Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, सप्टेंबर २८, २०१३

चंद्रपूर वीज केंद्रातील दोन्ही संच बंद करा

चंद्रपूर
चंद्रपूरजवळील महाऔष्णिक वीज केंद्रातील जुने दोन संच शहरातील वाढत्या प्रदूषणास कारणीभूत ठरत आहेत. त्यामुळे सुमारे सात ते आठ किलोमीटरच्या परिघातील जनता आजारी पडत आहे. यासंदर्भात पर्यावरणमंत्री संजय देवतळे यांना पत्र देऊन दोन्ही संच बंद करण्याची मागणी केली होती. त्यांनी कारवाईसाठी पाठपुरावा केला. त्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाने वरिष्ठ कार्यालयास दिलेल्या अहवालातील माहिती धक्कादायक आहे. हे दोन्ही संच बंद करा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा इको-प्रोचे अध्यक्ष बंडू धोतरे यांनी दिला आहे. 

कोळशावर आधारित वीजनिर्मिती करण्यासाठी चंद्रपूर शहरालगत १९८३मध्ये महाऔष्णिक वीज केंद्राची स्थापना झाली. १५ ऑगस्ट १९८३मध्ये पायाभरणी झाल्यानंतर संच क्रमांक १ मधून १ नोव्हेंबर १९८४ पासून २१० मेगावॅट वीज उत्पादन सुरू झाले. त्यानंतर १६ सप्टेबर १९८५मध्ये युनिट क्रमांक दोनमधून २१० मेगावॅट क्षमतेची वीजनिर्मिती सुरू झाली. या दोन्ही संचाच्या चिमणीची उंची केवळ ९० मीटर आहे. या संचाचे डिझाइन जुन्या तंत्रज्ञानानुसार करण्यात आले आहे. या संचाचे डिझाइन ७५७.५ मायक्रो ग्रॅम प्रती घनमीटर इतके आहे. मात्र हे दोन्ही संच आता ३० वर्षे जुने असल्याने प्रदूषणाची पातळी वाढली आहे. नवीन नियमानुसार नव्याने उभारण्यात येणाऱ्या प्र्रकल्पांना प्रदूषणाचे मानक हे ५० मायक्रो ग्रॅम असे आहेत. मात्र या दोन संचाकरिता १५० मायक्रोग्रॅम प्रती घनमीटरचे मानक निश्चित केले आहेत. म्हणजेच या संचाना एकप्रकारे सूट देण्यात आली आहे. त्यानंतरही या दोन्ही संचातून सुमारे ५०० मायक्रोग्रॅमपेक्षा अधिक प्रदूषण होत आहे. 

प्रदूषणाचे परिणाम 

संचातून होणाऱ्या प्रदूषणाचा परिणाम नागरिकांसोबत वृक्ष लोकवस्ती पक्षी जनावरे यांच्यावर होतो. श्वसननलिका खराब होऊन दमा अस्थमा तसेच त्वचेचे डोळ्याचे आजार होत आहेत. जन्माला येणारे बाळ आजार घेऊनच येत आहे. प्रदूषणामुळे झाडांमध्ये कार्बोहायर्डेड तयार होत नाही. परिणामी झाडांची पूर्ण वाढ न होता निष्पर्ण होतात. 

धक्कादायक अहवाल 

पर्यावरण मंत्री संजय देवतळे यांनी इको-प्रोच्या तक्रारीची दखल घेतल्यानंतर संबधित विभागाने येथील प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयास विचारणा केली. वरिष्ठ कार्यालयास लेखी स्वरूपात देण्यात आलेला अहवाल धक्कादायक आहे. यात प्रादेशिक अधिकारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ चंद्रपूर यांनी संच क्रमांक १ व २ मधून होणारे प्रदूषण निर्धारित मानकापेक्षा जास्त आहे. जानेवारी २०१२ ते एप्रिल २०१३ पर्यंत संच क्रमांक १ व २ मधून सरासरी अनुक्रमे ३८३.९१ व ६४२.९२ इतके धोक्याच्या पातळीबाहेर आहे. या अहवालात नमूद केल्याप्रमाणे वीज प्रकल्पाच्या सभोवताल ७ ते ८ किमीपर्यंत वायू प्रदूषणास कारणीभूत ठरत असल्याचे नाकारता येत नाही असे प्रदूषण नियत्रंण मंडळाने संच १ व २ बाबत स्पष्ट केले आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.