगी प्रविणाशी लग्न जुळले होते. या दोघांचे 6 मे रोजी लग्न ठरले होते. त्यानुसार विवाह मुहूर्त उरकविण्याची तयारी करण्यात आली. लग्नसाठी परवानगी काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण परवानगी मिळालीच नाही. त्यामुळे नवरदेव मोठ्या हिंमतीने थेट वर्धा येथे जाण्यास निघाला. पण वर्ध्या जिल्ह्याच्या सीमेवरच पोलिसांनी नवरदेवाला रोखले.
पोलिसांनी रोखल्यामुळे लग्नाचा मुहूर्त जाणार, हळदीच्या विधीवरही पाणी फिरणार होते. पण पोलिसांनीच थेट वधूला सीमेवर बोलावून घेण्याचा सल्ला वराला दिला. त्यानंतर वर्धा जिल्ह्याच्या नदी काठाजवळील कडुलिंबाच्या झाडाखाली वधू-वराचा विवाह सोहळा पार पडला. यावेळी खाकीतल्या एका पोलिसाने वधूच्या मामाचीही भूमिका बजावली.
यावेळी वराच्या सोबतीला असलेल्या भटजींनी आदिवासी पद्धतीने विवाह पार पाडण्याच्या दृष्टीने तयारी सुरु केली. पोलिसांनी आपल्या बसण्याकरिता असलेल्या खुर्च्या वधू-वराला उपलब्ध करून दिल्या. वर आणि वधूला मंगलाष्टकांच्या साक्षीने अक्षदा टाकून शुभमंगल सावधान करण्यात आले,लिंबाच्या झाडाखालीच पोलीस वऱ्हाडी बनले,नवदाम्पत्याला शुभाशीर्वाद देण्यासाठी खाकीतल्या पोलिसाने मुलीच्या मामाची भूमिका बजावली अत्यंत साधेपणाने आणि अतिशय कमी वेळेत आदिवासी पद्धतीने हा विवाह पार पडला,लग्न उरकून नवरदेव आपल्या वधूला घेऊन घरी परतला,लॉकडाऊन दरम्यान जिल्ह्याच्या सीमाही बंद करण्यात आल्या आहे,तसेच यवतमाळ व वर्धा जिल्ह्याच्या सीमेवरही पोलिसांचा बंदोबस्त आहे,
पोलिसांच्या पाहऱ्यात कुणी इकडून तिकडे जाऊ शकत नाही,अशी सीमेवरची परिस्थिती असल्यामुळे हा लग्न सोहळा जिल्ह्याच्या सीमेवर पार पडला,मे महिना तसा लग्नसराई चा महिना आहे,पण लॉकडाउनमूळे या महिन्यातील लग्न पुढे ढकलण्यात येत आहे,काहीजण अगदीच पाच लोकांमध्ये लग्नसमारंभ उरकून घेत आहे,पण यातील कुठलाच पर्याय कामी न पडल्यामुळे अखेर सीमेवरच लग्न आणि कन्यादान झाले,पाणावलेल्या नजरेने वधुने आपल्या आई वडिलांकडून आशीर्वाद घेतले