Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, फेब्रुवारी ०४, २०१९

अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित ग्राहक सेवांमुळे महावितरण देशात सर्वोत्तम:सीएमडी श्री.संजीव कुमार

मुंबई/प्रतिनिधी:

महावितरणकडून अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ग्राहकांना सर्वोत्कृष्ट सेवा देण्यात येत आहेत. त्यामुळे देशात वीज वितरण क्षेत्रात महावितरण सर्वोत्तम कंपनी आहे आणि याच कारणांमुळे महावितरणच्या विविध योजनांची अंमलबजावणी देशातील इतर कंपन्यांकडून केली जाते, असे प्रतिपादन महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. संजीव कुमार यांनी केले.

मुंबईस्थित गोरेगाव येथील एक्झीबिशन सेंटरमध्ये इंडियन इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनच्यावतीने (ईमा) आयोजित आंतरराष्ट्रीय प्रदर्शनीच्या उद्घाटनप्रसंगी श्री. संजीव कुमार बोलत होते. वितरण कंपन्यांसमोरील 'आव्हाने आणि संधी' या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले. 

महावितरणने मागील तीन वर्षांत बहुतांश ग्राहकसेवा ऑनलाईन केल्या आहेत. ग्राहकांना वीजबिलाचा तपशील, खंडित वीजपुरवठ्याबाबतची माहिती, वीजपुरवठा खंडित असल्याबाबतची पूर्वसूचना, इत्यादी माहिती एसएमएसद्वारे दिली जाते. वीजखरेदीचे योग्य नियोजन केल्यामुळे मागील वर्षी महावितरणची मोठ्या प्रमाणात बचत झाली आहे. सौर ऊर्जेवर आधारित सौरकृषी फिडरमुळे कृषीग्राहकांचे वीजदर कमी होऊन अंतिमत: घरगुती ग्राहकांच्या वीजदराचे प्रमाणही कमी होण्यास मदत होईल. राज्यातील ४१ लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना सौरऊर्जेद्वारे वीज देण्यासाठी महावितरणद्वारे विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. केंद्रीकृत वीजबिलींगमुळे ग्राहकांना वेळेत वीजबील मिळत असून यात ग्राहकांना वीजबील तयार होताच एसएमएस जात असल्यामुळे वीजबील सुधारण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. महावितणमधील सर्वच कंत्राटदारांना ईसीएसच्या माध्यमातून देयक अदा करण्यात येत आहेत. महावितरणच्या कर्मचाऱ्यांना डॅशबोर्डमुळे माहिती उपलब्ध झाल्याने उपविभागीय पातळीवरील अधिकाऱ्यांनाही व्यवस्थापन निर्णय प्रक्रियेत सहभागी होता येत आहे. प्रभावी ऊर्जा अंकेक्षण व उपकेंद्राचे संनियंत्रण यामुळे महावितरणच्या यंत्रणेवरील खर्चात बचत करणे शक्य होत आहे. या सर्व विविध उपाययोजनांमुळे महावितरणची वीज वितरण हानी विद्युत नियामक आयोगाने निश्चित केलेल्या प्रमाणापेक्षा कमी आहे, अशी माहिती श्री. संजीव कुमार यांनी दिली. 

यावेळी सीईएससी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक श्री. देबाशिस बॅनर्जी, केंद्रीय ऊर्जा मंत्रालयातील संचालक श्री. विशाल कपूर, एमएसएमईचे सहसंचालक श्री. सुधीर गर्ग, केंद्रीय अवजड उद्योग विभागाचे सचिव श्री. ए.आर. सिहाग यांच्यासह ईमाचे श्री. हरिश अग्रवाल, श्री. सुनिल सिंघवी आणि श्री. आर. के. चुग प्रामुख्याने उपस्थितीत होते. 
महावितरणच्या स्टॉलला मान्यवरांची भेट 

ईमाच्या प्रदर्शनीत महातिरणच्यावतीने स्टॉल उभारण्यात आला आहे. उद्घाटन कार्यक्रमानंतर या स्टॉलला मान्यवरांनी भेट दिली. यावेळी त्यांना महावितरणच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. महावितरणच्या माहिती तंत्रज्ञान व देयक वसुली विभागाचे कार्यकारी संचालक श्री. योगेश गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली हा स्टॉल उभारण्यात आला आहे. तसेच या प्रसंगी श्री. संजीव कुमार यांच्या हस्ते विविध स्टॉलचे उद्घाटनही करण्यात आले.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.