चंद्रपूर दि.16 मार्च : भारतासारख्या लोकशाही शासनपध्दतीमध्ये 18 वर्षावरील नोंदणी झालेल्या सर्व मतदारांना मतदानांचा हक्क दिलेला आहे. याच मतदानाचा हक्क निवडणुकीच्या कालावधीत बजावण्याची संधी चालुन आलेली आहे. परंतु,आजही अनेक मतदार आपला मतदानाचा हक्क् काही कारणास्तव बजावू शकत नाही. या कारणामध्ये प्रमुख कारण म्हणजे कार्यालयातील व त्या दिवशी नियमित असणारे कामकाज. परंतु, शासनाने आज परिपत्रक काढून 11एप्रिल रोजी मतदानासाठी सुट्टी घोषित केली आहे.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये नवीन मतदारांची संख्या लक्षणिय आहे.म्हणजेच प्रत्येक 18 वर्ष पुर्ण करणारा व्यक्ती लोकशाहीच्या या महामेळाव्यामध्ये मतदान करु शकतो.चंद्रपुर जिल्हयातील 2125 मतदान केंद्रावर चंद्रपूर लोकसभा मतदार संघातील 9,88,904 पुरुष तसेच 9,12,526 महिला असे एकूण 18,91,444 सर्व मतदारांना मतदान करता येणार आहे. यामध्ये कामगार मतदारांनी मतदानाचा हक्क बजावणे अपेक्षित आहे.
कामगार ,अधिकारी,कर्मचारी यांना मतदानांचा हक्क बचावता यावा आणि मतदानापासुन कुठलाही कामगार वंचित न रहावा यासाठी शासन परीपत्रकामध्ये खालील महत्वपूर्ण आदेश देण्यात आलेले आहे.
यामध्ये निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार,अधिकारी,कर्मचारी यांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात येणार आहे.
अपवादात्मक परीस्थितीत कामगार,अधिकारी,कर्मचारी यांना सुट्टी देणे शक्य नसेल तर दोन ते तीन तासांची सवलत देता येईल परंतु, याबाबत संबंधित महापालीका आयुक्त अथवा जिल्हाधिकारी यांची पूर्व परवानगी घेणे आवश्य्क राहील. कोणत्याही परीस्थितीत मतदारांना मतदानासाठी किमान दोन ते तीन तासांची सवलत मिळेल याची दक्षता संबंधित आस्थापना मालकांनी घेणे आवश्यक राहील.
सदर सुट्टी उदयोग,उर्जा व कामगार विभागांतर्गत येणा-या सर्व आस्थापना,कारखाने,दुकाने इत्यादींना लागू राहील. (उदा.खाजगी कंपन्या यामधील आस्थापना,सर्व दुकाने व इतर आस्थापना,निवासी होटेल खादयगृहे,अन्य गृहे,नाटयगृहे,व्यापार,औदयोगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, मॉल्स , रिटेलर्स इत्यादी.)
वर नमुद केलेल्या आदेशांचे मालकांनी,व्यवस्थापनाने योग्य ते अनुपालन होईल याची काटेकोरपणे पालन व्हावे. तसेच मतदारांकडून मतदानाकरीता योग्य् ती सुटी अथवा सवलत प्राप्त न झाल्याने मतदान करणे शक्य न झाल्याबाबत तक्रार आल्यास, त्यांच्याविरुध्द योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असे शासन परीपत्रकात आदेश देण्यात आलेले आहे. तथापि, ही सुट्टी मतदानासाठीच वापरावी ही शासनाने विनंती केली आहे. मतदान करण्यासाठी, यादीत नाव तपासण्यासाठी 1950 या टोल फ्री क्रमांकाची मदत घ्यावी, असे आवाहनही केले आहे.