भाजीपाला सडतो शेतात, लाखोचे नुकसान
नवेगावबांध दि.14
सध्या कोरोनाव्हायरस चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात व राज्यात लॉक डाऊन व संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्याचा फटकामोठया प्रमाणावर भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांवर बसत आहे. मागील महिन्यात आलेल्या अवकाळी पावसामुळे भाजीपाल्याचे पीक उद्ध्वस्त झाले. तर उरले-सुरले पिक व सावरलेले भाजीपाला उत्पादक आता या कोरोना मुळे त्रस्त झालेले आहेत. दररोज निघणारा माल विकावा कुठे? या संभ्रमात हे शेतकरी आहेत. वांगा, मिरची, टमाटर, भेंडी कारल्या, कोबी, चवळी,कोथिंबीर याचे लागवड सावरटोला, बोरटोला, परसोडी, पांढरवाणी सोमलपुर, गुढरी, देऊळगाव, बोदरा आधी गावात भाजीपाल्याचे नगदी पीक घेतले जाते. लग्न व इतर सार्वजनिक समारंभावर बंदी असल्यामुळे भाजीपाला शेतकऱ्यावर संक्रात आली आहे.लॉक डाऊन मुळे मजूर उपलब्ध होत नाही, त्यामुळे शेतातील भाजीपाला मनुष्यबळाअभावी काढला जात नाही.तो शेतातच सडत आहे.तर दुसरीकडे शेतातून निघणारा भाजीपाला विकायचा कुठे? असा दुसरा प्रश्न भाजीपाला उत्पादक का समोर ठाकला आहे. इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांची सध्या झाली आहे .परिसरात निघणारा भाजीपाला विकण्यासाठी बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी किंवा शीत गृहाची व्यवस्था करावी. अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य व भाजीपाला उत्पादक किशोर तरोणे यांनी केली आहे. शेतातून निघणारा भाजीपाला विकायचा कुठे? असा प्रश्न विविध शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. बाकटी येथील एका शेतकऱ्याने लाखो रुपयाचे वांगे शेता बाहेर फेकल्याची घटना आठ-दहा दिवसांपूर्वी घडली होती. शेतात लावलेला भाजीपाला रोज काढल्या जातो. त्याशिवाय पर्याय नाही. बाजारपेठ उपलब्ध नसल्यामुळे मोठ्या शहरात हा भाजीपाला पाठविला जात नाही. भंडारा, गोंदिया, नागपूर अशा ठिकाणी आतापर्यंत शेतकरी आपला भाजीपाला विकत होते . बाजारपेठा उपलब्ध नसल्यामुळे लॉक डाऊन मुळे वाहतुकीच्या समस्या असल्यामुळे शेतात रोज निघणारा भाजीपाला विकायचा कुठे? असा गंभीर प्रश्न भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. बाजारात 30 ते 40 रुपये किलो विकला जाणारा भाजीपाला आज पाच-सहा रुपये किलोच्या भावाने विकूनही विकत नाही. भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांनाही लाखो रुपये पूर्वी यात गुंतवले आहे भाजीपाल्याचे उत्पादन होऊन विक्रीचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्यामुळे लाखो रुपयांचा आर्थिक फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. स्थानिक पातळीवर किती विकला जाईल? त्यामुळे मोठे संकट व लाखो रुपयाचे नुकसान भाजीपाला उत्पादकांचे होत आहे. भाजीपाला पिकविण्यासाठी लागणाऱ्या वीजेचे तीन महिन्याचे वीज बिल माफ करावे. तसेच एकतर शीतगृहांची व्यवस्था करावी, बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी, शेतकऱ्यांची मालाची उचल शासनस्तरावर केल्या जावी. अशी मागणी परिसरातील भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे.
-संजीव बडोले, नवेगावबांध.जि.गोंदिया.