Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, मार्च ०५, २०१४

चला उरकुया भूमीपूजन

लोकसभेची निवडणूक निवडणूक आयोगातर्फे जाहीर झाल्यास आचारसंहिता लागू होईल. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी विकासकामे करीत असल्याचा आव आणून उद्घाटन व भूमिपूजन समारंभ करीत आहेत
मा. खा. हंसराज भैय्या अहीर यांचा भद्रावती तालुक्यातील विकास कामांचा उद्घाटन व भूमिपूजन समारंभ, तर कांग्रेस ने सहकार मेळावा आयोजित केला. संजय देवतळे यांच्या प्रचाराचा नारळ असल्याचे बोलले जात आहे. आचारसंहिता लागण्यापूर्वी भूमिपूजन, भद्रावती येथील मल्हारीबाबा सोसायटी येथे नवीन सुपर बस थांब्याचे उद््घाटन ■ खुले रंगमंच लोकार्पण, ग्रा.पं. भवन, शाळेची संरक्षण भिंत भूमिपूजन, धामणी येथे काँक्रीट रोड व पाणी योजना- लोकार्पण करून नागरिकांना एकप्रकारे पुढील पाच वर्षासाठी आश्वस्त करण्याचा प्रकार आहे.


जिल्ह्यात अतिदुर्गम, आदिवासी भाग म्हणून कोरपना तालुक्याकडे बघितले जाते. या तालुक्याचा विकास अद्यापही पाहिजे तसा झाला नाही. त्यामुळे रस्त्याच्या बांधकामाची मागणी गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित होती. विषयाचे गांभीर्य लक्षात घेवून खा. हंसराज अहिर यांनी स्थानिक विकास निधीतून सिमेंट रस्त्याचे बांधकाम मंजूर केले. हे बांधकाम गडचांदूर, वडगाव, नारंडा, वनसडी, कन्हाळगाव, चनई, जैतापूर येथे होत असून या सिमेंट काँक्रिट रस्त्याचा लोकार्पण सोहळा मंगळवार (४ मार्च)ला खा. हंसराज अहीर यांच्या हस्ते पार पडला.
मागील साडेचार वर्षापासून ताटकळत बसलेल्या मतदारांची मात्र यानिमित्ताने चांदी होत आहे. असा प्रकार अनेक ठिकाणी सुरू असून जिल्ह्याचे पालकमंत्री संजय देवतळे तेही यात मागे नाही. काल परवापर्यंत विकासकामांच्या नावाखाली लोकांना निव्वळ गाजर दिले जात होते. परंतु, आता संपूर्ण वरोरा-भद्रावती मतदार संघात विकासकामांची श्रृंखला सुरू झाली आहे. यानिमित्ताने पालकमंत्री धावत पळत कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन करीत असून लोकसभेच्या पार्श्‍वभूमिवर हे मतांचे गणित असल्याची चर्चा संपूर्ण मतदार संघात सुरू आहे. सुदैवाने मागील चार 'टर्म'पासून या मतदार संघातील लोकांनी संजय देवतळे यांना विश्‍वास दर्शविला आणि त्यांना आमदारकी मिळाली. परंतु, वरोर्‍याचा पाहिजे तसा विकास आजही झाला नाही. नागपूर महामार्गाच्या पलिकडे असलेले आनंदवन मात्र, वरोरा शहराच्या तुलनेत विकसित झाले. या आनंदवनाचे नाव आता पर्यटन विभागाच्या नकाशावर कोरले जाणार आहे. असे असताना ज्या वरोरा शहराने 'आनंदवन' दिले तेथील नागरिक मात्र आनंद मिळवण्यासाठी वणवण भटकत आहेत. अशातच काँग्रेसमध्ये उमेदवार बदलीचे संकेत काँग्रेसनेच दिले. यंदाची लोकसभा बाबू नाही तर संजूभाऊ लढवतील अशी चर्चा काँग्रेस वतरुळात असतानाच वरोर्‍यातील विकासकामाला अचानक गती आली आणि पालकमंत्र्यांनी गावोगावी, गल्लोगल्ली शेकडो फलक झळकवले. आणि या फलकाचे उद््घाटन धावत पळत केले. अनेक ठिकाणी तर शेतीच्या रस्त्यासाठी शेतकर्‍यांनी परवानगी दिली नसतानाही भूमिपूजन आटोपून नागरिकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न यानिमित्ताने होत आहे.
शेतकर्‍यांच्या परवानगीविना भूमिपूजन झाल्यामुळे शेतकरी संतापले आणि चालू झालेल्या रस्त्याचे काम बंदही पाडण्यात आले. याची तक्रार नागरिकांनी पोलिसांकडेही केली. एवढेच नव्हे तर ग्रामपंचायतची मंजूरी न घेता अंतर्गत रस्त्यांचे भूमिपूजन काही ठिकाणी केले जात आहे. गावात बगिच्यांचे सौंदर्यीकरण, मंदिरासाठी सभागृहाचे बांधकाम, संरक्षण भिंती, शहरातील-गावातील अंतर्गत रस्ते अशा विविध विकासकामांची श्रृंखला मागील काही दिवसात नागरिकांना बघायला मिळाली. परंतु, हे दिवास्वप्न तर नाही ना, अशीही चर्चा नागरिकांत आहे. कारण एक वर्षापूर्वी वरोर्‍यात केलेल्या अनेक विकासकामांच्या भूमिपूजनानंतर प्रत्यक्षात मात्र काम सुरू झाले नाही. याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे शहराच्या मध्यभागी असलेला एकमात्र तलाव. कधीकाळी हा तलाव वरोर्‍याची आण-बाण-शान होता. परंतु, आता या ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे मत्स्य व्यवसायिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. बसस्थानकलगतचे अतिक्रमणही आजपर्यंत हटविण्यात आले नाही. असे एक ना अनेक प्रश्न चुटकीसरशी सोडविण्याचा प्रयत्न लोकसभेची उमेदवारी मिळण्याच्या पार्श्‍वभूमिवर पालकमंत्री तर करीत नाही ना, असाही प्रश्न यानिमित्ताने चर्चेचा ठरला आहे.
काही वर्षापूर्वी वरोरा तालुक्याला औद्योगिक परिसराचे स्वरुप प्राप्त झाले आणि याठिकाणी ऊर्जा निर्मिती करणार्‍या कंपन्यांनी बस्तान मांडले. बेरोजगार लोकांना यानिमित्ताने रोजगार मिळेल, अशी अपेक्षा नागरिकांना होती. परंतु, दुर्दैवाने येथे परप्रांतीयांचाच भरना वाढतच गेला. यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे कंपन्यांमुळे होणारे प्रदूषण शेतकर्‍यांसाठी जीवघेणे ठरले. पालकमंत्र्यांकडे राज्याच्या प्रदूषण नियंत्रणाची जबाबदारी असताना त्यांच्याच क्षेत्रातील नागरिक प्रदुषणामुळे त्रस्त झाले आहे. असे असले तरी काही का असेना वरोरा शहराचा विकास हा विषय पालकमंत्र्यांनी हाताळला, हे महत्त्वाचे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.