Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, मे २२, २०१४

खरीप आढावा

खते व बियाण्यांची कृत्रिम टंचाई व लिंकिंग होणार नाही याची दक्षता घ्या 



चंद्रपूर : खरीप हंगामासाठी खते व बियाणे मुबलक उपलब्ध असले तरी शेतकरी कृषी निविष्ठांची उचल करतात त्या काळात खते व बियाणांची कृत्रिम टंचाई व लिंकिंग होणार नाही याची दक्षता घ्या, अशा सूचना पालकमंत्री संजय देवतळे यांनी कृषि विभागाला दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित खरीप आढावा बैठकीत श्री. देवतळे बोलत होते. यावेळी आमदार शोभाताई फडणवीस, जिल्हाधिकारी डॉ. दिपक म्हैसेकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशुतोष सलील, जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी अरुण निमजे, अप्पर जिल्हाधिकारी सी.एस. डहाळकर, कृषी सहसंचालक विजय घावटे व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. डी.एल. जाधव उपस्थित होते.

कृषी विभागाने मागील वर्षी खते व बियाण्यांचे योग्य नियोजन केल्याचे सांगून पालकमंत्री म्हणाले, यावर्षीही शेतकऱ्यांना खते व बियाणे वेळेवर उपलब्ध व्हावीत असे नियोजन करा. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध व्हावे यासाठी प्रयत्न करा.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार यावर्षी पाऊस कमी असून अशा परिस्थितीत कृषी विभागाने शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करुन पीक परिस्थितीबाबत जागृत करावे. सोयाबिनचा अपवाद वगळता बियाणे मुबलक उपलब्ध असले तरी शेतकऱ्यांनी आपल्याकडील बियाणेही वापरावे. राष्ट्रीय कृषी विमा योजनेचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मिळावा यासाठी कृषी विभागाने पुढाकार घ्यावा, असेही श्री. देवतळे म्हणाले.

या खरीप हंगामात 1 लाख 79 हजार हेक्टरवर भाताची, 1 लाख 25 हजार हेक्टरवर सोयाबिन तर 1 लाख 20 हजार हेक्टरवर कापसाची पेरणी होईल, असे कृषी विभगाच्या वतीने सांगण्यात आले. सर्व पिकांची एकूण पेरणी 4 लाख 69 हजार हेक्टरवर होणार असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. डी.एल. जाधव यांनी सांगितले. महाबिज व खाजगी असे 1 लाख 6 हजार क्विंटल बियाण्यांची आवश्यकता असून प्राप्त साठा 1 लाख 4 हजार 240 क्विंटल असून या हंगामात जास्तीत जास्त उत्पादन वाढावे यासाठी कृषी विभाग प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले.

या बैठकीत माजी मालगुजारी तलाव, राष्ट्रीय कृषी विमा योजना, विद्युत विभागाची थकबाकी, गारपिटग्रस्तांना मदत, खते व बियाण्यांची उपलब्धता व बँकेचे कर्ज आदी विषयावर उपस्थित सदस्यांनी चर्चा केली. शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणारे पोस्टर कृषी विभागाच्या वतीने तयार करण्यात आले असून त्याचे प्रकाशन पालकमंत्र्यांच्या हस्ते या बैठकीत करण्यात आले. जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी पी.डी. देशमुख यांनी उपस्थितांचे आभार मानले.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.