Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, सप्टेंबर १४, २०२२

सूर्यांश संस्थेचे राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार जाहीर



रावळकर, मेश्राम, ठाकूर, तांबे, कुसनाळे,शेख,आत्राम, रामटेके आणि दहिवले मानकरी..

चंद्रपूर- चंद्रपुरातील सूर्यांश साहित्य व सांस्कृतिक मंच चंद्रपूर तर्फे देण्यात येणारे सन २०२१ चे राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार काल संस्थेचे सचिव प्रदीप देशमुख यांनी जाहीर केले. मागील १० वर्षांपासून संस्थेतर्फे राज्यभरातील साहित्यिकांकडून व प्रकाशकांकडून त्यावर्षी प्रकाशित विविध साहित्यकृतीच्या प्रवेशिका मागवल्या जातात आणि त्यातून पुरस्कार प्रदान केले जातात. प्राप्त साहित्यकृतीतून निवड समितीने खालील साहित्यकृतींची निवड केली आहे.

कवितासंग्रहासाठी देण्यात येणारा शिवाजीराव चाळक पुरस्कृत पुरस्कार मेघराज मेश्राम (नागपूर) यांच्या 'माणूस असण्याच्या नोंदी या कवितासंग्रहाला, कथासंग्रहासाठी देण्यात येणारा प्रा. दिलीप बोढाले स्मृती पुरस्कार विश्वास ठाकूर (नाशिक) यांच्या  'नात्यांचे सर्व्हिसिंग' या कथासंग्रहाला, कादंबरीसाठी प्रदान करण्यात येणारा अशोकसिंह ठाकूर पुरस्कृत पुरस्कार रमेश रावळकर (औरंगाबाद) यांच्या 'टिशू पेपर' या कादंबरीला तर बालसाहित्यासाठी देण्यात येणारा विमलबाई देशमुख स्मृती पुरस्कार रमेश तांबे (मुंबई) यांच्या ' चिनूचे स्वप्न' या बालसाहित्याला आणि डॉ. विद्याधर बन्सोड पुरस्कृत शकुंतला देवदास बन्सोड स्मृती वैचारिक पुरस्कार सचिन कुसनाळे  (मिरज) यांच्या विश्ववाद या वैचारिक ग्रंथाला तर आत्मचरित्रासाठी केवळ या वर्षी देण्यात येणारा सुर्यांश पुरस्कार स्व. साजिदा शेख ( चंद्रपूर)  यांच्या तमोल्लंघन या आत्मकथनाला देण्यात येणार आहे. नाटकासाठी अपेक्षित साहित्यकृती प्राप्त न झाल्याने यावर्षी सदर पुरस्कार देण्यात येणार नाही. 

जिल्ह्यातल्या ज्येष्ठ साहित्यिकाला देण्यात येणारा बाबुराव कोंतमवार स्मृती साहित्य सन्मान एकूण साहित्यविषयक योगदानासाठी कवयित्री आणि विचारवंत उषाकिरण आत्राम याना, कलाक्षेत्रातील योगदानासाठी दिला जाणारा डॉ तुकाराम पत्तीवार स्मृती कलायात्री पुरस्कार नाट्यकलावंत  संजय रामटेके आणि नवोदित युवा साहित्यिकाला दिला जाणारा मिलिंद बोरकर स्मृती नवोन्मेष पुरस्कार राहुल दहिवले ( चिरोली) याना प्रदान केला जाईल. नवोन्मेष पुरस्काराव्यतिरिक्त सर्व पुरस्काराचे शॉल, सन्मानचिन्ह, श्रीफळ, सन्मानपत्र आणि रोख राशी असे स्वरूप आहे.  नवोन्मेष पुरस्कार हा कौतुक असल्याने या पुरस्कारात सन्मानचिन्ह, सन्मानपत्र दिले जाते. पुरस्कार निवड समितीत परीक्षक म्हणून डॉ धनराज खानोरकर, डॉ विद्याधर बन्सोड, मो बा देशपांडे, किशोर जामदार, विवेक पत्तीवार, दीपक शिव, अर्जुमन बानो शेख, भारती लखमापुरे आणि गीता रायपुरे यांनी सहकार्य केले. 

सर्व पुरस्कार संस्थेच्या ८ आणि ९ ऑक्टोबरला होणाऱ्या राज्यस्तरीय साहित्य संमेलनात प्रदान केले जाईल. पुरस्कार जाहीर करतेवेळी सूर्यांशचे अध्यक्ष इरफान शेख, सीमा पाटील, तनुजा बोढाले, नीता कोंतमवार, स्वप्नील मेश्राम, गजानन माद्यस्वार, योगेश भलमे यांच्यासह अन्य सदस्य उपस्थित होते. 


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.