वर्धा/प्रतिनिधी:
उमेदवारांनी सोशल मिडियावर पोस्ट टाकण्यापुर्वी सदर जाहिराती प्रसार माध्यम सनियंत्रण समिती कडून प्रमाणित करुन पोस्ट करावी. विना परवानगी उमेदवारांच्या फेसबुक, ट्वीटर व इतर सोशल माध्यमाच्या अकाउंटवर उमेदवाराच्या प्रचाराबाबत पोस्ट प्रसिध्द झाल्यास समितीतर्फे नोटीस बजावून सामाजिक माध्यमावर करण्यात आलेल्या जाहिरातीचा खर्च थेट उमेदवाराच्या खर्चात धरण्यात येईल अशा, सूचना प्रसार माध्यम सनियंत्रण समितीच्या सदस्य सचिव तथा जिल्हा माहिती अधिकारी मनीषा सावळे यांनी उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधीच्या बैठकित केल्यात.
लोकसभा निवडणूकीसाठी प्रसार माध्यमांवर दाखविण्यात येणा-या जाहिराती व बातम्यावर देखरेख ठेवण्यासाठी तसेच उमेदवार सोशल मिडिया आणि ईलक्ट्रानिक मिडियावर देत असलेल्या जाहिराती प्रमाणित करण्यासाठी प्रसार माध्यम सनियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. समितीच्या वतीने उमेदवार सोशल मिडियावर टाकत असलेल्या पोस्ट बाबत सूचना देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकिचे आयोजन करण्यात आले होते बैठकीला समितीचे सदस्य ए.व्ही.विश्वे, अक्षय राऊत व उमेदवाराचे प्रतिनिधी उपस्थित होते.
उमेदवारांनी शपथ पत्रावर दिलेल्या सोशल मिडिया अकाउंट यापूर्वी ज्या पोस्ट प्रमाणित करुन न घेता टाकण्यात आल्या आहेत. अशा पोस्ट वर समितीच्या वतीने कारवाई करण्यात येणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. तसेच त्रयस्त व्यक्तीनी त्यांच्या फेसबुक वरुन उमेदवारांच्या प्रचाराविषयी टाकण्यात आलेल्या पोस्ट उमेदवारांनी शेअर केल्यास अशा पोस्टवर सुध्दा कारवाई करण्यात येईल यासाठी उमेदवारांनी त्यांच्या संबधीत टाकण्यात येत असलेल्या पोस्ट शेअर करु नये अथवा कॉमेन्ट देऊ नये. सोशल मिडियावर पोस्ट टाकण्यासाठी समिती कडून दोन दिवसआधी सदर पोस्ट प्रमाणित करुन घ्याव्यात अशाही सूचना यावेळी उमेदवारांच्या प्रतिनिधींना दिल्यात. प्रत्येक पोस्टसाठी स्वतंत्र प्रमाणपत्र घ्यावे लागेल असेही त्यांची यावेळी सांगितले.