Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, एप्रिल १७, २०१४

मनपाचे अग्निशमन वाऱ्यावर

- गोविल मेहरकुरे
चंद्रपूर - साडेतीन लाख लोकसंख्या असलेल्या शहरातील मनपाच्या अग्निशमन विभागाला रिक्त पदे आणि वाहनांचा आजार जडला आहे. इतकी मोठी लोकसंख्या असताना केवळ तीन वाहने आणि अप्रशिक्षित कर्मचाऱ्यांचा भरणा असल्याने आग विझविताना अक्षरश: तारेवरची कसरत करावी लागत आहे. 

नगर परिषदेचे मनपात रूपांतर झाले. यामुळे मनपाची अग्निशमन व्यवस्था अजून मजबूत होईल, अशी आशा होती. मात्र, मनपा स्थापनेला वर्ष लोटूनही गेल्यावरही अग्निशमन यंत्रणा कोलमडली असल्याचेच चित्र आहे. शहराची लोकसंख्या साडेतीन लाखांच्या घरात आहे. आजूबाजूलाही छोटी-मोठी गावे आहेत. चंद्रपूर आणि आसपासच्या गावी आगीच्या घटना उन्हाळ्याच्या दिवसांत घडतात. मार्च महिन्यात आगीच्या दहा घटना घडल्या. या घटना बघता अग्निशमन वाहनांची संख्या वाढविणे गरजेचे असते. मात्र, ही संख्या कित्येक वर्षांपासून तीनच्या पुढे कधी सरकलीच नाही. या विभागातील कर्मचारीवर्गही प्रशिक्षित नाही. त्यामुळे आगीच्या घटना नियंत्रित आणतेवेळी या कर्मचाऱ्यांची त्रेधातिरपीट उडते, हे आजवरच्या कित्येक घटनांहून स्पष्ट झाले आहे. महानगरपालिका पंचशताब्दी महोत्सवात शहराचा विकास केल्याचा दावा करीत आहे. दुसरीकडे साडेतीन लाख लोकसंख्येच्या मागे तीन अग्निशमन वाहने आहेत. त्यातच अपुरे कर्मचारी यामुळे हा विभागच वाऱ्यावर असल्याचे दिसून येत आहे. वरिष्ठ अधिकारी या विभागात सध्या नाहीत. याच विभागातील वरिष्ठ अधिकारी एम. एन. नन्नावरे हे नगरपालिका असतानाच सेवानिवृत्त झाले. त्यानंतर त्यांच्या जागी कोणताच अधिकारी या विभागाला भेटला नाही. नगरपालिका असताना अग्निशमन यंत्रणेचे कार्यालय त्याच कार्यालयाखाली होते. मात्र, या विभागासाठी आता स्वतंत्र कार्यालय पाण्याच्या टाकीसमोर उभारण्यात आले आहे. या विभागात कर्मचारी आणि अग्निशमन वाहने कमी असल्याने हे कार्यालयदेखील ओस पडले आहे. चंद्रपूर शहराचे क्षेत्रफळ मोठे आहे. आसपासच्या तालुक्‍यात घडणाऱ्या आगीच्या घटनांवर नियंत्रण मिळविण्यासाठी येथून वाहने पाठविली जातात. त्याचदरम्यान शहरात आगीच्या घटना घडल्या. मनपाकडे पर्यायी व्यवस्थाच नसते. त्यामुळे वाहन आणि कर्मचाऱ्यांची संख्या न वाढविल्यास मोठ्या संकटांना तोंड द्यावे लागण्याची शक्‍यता आहे. 

एक वाहन अन्‌ चार कर्मचारी 
आगीची घटना नियंत्रणात आणण्यासाठी चार कर्मचाऱ्यांची आवश्‍यकता असते. मात्र, या विभागात कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे वाहकासोबत दोन कर्मचाऱ्यांना जावे लागते. त्यामुळे आग विझविताना कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. 

वाहनांची संख्या कधी वाढणार? 
साडेतीन हजार लोकसंख्येच्या शहराचे तीन झोन पडतात. प्रत्येक झोनमध्ये दोन अग्निशमन वाहने दिल्यास सहा वाहने व कार्यालयात दोन, अशा आठ वाहनांची गरज आहे. 

हवे प्रशिक्षित कर्मचारी चंद्रपूर अग्निशमन विभागात जवळपास तीस कर्मचारी आहेत. मात्र, यातील बहुतांशी कर्मचारी प्रशिक्षित आहेत. साऱ्यांनाच प्रशिक्षणाची गरज आहे. तसेच नवीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, असा सूर आता उमटत आहेत. 

हेल्पलाइनवर शिव्यांचा मारा
आगीच्या घटनांची माहिती देण्यासाठी 101 हा हेल्पलाइन क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. दिवसभर या क्रमांकावर 40 ते 50 दूरध्वनी येतात. अनेकजण चुकीची माहिती देऊन शिव्या देतात. आग लागली नसतानाही माहिती देतात.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.