Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, एप्रिल २९, २०१८

राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा उन्नत भारत अभियानामध्ये समावेश

चंद्रपूर/विशेष प्रतिनिधी:
राजीव गांधी महाविद्यालय चंद्रपूर साठी इमेज परिणाम
भारत सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयातर्फे उच्च शिक्षण क्षेत्राची नाळ ग्रामीण भारतासोबत जोडण्याच्या उद्देशाने उन्नत भारत अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे. मागील वर्षी सुरु झालेल्या या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यामध्ये देशातील IITs व NITs सारख्या मोजक्याच शासकीय संस्थांचा समावेश करण्यात आला होता. 
या वर्षी उन्नत भारत अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये देशातील २५० तंत्रशिक्षण संस्थांची निवडकरण्यात आलेली आहे. संपूर्ण देशातून निवड झालेल्या २५० अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये चंद्रपूर येथील राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा देखील समावेश आहे. गोंडवाना विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांमध्ये उन्नत भारत अभियानात स्थान मिळवणारे हे एकमेव अभियांत्रिकी महाविद्यालय ठरले आहे.
देशातील उच्च शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणारे प्राध्यापक, संशोधक व विद्यार्थी यांना ग्रामीण जीवनातील समस्यांचा अभ्यास करून ग्रामीण जीवनमान उंचावण्यासाठी संशोधन करण्यासाठी प्रेरित करावे या उद्देशाने उन्नत भारत अभियानाची सुरुवात करण्यात आलेली आहे. ग्रामीण जीवनातील सोयीचा अभाव, कष्टप्रद जीवन, शेतीतील अडचणी, बेताची प्राथमिक शिक्षण व्यवस्था यामुळे प्रत्येक दशकात ग्रामीण जनतेचा शहराकडे ओढा वाढत चाललेला आहे. अल्प शिक्षणात शहरामध्ये स्थलांतरित होणारे ग्रामस्थ शहरातील कनिष्ठ उत्पन्न गटातील जीवनमानाचा सामना करतात. अश्या अनेक अडचणींवर दूरगामी उपाय म्हणून ग्रामीण जीवनाचा स्तर उंचावण्याच्या दृष्टीने उन्नत भारत अभियानाची सुरुवात करण्यात आलेली आहे. 
२५ एप्रिल २०१८ रोजी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या दिल्ली येथील मुख्यालयात उन्नत भारत अभियान २.० ची अधिकृत सुरुवात केंद्रीय मानव संसाधन राज्य मंत्री डॉ. सत्यपाल सिंग यांच्या हस्ते करण्यात आली. या प्रसंगी AICTE चे अध्यक्ष डॉ. अनिल सहस्रबुद्धे, पद्मश्री, पद्मभूषण तसेच महाराष्ट्र भूषण श्री. विजय भाटकर यांच्यासह संबंधित अनेक मंत्रालयाचे सचिव देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.उन्नत भारत अभियानामध्ये मानव संसाधन मंत्रालयाच्या सहकार्याला केंद्रीय क्रीडा व युवा मंत्रालय तसेच स्वच्छता व पेयजल मंत्रालय यांचा देखील सहभाग असणार आहे.तंत्रशिक्षणातील विद्यार्थ्यांनी ग्रामीण जीवनातील समस्या जाणून घ्याव्या व अभ्यासक्रमातील प्रकल्प हे ग्रामीण जीवनमान उंचावण्याच्या दृष्टीने तयार करावे असा उन्नत भारत अभियानाचा दृष्टिकोन आहे.
या अभियानामध्ये सुरवात करण्यासाठी राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयाने चंद्रपूर तालुक्यातील ५ गावांची नावे जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगी साठी पाठवली आहेत. उन्नत भारत अभियान २.० चे महाविद्यालय समन्वयक म्हणून प्रा. डॉ. सचिन वझलवार हे अभियानाचे उदघाटन व कार्यशाळेला उपस्थित होते.
या अभियानाच्या प्रत्यक्ष कामाला महाविद्यालय लवकरच सुरुवात करणार असे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. खान यांनी सांगितले.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.