Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, नोव्हेंबर १७, २०१९

शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी आमदार किशोर जोरगेवार यांची राज्यपालांशी चर्चा



तातडीने मदत करण्याचे निवेदन

 

चंद्रपूर - आमदार किशोर जोरगेवार यांनी चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळावी यासाठी शनिवारी मुंबई येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची समक्ष भेट घेऊन विस्तृत चर्चा केली. यावर्षी झालेल्या अवकाळी पावसामुळे कपाशीसोयाबीन सह विभिन्न पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले असून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई व प्रोत्साहन मदत मिळावी याकरिता राज्यपाल महोदयांना निवेदनही दिले. यावेळी पावसामुळे जिल्हाभरात तसेच राज्यात उद्भवलेल्या संकटावरही विस्तृत चर्चा झाली. याच कालावधीत लागलेल्या निवडणूकानिकाल लागूनही सरकार स्थापन न झाल्याने निर्माण झालेला पेच आणि नंतर राज्यात लागू झालेली राष्ट्रपती राजवट या सर्व घडामोडींमुळे अस्मानी संकटात सापडलेल्या बळीराजाकडे दुर्लक्ष होत असल्याचे आमदार जोरगेवार यांनी राज्यपाल महोदयांना सांगितले. चंद्रपूर येथील शेतकऱ्यांची वर्तमान बिकट परिस्थिती समजून घेऊन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्यासंदर्भात जोरगेवार यांना आश्वस्त केले. याच चर्च दरम्यान आमदार जोरगेवार यांनी मंत्रालयातील ७ व्या व ६ व्या मजल्यावरील मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष कोणतीही पूर्व सूचना न देता बंद झाले असल्याने ग्रामीण भागातील गरीब व गरजू रुग्णांचे आर्थिक मदती अभावी हाल होत असल्याचे निदर्शनास आणून दिले आणि अश्या रुग्णांसाठी तातडीची उपायजोजना म्हणून आर्थिक सहकार्याची तरतूद करण्याची विनंती केली.  

राज्यपालांसोबत झालेल्या चर्चेत आमदार किशोर जोरगेवार म्हणाले कि गेल्या कित्येक दशकात झाला नाही असा अवकाळी पाऊस यंदा राज्यात सर्वत्र झाला. पण आधीच दारिद्र्यामुळे आणि सिंचनाच्या अभावाने पिचलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची उमेदच या पावसाने उध्वस्त केली आहे. ज्या चंद्रपूर मतदार संघाने ऐतिहासिक मताधिक्याने एक अपक्ष आमदार म्हणून मला निवडून दिलेत्या मतदार संघातील माझ्या शेतकरी बांधवांचे केविलवाणे निराश चेहरे आता बघवत नाहीत. आधीच कर्ज काढूनउसने पैसे घेऊन शेती जिवंत ठेवण्यासाठी बैलासारखा शेतात राबणारा बळीराजा दिवाळीपर्यंत व त्यानंतरही झालेल्या पावसामुळे पुरता कोलमडून गेला आहे. 

आमदार जोरगेवार यांनी राज्यपालांपुढे चंद्रपूरच्या शेतकऱ्यांची कैफ़ियतच मांडली. मागील दीड-दोन महिन्यांच्या काळात राज्यात विधानसभा निवडणुका लागल्या.आचारसंहिता सुरु झाली. निकालानंतरही बराच अवधी सरकार स्थापन होऊ शकले नाही.अखेर राष्ट्रपती राजवट लागू झाली. या दरम्यान सर्वाधिक दुर्लक्ष जर कुणाकडे झाले असेल तर ते या गरीब बिचाऱ्या शेतकरी बांधवांकडे. ज्या सर्वसामान्य माणसांचे जगणे सुकर व्हावेसुव्यवस्था नांदावी म्हणून सरकार काम करतेत्यांच्यातीलच सामान्यांहूनही अतिसामान्य शेतकऱ्याला मात्र काय करावे आणि कसे करावे हे उमजत नाही. ना तो आभाळाकडे बघू शकतोयना जमिनीवरून चालू शकतोय. मी आमदार म्हणून निवडून आलोय खरापण विधानसभाच स्थापन न झाल्याने मुख्यमंत्री निधीतून व अन्य कोणत्याही तरतुदीतूनजीवनमरणाचा प्रश्न उभा झालेल्यामाझ्या मतदार संघातील शेतकरी बांधवांना तातडीने मदत मिळवून देण्यास असमर्थ आहे. भुकेने रडत असलेल्या गरीब घरातल्या मुलांना भाकर देऊ शकत नसलेल्या माय-बापासारखी केविलवाणी अवस्था मी अनुभवतोय. त्यामुळे अशा हजारो शेतकऱ्यांचा एक प्रतिनिधी म्हणून मी आपणाकडे त्यांना तातडीने मदत व्हावी यासाठी याचना करीत असल्याचे त्यांनी राज्यपाल महोदयांना सांगितले.  

 मतदार संघातील गावागावांमधून शेतांमधून मी स्वत: फिरलो. शेतकऱ्यांना व त्यांच्या कुटुंबियांना भेटलो. अत्यंत दुर्दैवी आणि प्रचंड वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे. हातचे पीक पावसाने डोळ्यांदेखत ओरबाडून नेले. फक्त शेती आणि शेतीवरच अवलंबून असलेली हजारो कुटुंब हवालदिल झालेली आहेत. संबंध जिल्हाभरात हीच परिस्थिती आहे. ही सगळी वस्तुस्थितीची माहिती त्यांनी राज्यपालांना दिली. राष्ट्रपती राजवटीत राज्याचे सर्वेसर्वा आपण असून अशा कठीण समयी केवळ आपल्याच माध्यमातून शेतकरी बांधवांना धीर दिला जाऊ शकतो. तातडीने नुकसान भरपाई दिली जाऊ शकते. प्रोत्साहन देण्यासाठी मदत केली जाऊ शकते. माझी अंतःकरणापासून आपणास विनंती आहे कि कसलाही विलंब न करता शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्यासंदर्भात तरतूद करावी आणि या आकस्मिक संकटावर मात करण्यासाठी माझ्या शेतकरी बांधवांना बळ द्यावेअसे भावनिक आवाहन त्यांनी राज्यपालांकडे केले. यावेळी चंद्रपूर महानगर पालिकेचे गट नेता डॉ. सुरेश महाकुलकर यांची उपस्थिती होती. 


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.