सध्या मूल शहरात टिल्लुपंपाचा वापर करून नळाचे पाणी घेणाऱ्यांमध्ये मोठी स्पर्धा निर्माण झाली आहे. या टिल्लुपंप धारकामधील स्पर्धेचा फटका ईतर नागरिकांना बसत असून शहर वासियांना क्रुत्रीम पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. मात्र नगर परिषदचे या प्रकाराकडे दुर्लक्ष होत असल्याने प्रशासनाविरुद्ध रोष व्यक्त होत आहे. उन्हाळा आता तापू लागला आहे. थंड हवा घेण्यासाठी कुलर,ए सी आदी यांत्रिक उपकरणांच्या उपभोग घेण्याकडे बहुतेकांच्या कल असतो. त्यामुळे पाण्याचा वापर अधिक प्रमाणात होने स्वाभाविक आहे. नगर परिषदेने शहरातील बहुतांश भागात नळ जोडणी दिली आहे. नळ जोडणी झालेल्या सर्वच भागात नगर परिषदे मार्फतीने पिण्याचे पाणी वितरीत करण्यात येते. पाणी वितरीत करतांना काही भागांमध्ये कमी अधिक प्रमाणात तफावत असतेच. परंतु मुबलक प्रमाणात पाणी मिळविण्यासाठी मूल शहरात टिल्लुपंपाद्वारे नळाचे पाणी ओढून घेणाऱ्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. टिल्लु पंपाचा वापर करून नळाचे पाणी अधिक प्रमाणात ओढून घेत असल्याने त्या-त्या परीसरातील टिल्लुपंपाचा वापर न करणाऱ्या ईतर नागरिकांना नळाचे पाणी मिळणे अवघड झाले आहे. नळाचे पाणी घेण्यास टिल्लुपंपाचा वापर करणे गुन्हा आहे. परंतु त्यासंबंधाने नगर परिषदे कडून कारवाईच होत नसल्याने टिल्लुपंप वापरकर्ते चांगलेच निर्ढावले आहे. मात्र या निर्ढावलेल्या लोकांमुळे ईतर सामान्य नागरिकांना नळाचे पाणी मिळण्यापासून वंचीत राहावे लागत आहे. सर्वांना समान न्याय देण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. नगर परिषदेने टिल्लुपंपाचा वापर करून पिण्याचा पाण्याची चोरी करणाऱ्यांच्या शोध घेऊन कारवाई करावी आणि निर्माण झालेली क्रुत्रीम पाणी टंचाई दूर करावी अशी मागणी क्रुत्रीम पाणी टंचाईची झळ बसत असलेल्या नागरिकांकडून होत आहे. शहरातील नागरिकांना 24 तास मुबलक पाणी पुरवठा करणाऱ्या नवीन योजनेचा कामात पाणी पुरवठा विभागातील कर्मचारी गुंतले असल्याने पाणी चोरांविरोधातील कारवाईत शिथिलता आली आहे. नवीन योजनेचे काम संपताच टिल्लुपंप वापरकर्त्यां विरुद्ध धडक मोहीम राबविण्यात येईल. श्री. समर्थ शाखा अभियंता पाणी पुरवठा विभाग नगर परिषद,मूल
टिल्लुपंप धारकामुळे नळाचे पाणी मिळणे अवघड झालेल्यांकडून नगर परिषदेला पाणीपट्टी देण्यास विरोध होत असल्याने पाणीपट्टी वसुलीवर विपरीत परिणाम झाले आहे. आर्थिक वर्ष संपत असल्याने नळधारक नागरिकांकडे पाणीपट्टी वसुलीसाठी जाणाऱ्या नगर परिषद कर्मचाऱ्याला नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.
- पाणीपट्टी वसुलीवर विपरीत परिणाम
खबरबातसाठी रमेश माहूरपवार, मूल जि.चंद्रपूर