Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, फेब्रुवारी २८, २०१९

१९ मार्च रोजी एक दिवस अन्नदात्यासाठी अन्नत्याग

साहेबराव करपे आणि त्यांची पत्नी कल्पना

जुन्नर /आनंद कांबळे 

आत्महत्या केलेल्या शेतकऱयांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आणि शेतकऱयांच्या स्वातंत्र्यासाठी संकल्पबद्ध होण्यासाठी येत्या19 मार्च रोजी देशभरातील किसान पुत्र आणि पुत्री दिवसभर उपवास करणार आहेत,असे ज्येष्ठ पत्रकार अमीर हबीब यांनी सांगितले .

यंदा देशाच्या भिन्न राज्यात तसेच जगातील भिन्न देशातही एक दिवस उपवास केला जाणार आहे.

19 मार्च 1986 या दिवशी साहेबराव करपे या शेतकऱ्याने जगणे असहय्य झाल्यामुळे संपूर्ण कुटुंबासह आत्महत्या केली होती. साहेबराव करपे हे चिल गव्हाण (यवतमाळ) येथील राहणारे. संगीताचे जाणकार होते. गावच्या सरपंच पदाची धुरा त्यांनी सांभाळली होती. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी एक पत्र लिहिले होते. त्यात त्यांनी शेतकऱयांच्या बिकट परिस्थितीचे वर्णन केले होते. दुर्दैवाने शेतकऱ्यांच्या दुर्दशेकडे सरकारने लक्ष दिले नाही.


शेतकऱ्यांच्या आत्महत्याचे सुरू झालेले सत्र आजही थांबले नाही. सुमारे साडे तीन लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. चाळीस ते पन्नास शेतकरी रोज आत्महत्या करीत आहेत. सरकारे बदलली पण शेतकऱयांचे हाल थांबले नाहीत. 



आपण सरकार नाहीत. आपण सामान्य माणसे आहोत. आपल्या हातात क्रूर कायदे बदलण्याचे अधिकार नाहीत. मी साधा विचार केला. आपल्या घरात अशी घटना घडली तर आपण काय करतो? किमान एक दिवस आपल्याला घास जाणार नाही. बस हाच विचार 19 मार्चच्या उपवासाच्या मागे आहे. 


ज्यांना शक्य असेल ते सामूहिक रित्या एके ठिकाणी बसून उपवास करू शकतात, पण ज्यांना बसणे शक्य होणार नाही, त्यांनी आपापले काम करीत उपवास करावा. हवे तर उपवास सोडण्यासाठी एकत्र जमावे. तेही शक्य नसेल तर सोशल मीडियावर जाहीर करावे.


हा उपवास कोणा एका पक्षाचा किंवा संघटनेचा नाही. प्रत्येक संवेदनशील व्यक्ती त्यात सहभागी होऊ शकतो. अगदी सरकारी कर्मचारी देखील 19 मार्चला उपवास करू शकतात. 


आपण हा उपवास का करायलाच हवा कारण अन्नदात्याचे आपल्यावर अनंत उपकार आहेत. आज तो संकटात सापडला आहे. हा उपवास करून आपण अन्नदात्याला दिलासा द्यायचा आहे. शेतकर्याची मुलं मुली आज शहरात गेली असली तरी ती शेतकऱ्याला विसरलेली नाहीत, याची जाणीव करून द्यायची आहे. शेतकऱयांप्रती आपली प्रतिबद्धता बळकट करायची आहे. 


हा उपवास कोणत्या मागणी साठी नाही पण शेतकरी आत्महत्या का करत आहेत? शेतकऱयांच्या आत्महत्या का थांबत नाहीत? त्या थांबाव्यात या साठी काय केले पाहिजे?  त्यासाठी मी काय करू शकतो? याचा विचार करण्यासाठी एक दिवसाचा हा उपवास आहे. होय, एक दिवस उपवास केल्याने प्रश्न सुटणार नाही हे खरे, पण प्रश्न सुटण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे पडेल यात शंका नाही.


आपण जेथे आहात तेथे हा एक दिवसाचा अन्नत्याग करता येईल. मी 19 मार्चला दिल्लीत म. गांधींच्या समाधीला प्रणाम करून उपवास सुरू करणार आहे. तुम्ही कोण्या पक्षाचे, संघटनेचे असा, कोणत्याही विचारसरणीचे असा, व्यावसाय किंवा नोकरी करणारे असा, 19 मार्च रोजी एक दिवस उपवास करा! असे नम्र आवाहन किसानपुत्र आंदोलनाच्या वतीने करीत आहे.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.