Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, सप्टेंबर ०७, २०१८

व्हिडिओ गेम्स, सोशल मीडियामुळे आध्यात्मिक हानी



महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदेत शोधनिबंध सादर !


व्हिडिओ गेम्स आणि फेसबूक यांसारखी सामाजिक संकेतस्थळे आज आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनली आहेत. त्यांत सर्वांचा पुष्कळ वेळ जातो आणि त्यांचा आपल्या जीवनावर पुष्कळ प्रभावही पडतो; परंतु त्यांत गुंतवलेल्या वेळेचा मानवजातीला खरोखर काही लाभ आहे का ? व्हिडिओ गेम्स आणि सामाजिक संकेतस्थळे यांच्या शारीरिक आणि मानसिक स्तरावर होणार्‍या परिणामांच्या जोडीला आध्यात्मिक स्तरावरही हानीकारक परिणाम होतात, असे प्रतिपादन महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या डॉ. ज्योती काळे यांनी केले. उच्च शिक्षण आणि संशोधन संस्था, मुंबई यांनी 7 आणि 8 सप्टेंबर 2018 या दिवशी आयोजित केलेल्या जागतिकीकरण, साहित्य आणि संस्कृती या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेत डॉ. ज्योती काळे यांनी याविषयी केलेल्या संशोधनावर आधारित शोधनिबंध सादर करतांना बोलत होत्या. ज्ञानसागर व्यवस्थापन आणि संशोधन आस्थापन, बाणेर-बालेवाडी, पुणे येथे आयोजित परिषदेत डॉ. काळे यांनी 7 सप्टेंबर या दिवशी व्हिडिओ गेम्स खेळणे आणि सामाजिक संकेतस्थळांमध्ये मग्न रहाणे यांचे सूक्ष्म परिणाम हा शोधनिबंध सादर केला. या शोधनिबंधाचे लेखक परात्पर गुरु डॉ. आठवले, डॉ. ज्योती काळे आणि श्री. शॉन क्लार्क आहेत.




प्रभावळ आणि ऊर्जा मापक यंत्र अन् सूक्ष्म परिक्षण यांच्या माध्यमातून व्हिडिओ गेम्स खेळणे, तसेच सामाजिक संकेतस्थळांमध्ये मग्न रहाणे यांचे होणारे सूक्ष्म परिणाम अभ्यासण्यासाठी केलेल्या प्राथमिक संशोधनाची डॉ. काळे यांनी माहिती दिली. माजी अणु वैज्ञानिक डॉ. मन्नम मूर्ती यांनी विकसित केलेल्या युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर या उपकरणाचा वापर या संशोधनासाठी करण्यात आला. हे उपकरण कोणतीही वस्तू, वास्तू, प्राणी किंवा व्यक्ती यांच्यातील सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा अन् त्यांच्या भोवतीची प्रभावळ यांचे मापन करते.

या संशोधनाच्या अंतर्गत केलेल्या पहिल्या प्रयोगात महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या संशोधन केंद्रात निवास करणार्‍या 5 जणांना केवळ एक घंटा एक आक्रमक व्हिडिओ गेम (फर्स्ट पर्सन शूटर व्हिडिओ गेम) खेळायला सांगण्यात आले. या 5 जणांचे गेम खेळण्याआधी आणि नंतर युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर या उपकरणाच्या आधारे मापन करण्यात आले. गेम खेळल्यानंतर या पाचही जणांमधील नकारात्मक ऊर्जा पुष्कळ प्रमाणात वाढली किंवा त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जा न्यून (कमी) झाली, असे आढळले. त्यांपैकी ज्या 2 साधकांमध्ये गेम खेळण्यापूर्वी नकारात्मक ऊर्जा नव्हती, त्यांत गेम खेळल्यानंतर नकारात्मक ऊर्जा निर्माण झाली. यांपैकी एकातील नकारात्मक ऊर्जा 72 प्रतिशतने वाढली.

दुसर्‍या प्रयोगात महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या संशोधन केंद्रात निवास करणार्‍या अन्य 5 जणांना त्यांच्या नेहमीच्या सामाजिक संकेतस्थळावरील खात्यातील नोंदी एक घंटा पहायला सांगण्यात आले. पहाण्यापूर्वी आणि नंतर या पाचही जणांचे युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर या उपकरणाच्या आधारे मापन करण्यात आले. साधकांनी केवळ त्यांच्या फेसबूक आणि इन्स्टाग्रॅम खात्यातील नोंदी पाहिल्याने त्यांच्यातील नकारात्मक ऊर्जा 15 ते 30 प्रतिशत वाढल्याचे आढळले.यातील २ जणांना स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशन या महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाचे संशोधन आणि साधना मांडणार्‍या संकेतस्थळाच्या फेसबूक खात्यातील नोंदी केवळ अर्धा घंटा पहायला सांगण्यात आले. पहाण्यापूर्वी आणि नंतर केलेल्या मापनातून लक्षात आले की, या साधकांतील नकारात्मक ऊर्जा घटली, तर त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जा वाढली. यावरून सामाजिक संकेतस्थळावर आपण नेमके कशा प्रकारचे साहित्य पहातो आणि ते पहाणार्‍यावर कोणता परिणाम होणार, हे ठरवणारा महत्त्वाचा निकष असल्याचे लक्षात आले.


व्हिडिओ गेम आणि सामाजिक संकेतस्थळे हे अन्य मनोरंजनाच्या साधनांप्रमाणेच आहेत - आपण त्यांचा कसा वापर करतो आणि त्या माध्यमातून काय पहातो, यावर त्यांचा आपल्यावर सकारात्मक कि नकारात्मक परिणाम होणार, हे ठरते. दुर्दैवाने बहुतांश व्हिडिओ गेम्स आणि सामाजिक संकेतस्थळांवरील नोंदी नकारात्मक स्पंदने प्रक्षेपित करतात. भारतीय संस्कृती जीवनात आध्यात्मिक स्तरावरील सकारात्मकतेत वृद्धी करण्यावर आधारित असून ती खरेतर संपूर्ण जगाला एक आदर्श आहे; परंतु व्हिडिओ गेम आणि सामाजिक संकेतस्थळे यांसारख्या आध्यात्मिकदृष्ट्या नकारात्मक पद्धतींच्या जागतिकीकरणामुळे भारतीय संस्कृतीचा कसा र्‍हास होत आहे, हे या प्रयोगातून लक्षात येते. आपल्याला मिळालेला मानवजन्म अमूल्य आहे आणि आध्यात्मिकदृष्ट्या हा कालखंड आध्यात्मिक उन्नती करण्याची सुवर्णसंधी या स्वरूपात आपल्याला देण्यात आला आहे. आपण आणि आपली मुले काय पहातो, याविषयी आपण जर सतर्क राहिलो, तर ते हानीकारक होण्याऐवजी आपल्या ऐहिक आणि पारमार्थिक उन्नतीला पूरक होऊ शकेल !

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाची स्थापना परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी त्यांच्या 37 वर्षांच्या आध्यात्मिक संशोधनाच्या अनुभवाच्या पार्श्‍वभूमीवर केली आहे. या विश्‍वविद्यालयाच्या वतीने सूक्ष्म जगत आणि त्याचा मानवावर होणारा परिणाम यांबाबतही संशोधन केले जाते.


आपला नम्र,
श्री. रूपेश रेडकर,
संशोधन विभाग, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय,
संपर्क : 9561574972

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.