महाविकास आघाडी सरकारमध्ये भूकंप
गृहमंत्री बदलाच्या हालचालींना वेग ?
देशमुख यांच्याकडून गृहमंत्रीपदाचा राजीनामा घेतला जाण्याची शक्यता
गृहमंत्री पदासाठी जयंत पाटील यांच्या नावाच्या चर्चा सुरू
कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून सरकार अडचणीत सापडलेलं असल्यामुळे गृहखात्याचा कारभार अनिल देशमुख यांच्याकडून काढून दुसऱ्या नेत्याकडे दिला जाण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांकडून वर्तवली जात आहे.
सचिन वाझे प्रकरणी ठाकरे सरकारमध्ये घडामोडींना वेग आला आहे. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची महत्वाची बैठक यशवंतराव चव्हाण सेंटरला पार पडत आहे त्याच वेळेस मुंबईचे कायदे व्यवस्थेचे सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोहोचले आहेत. दोघांच्या आधी पोलीस उपायुक्त मिलिंद भारंबेनीही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे. भारंबे हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीआधी अनिल परब यांनाही भेटले. म्हणजे एकीकडे राजकीय भेटीगाठी होत असतानाच दुसऱ्या बाजुला मुंबई पोलीस दलातले अधिकारीही मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोहोचत आहेत.
याशिवायच इतर कोणत्या खात्यांमध्ये फेरबदल होतात, हे बैठकांचं सत्र संपल्यानंतरच स्पष्ट होऊ शकणार आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत ठाकरे सरकारमध्ये मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे.
गेल्या काही दिवसांपासून कायदा-सुव्यवस्थेबाबत घडत असलेल्या घडामोडींमुळे राज्य सरकारमध्ये जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. राज्यात मंत्रिमंडळ फेरबदलाचा विचार सुरू असून 'वर्षा' हे मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान या घडामोडींचं केंद्र झालं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ) यांच्या भेटीसाठी महाविकास आघाडीतील दिग्गज नेते 'वर्षा' इथं दाखल होत आहेत.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काही वेळापूर्वीच उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्याआधी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यातही राजकीय खलबतं झाली. आता शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे तसंच परिवहन मंत्री अनिल परब हेदेखील मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत.