Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, जानेवारी २६, २०१४

चंद्रपुरात गुरुवारपासून बाल साहित्य संमेलन

चंद्रपूर : लोकमान्य टिळक स्मारक समितीतर्फे बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे स्मृतिप्रीत्यर्थ शहरात पहिल्यांदाच ३0 जानेवारी ते १ फेब्रुवारीपर्यंत बाल साहित्य समेलनाचे आयोजन करण्यात आले.
 लोकमान्य टिळक विद्यालय (सिव्हील लाईन) येथे आयोजित समेलनाच्या अध्यक्षपदी सुप्रसिध्द लेखक (बिर्‍हाडकार) अशोक पवार होते.
आपल्या संस्कृतीची, साहित्याची आवड तसेच त्याबद्दलची माहिती बालवयापासूनच व्हावी. महाराष्ट्रातील संतश्रेष्ठ, कवी, लेखक यांच्या साहित्याचा प्रभाव त्यांच्यावर व्हावा . व यातूनच त्यांच्यात वाचनाची गोडी निर्माण व्हावी, या हेतूने बाल सम्मेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार ३0 जानेवारीपासून सुरू होणार्‍या या साहित्य संमेलनानिमित्त दुपारी ३ ते ४.३0 वाजेपर्यंत संपूर्ण नगरात ग्रंथदिंडी काढण्यात येणार आहे. त्यानंतर सायंकाळी ५.३0 वाजता डॉ. शरदचंद्र सालफळे यांच्या हस्ते सम्मेलनाचे उद््घाटन होणार आहे. यावेळी स्वागताध्यक्ष डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार, प्रमुख पाहुणे जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, रा.स्व.संघाचे मुख्य कार्यवाह अँड. रवींद्र भागवत उपस्थित राहणार आहेत. शुक्रवार ३१ जानेवारीला सकाळी ९ वाजता पाहिल्या सत्राला सुरवात होणार असून यामध्ये हिंदी व इंग्रजी भाषेत कथाकथन व कविसम्मेलन आयोजित करण्यात आले आहे. अध्यक्षस्थानी डॉ. सुनीता बन्सोड राहणार आहेत. सकाळी ११ वाजता 'कसा मी? असा मी' या विषयाला अनुसरुन सुप्रसिद्ध लेखक, कवी,नाटककार डॉ. राजन जयस्वाल तसेच नाट्य कलावंत व दिग्दर्शक प्रा. जयश्री कापसे-गावंडे यांची प्रगट मुलाखत आयोजित करण्यात आली आहे. तिसर्‍या सत्रात दुपारी १.४५ वाजता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी 'आधुनिक काळात वाचन संस्कृती लोप पावत चालली आहे का? या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले असून अध्यक्षस्थानी डॉ. परमानंद बावनकुळे राहणार आहेत. सत्र ४ दुपारी ३.१५ वाजता शिक्षकांकरिता कविसंमेलन आयोजित करण्यात आले असून याचे अध्यक्षस्थानी डॉ. पद्मरेखा धनकर वानखेडे भूषविणार आहे. दुपारी ४.३0 पासून सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
शनिवार, १ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता मराठी व संस्कृत या भाषेत कथानिर्झर सादर करण्यात येणार असून अध्यक्षस्थानी मो. बा. देशपांडे राहणार आहे.
सकाळी १0.१५ वाजता 'काव्यफुलोरा' या कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले असून अध्यक्षस्थानी इरफान शेख राहणार आहे. तिसर्‍या सत्रात दुपारी १२.३0 वाजता 'मोबाईल आणि संगणक यामुळे मी व माझ्या घरातील संवाद संपला आहे काय?' या विषयावर आधारित परिसंवादाचे आयोजन करण्यात आले असून अध्यक्षस्थानी डॉ. इसादास भडके राहणार आहे. दुपारी १.४५ वाजता गीतगंगेचे आयोजन करण्यात आले असून दुपारी ३.३0 पासून समारोप सत्राला प्रारंभ होणार आहे. या सत्रात प्रमुख पाहूणे म्हणून जिल्हा परिषदेच्या कार्यपालन अधिकारी संपदा मेहता व प्रमुख वक्ते डॉ. शाम मोहरकर उपस्थित राहणार आहेत. या बाल साहित्यसंमेलनाला जिल्ह्य़ातील साहित्यप्रेमींनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे ,असे आवाहन लोकमान्य टिळक स्मारक समितीचे उपाध्यक्ष अँड. चंद्रकांत देशमुख, सहसचिव दत्तप्रसन्न महादाणी, कोषाध्यक्ष श्रीपाद मुनगंटीवार, प्राचार्य आर.पी.राठोड, मुख्याध्यापक अर्चना रोडे व रश्मी कावडकर यांनी केले आहे

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.