Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, मार्च २६, २०१२

कवी ग्रेस

कवी ग्रेस (वय ७३) यांचे कर्करोगाने सोमवारी खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुली एक मुलगा असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर नागपूर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

नागपूरला येथे इंग्रजी विषयाचे प्रा. त्याचबरोबर सौंदर्यशास्त्र हा विषय त्यांनी शिकवला. सुमारे अडीच वर्षांपूर्वी त्यांना घशाचा कर्करोग झाल्याचे निदान झाले. त्यावर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर तो कर्करोग बरा झाला. परंतु काही महिन्यांपूर्वी कर्करोग त्यांच्या पोटात पसरल्याचे लक्षात आले. सुमारे सहा महिने मंगेशकर रुग्णालयात ते उपचार घेत होते. 'ओल्या वेळूची बासरी' हे त्यांचे पुस्तक नुकतेच मंगेशकर रुग्णालयात प्रकाशित झाले. त्यांनी ई-मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले होते. या दोन कार्यक्रमांच्या वेळी पुण्यातील काव्यप्रेमींची त्यांची शेवटची भेट ठरली. त्यांच्या 'वाऱ्याने हलते रान' या ललित लेखाच्या पुस्तकाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला होता. तो स्वीकारण्यासाठी ते दिल्लीलाही जाऊन आले होते.
अत्यंत मनस्वी आणि आत्ममग्न कवी असल्याने त्यांनी कधीच कुठल्याही काव्यसंमेलनाला जाणे पसंत केले नाही. 'संध्याकाळच्या कविता' हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह १९६७ मध्ये प्रसिद्ध झाला. त्यानंतर 'राजपुत्र आणि डार्लिंग', 'चंद्र माधवीचे प्रदेश', 'सांध्यपर्वातील वैष्णवी', 'सांजभयाच्या साजणी' हे काव्यसंग्रह काव्यप्रेमींना आवडत गेले.
कवी ग्रेस यांच्या काव्याइतकीच मोहिनी त्यांच्या ललित लेखनानेही वाचकांच्या मनावर घातली आहे. 'चर्चबेल' हा त्यांचा पहिला ललित लेख संग्रह १९७४ मध्ये प्रकाशित झाला. त्यानंतर 'मितवा', 'संध्यामग्न पुरुषाची लक्षणे', 'मृगजळाचे बांधकाम', 'वाऱ्याने हलते रान', 'ओल्या वेळूची बासरी' हे त्यांचे ललित लेख संग्रह प्रसिद्ध झाले आहेत.
आशयघन कवितेने गेली अनेक दशके रसिकांच्या मनावर गारुड करणारे ज्येष्ठ कवी ग्रेस ऊर्फ माणिक गोडघाटे यांना यंदाचा (2011) साहित्य अकादमी पुरस्कार आज जाहीर झाला. "वाऱ्याने हलते रान' या त्यांच्या ललितबंध संग्रहाला हा सन्मान लाभला आहे.
देशभरातील 22 साहित्यिकांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार असून, त्यात ग्रेस हे एकमेव मराठी साहित्यिक आहेत.

त्यांच्याशिवाय कोकणीतील "प्रक्रितीचो पास' या काव्यसंग्रहासाठी मेल्विन रॉड्रिग्ज, इंग्लिशमधील "इंडिया आफ्टर गांधी' या साहित्यकृतीसाठी रामचंद्र गुहा यांनाही सन्मानित करण्यात येणार आहे.
"संध्याकाळच्या कविता', "राजपुत्र आणि डार्लिंग', "सांध्यपर्वातील वैष्णवी', "चंद्रमाधवीचे प्रदेश', "सांजभयाच्या साजणी' हे काव्यसंग्रह; तसेच "चर्चबेल', "मितवा', "संध्यामग्न पुरुषाची लक्षणे', "मृगजळाचे बांधकाम', "वाऱ्याने हलते रान,' "कावळे उडाले स्वामी' हे ग्रेस यांचे ललितबंधसंग्रह प्रसिद्ध आहेत.

गेली 45 वर्षे अखंड काव्यसाधना करणारे ग्रेस यांच्या शब्दकळेने ज्याला मोहित केले नाही, असा काव्यरसिक विरळा. "ती गेली तेव्हा रिमझिम...', "पाऊस कधीचा पडतो...,' "घर थकलेले संन्यासी'पासून ते "भय इथले संपत नाही'पर्यंतच्या त्यांच्या अनेकानेक गीतांनी मराठी माणसावर गारुड केलेले आहे. अनोख्या प्रतिमा, वेगळी प्रतीके यांची अद्भुत गुंफण करीत, नाद-लयीची पैंजणे लेऊन येणारी ग्रेस यांची कविता आशयाच्या, अर्थांच्या अशा काही विजांचा साक्षात्कार घडवते की थक्क होऊन जावे. ग्रेस यांचे ललितलेखनही तेवढेच भावगर्भ आहे. कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या "पाच पुतळे'सारख्या कवितेतून डोकावणाऱ्या जातिव्यवस्थेच्या शोकांतिकेबाबत त्यांना थेट सवाल करणाऱ्या ग्रेस यांचे "संध्यामग्न पुरुषाची लक्षणे' आणि "कावळे उडाले स्वामी' यांसारखे ललितबंध संग्रह गाजले आहेत.
"संध्याकाळच्या कविता' हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह "नवे कवी ः नवी कविता' या मालिकेंतर्गत 1967 मध्ये "पॉप्युलर प्रकाशना'तर्फे प्रकाशित झाला. समकालीन कवितेपेक्षा आपली कविता वेगळी आहे, हे ग्रेस यांच्या या पहिल्याच काव्यसंग्रहाने दाखवून दिले. जगण्याच्या व्यामिश्रतेला कवेत घेणारी त्यांची कविता वास्तव, स्वप्न, जाणीव-नेणीव यांची सरमिसळ ग्रेस यांच्या काव्यात आढळते. ईश्वर, मृत्यूचे आकर्षण, भय आदी ही त्यांच्या समग्र लेखनाची आशयसूत्रे म्हणता येतील. नेणिवेतल्या निसर्गप्रतिमा, बालपणाशी आणि आईशी निगडित असलेले व्यक्तिगत भावविश्व यांचे हळुवार शब्दचित्र ग्रेस यांनी मोठ्या कुशलतेने त्यांच्या तरल-तलम कवितांमधून रेखाटले आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.