Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

एतिहासिक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
एतिहासिक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, फेब्रुवारी ०४, २०२१

नरवीर तानाजी मालुसरे

नरवीर तानाजी मालुसरे


  नरवीर तानाजी मालुसरे    


दि. ४  फेब्रुवारी २०२१

फेसबुक लिंक http://bit.ly/36DXXL8
            वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यस्थापनेची प्रतिज्ञा केली. आपल्या काही निवडक सवंगड्यांच्या साथीने महाराजांनी स्वातंत्र्याचा एल्गार पुकारला. त्यांच्या सहकाऱ्यांनी देखील शेवटच्या श्वासापर्यंत स्वराज्य मिळवण्यासाठी लढण्याची शपथ घेतली होती. शिवाजी महाराजांच्या या मौल्यवान सहकाऱ्यांपैकी एक होते तानाजी मालुसरे!

नरवीर तानाजी मालुसरे

जून १६६५ रोजी मोघलांसोबत केलेल्या पुरंदर तहानुसार शिवाजी राजांना कोंढाणा किल्ल्यासह इतर २२ किल्ले मोघलांच्या हाती सोपवावे लागले. या तहामुळे मराठ्यांच्या स्वाभिमानाला कोठेतरी ठेच पोचली होती. राजमाता जिजाऊ आईसाहेब देखील या तहामुळे व्याकूळ झाल्या होत्या.

तानाजी मालुसरे म्हणजे शिवाजी महाराजांचे बालपणीचे मित्र आणि महाराजांच्या अतिशय विश्वासातील साथीदार. महाराजांच्या प्रत्येक संकटाच्या काळात तानाजींनी मोलाची साथ दिली होती. सुरुवातीला जेव्हा महाराजांनी किल्ले हाती घेण्याची मोहीम चालवली होती तेव्हा प्रत्येक मोहिमेत तानाजी आघाडीवर होते. ऐतिहासिक अफजल खान वधाच्या वेळी देखील तानाजींनी असीम शौर्य दाखवले होते.
शाहिस्तेखानचा फडशा फाडण्यासाठी जेव्हा महाराज १०-१२ विश्वासू साथीदारांना घेऊन लाल महालात घुसले होते त्या १०-१२ जणांमध्ये देखील तानाजी मालुसरे यांचा समावेश होता. शिवाजी महाराजांनी तानाजींचा पराक्रम प्रत्येक वेळेस जवळून पाहिला होता त्यामुळे कोंढाणा फत्ते करण्याचा पराक्रम केवळ तानाजी करू शकतात याची त्यांना खात्री होती.तानाजी हे बारा हजार हशमाचे (पायदळ) सुभेदार होते. त्यांना पालखीचा व पांच कर्ण्यांचा मान होता. जेव्हा शिवाजी महाराजांनी तानाजींना तातडीने बोलावणे धाडले तेव्हा तानाजी उमरठे गावात आपल्या मुलाच्या रायबाच्या लग्नाच्या तयारीत व्यस्त होते. परंतु आपल्या राजाचे बोलावणे आल्याबरोबर हातची सर्व कामे सोडून त्यांनी थेट राजांची भेट घेतली.
त्यांच्या सोबत शेलारमामा आणि बंधू सूर्याजी देखील होते. महाराजांनी आपला मनसुबा तानाजींना बोलून दाखवताच तानाजी धन्य झाले. महाराजांनी अत्यंत कठीण प्रसंगावेळी आपली आठवण काढली या पेक्षा मोठे भाग्य ते काय या विचाराने त्यांची छाती गर्वाने फुलून गेली.त्यावेळेस शेलार मामांनी सांगितलें की,आधी लग्न उरकून घेऊ. मग कामगिरीसाठी निघू.तेव्हा तानाजींनी उत्तर दिले, आधी लगीन कोंढाण्याचे मग लगीन रायबाचे महाराजांची भेट घेतल्यावर तानाजी जिजाऊ आईसाहेबांना जाऊन भेटले. जिजाई आईसाहेबांनी देखील तानाजींना यशस्वी होण्याचा आशीर्वाद दिला. तानाजींनी आपला मुलगा रायबाची जबाबदारी शिवाजी महाराजांच्या हाती दिली आणि म्हटलें की,जर कोंढाण्याहून परत आलो तर मी त्याचे लग्न लावून देईन, जर मेलो तर तुम्ही त्याचे लग्न लावून द्या.
माघ वद्य अष्टमीला ४ फेब्रुवारी १६७० रोजी रात्री तानाजी मालुसरे यांच्या नेतृत्वाखाली राजगडावरुन निघालेले मराठा सैन्य गुंजवणी नदी पार करत सिंहगडाच्या पायथ्याला येउन पोचले. सिंहगडावर उदयभान नावाचा अतिशय शूर सरदार तैनात होता. हा उदयभान मूळचा राठोड रजपूत होता पण पुढे बाटून मुसलमान झाला होता. त्याच्या हाताखाली रजपूत सैन्य देखील बरेच होते.
तानाजी आपल्या सैन्यासह गडाच्या कल्याण दरवाज्याखाली आले. रात्र बरीच झाली होती. सगळीकडे काळाकुट्ट अंधार होता. तानाजींनी कोंढाण्यावर जाण्याचासाठी एक मार्ग निवडला,  तो म्हणजे शत्रूच्या ध्यानीमनी न येणारा प्रचंड असा द्रोणगिरीचा कडा! हा कडा उभा तुटलेला होता. त्यास साखळी, दोराची शिडी लावून तटावर चढता येणे शक्य होते.
तानाजींनी आपली यशवंती घोरपड घेऊन तिच्या कमरेस साखळी बांधून तिला ठरविलेल्या कड्याच्या वर चढविले खरे, परंतु घोरपड माघारी आली. जणू ती पुढे घडणाऱ्या अशुभ प्रसंगाविषयी तानाजींना संकेत देत होती. परंतु त्या संकेताकडे दुर्लक्ष करीत तानाजींनी आपल्या साथीदारांसह किल्ल्यावर प्रवेश केला आणि शत्रू सैन्याला कात्रीत पकडले.
पुढे दरवाजावर आपले लोक असावेत म्हणून तानाजींनी पुणे बाजूकडील पहिल्या दरवाजावर जाऊन तेथील पहारेकर्‍यांवर अचानक हल्ला केला त्यांना कापून काढले.
दरवाजा ताब्यात घेतल्यावर दुसर्‍या व तिसर्‍या दरवाजांवर जाऊन तेथील पहारेकऱ्यांना यमसदनी पाठवून ते दरवाजे देखील ताब्यात घेतले. या अनपेक्षित गडबडीमुळे किल्ल्यावरील शत्रूची फौज जागी झाली. एव्हाना उदयभान देखील भानावर आला आणि त्याने सैन्य जमवण्यास सुरुवात केली. गडाचा सरनोबत सिद्दी हलाल हा सर्वप्रथम तानाजींना सामोरे गेला. दोघांमध्ये तुंबळ युद्ध झाले आणि त्यात सिद्दी हलाल पडला.
ज्या साखळदंडाच्या सहाय्याने मराठे सैन्य गडावर चढत होते, तो तुटल्याने सर्वजण सुर्याजीच्या नेतृत्वाखाली गडाच्या कल्याण दरवाज्याजवळ जमले आणि दरवाजा उघडण्याची वाट पाहू लागले.
तानाजी हळूहळू कल्याण दरवाज्याकडे सरकत होते. इतक्यात उदयभानाने सर्व शक्तीनिशी तानाजींवर हल्ला केला. रात्रीचा प्रवास, किल्ल्यावर चढाई-हल्ला आणि मुख्य म्हणजे मोहीम फत्ते करण्याचे दडपण या गोष्टींमुळे तानाजी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या खचले होते. याउलट उदयभान मात्र ताजातवाना होता.
उदयभानाच्या जोरदार हल्ल्यामुळे तानाजींच्या शरीरावर जखमा झाल्या त्यांची ढाल देखील तुटली, परंतु अश्या परिस्थितीत हार न मानता शेल्याने आपला हात बांधून त्यावर ते उदयभानाचे वार झेलीत होते. परंतु नियतीला जणू तानाजींचा हा प्रकाराम बघवत नव्हता आणि उदयभानाच्या एका जबरदस्त वाराने त्यांच्या प्राणांचा ठाव घेतला आणि तानाजी धारतीर्थी पडले.
पण मरता मरता त्यांनी असंख्य शत्रूंना कापून काढले आणि आपल्या मावळ्यांसाठी पुढील वाट मोकळी करून दिली होती. आपले सुभेदार पडल्याचे पाहूनही ८० वर्षांचे शेलारमामा खचले नाहीत, त्यांनी नेतृत्व आपल्या हाती घेतले आणि त्वेषाने लढत ते कल्याण दरवाज्यापर्यंत येऊन पोचले. दरवाज्याजवळ पोचताच त्यांनी तेथील पहारा कापून बाहेर असलेल्या सूर्याजीला आणि इतर मावळ्यांना आत घेतले.
सैन्याचा धीर खचू नये म्हणून तानाजी पडले ही वार्ता शेलार मामांनी मुद्दामच गुप्त ठेवली आणि पुढे सूर्याजीने उदयभानासह त्याच्या संपूर्ण सेनेचा फडशा पाडीत कोंढाणा ताब्यात घेतला. एका रात्रीत मराठ्यांनी स्वराज्याचे मौल्यवान रत्न ताब्यात घेतले. सूर्याजीने गवताच्या गंजीस आग लावून पाच तोफा केल्या, त्या महाराजांनी ऐकल्या. गड सर झाल्याचा तो संकेत होता.
महाराजांना अत्यानंद झाला. पण जेव्हा त्यांना बातमी कळली की त्यांचा सिंह तानाजी मात्र लढता लढता मेला तेव्हा मात्र त्यांना अश्रू अनावर झाले नाहीत आणि त्यांच्या तोंडून तानाजींबद्दल ते ऐतिहासिक गौरवोद्गार निघाले, गड आला पण स्वराज्याचा सिंह गेला
धन्य ते तानाजी आणि धन्य त्यांचा पराक्रम!!!

🥀ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* ☜♡☞
🎖 माहिती सेवा ग्रूप, पेठवडगाव  🎖       

मंगळवार, जानेवारी ०५, २०२१

दांडपट्टा

दांडपट्टा

दांडपट्टा.
मराठ्यांचं सर्वात आवडीचं हत्यार. याची भेदकता तलवारीहुन जहाल. उभ्या हिंदुस्थानात या शस्त्रावर मराठ्यांइतके नियंत्रण कोणाचेच नाही. मुघल राजपुत लोकांमध्येही हे हत्यार असायचे. पण मराठे यात जास्त कुशल अन तरबेज होते. पट्टा फ़िरवणे मोठे कौशल्याचे काम आहे. खुप कसब आणि अभ्यास असलेला माणुस पटटा व्यवस्थित फ़िरवु शकतो. 

पुर्वीचे मावळे १६ हात लांब पट्टाही वापरत, याला बेल्टप्रमाणे कंबरेभोवती गुंडाळले जाई, सय्यद बंडाला जिवा महालाने १६ हात लांबून कलम केले होते. छोट्याश्या लिंबाचे दोन तुकडे पट्ट्याने होतात. आपण मराठीत पटाइत हा शब्द वापरतो. म्हणजे तरबेज. मुळात पट्टे चालवण्यात वाकबगार असलेल्या लोकांना पटाईत असे म्हणले जाते. तोच शब्द पुढे आपल्या बोली भाषेत रुढ झाला. 

मराठी हशमांमध्ये एक म्हण होती "धारकरी " म्हणजे जे व्यक्ती तलवार, भाला तीर कमान अथवा अजुन काही अशा ४-५ हत्यारांमध्ये तरबेज असली की त्यांना "धारकरी" गणले जायचे. अन् अजुन एक म्हण होती की "दहा धारकरी तर एक पट्टेकरी " यावरुनच पटाईताला काय मान असेल हे लक्षात येते. पट्ट्याची लांबी ५ फ़ुट असते. त्याचे पाते ४ फ़ुट असुन त्याची मुठ म्हणजे खोबळा साधारण १ फ़ुटाचा असतो. त्याचे पाते लवचिक असते. पण लवचिक असले तरी याच्या कौशल्याने केलेल्या वाराने उभा माणुस चिरला जावु शकतो. गर्दन देखील कटू शकते. पट्टा चालवणारा जणु काही आपल्या भोवती १० फ़ुटांचा पोलादी घेर उभा करतो. 
यात प्रवेश केल्यावर साक्षात मृत्यूच. दोन्ही हातात पट्टा. घेणारा पटाईत हा अतिकुशल समजला जातो. याचे कौशल्य अन प्रहार क्षमता साहजिकच दुपट असते. याची काही वैशिष्ट्ये आहेत. म्हणजे याचे पाते जरी लवचिक असले तरी पण याची वार करण्याची तलवारीपेक्षा क्षमता जास्त का ? मुख्य कारण आहे आपण तलवार फ़िरवताना सगळा जोर आपल्या मनगटातुन लावत असतो. पण प्रत्यक्षात पट्टा फ़िरवताना आपला पुर्ण हात आपला दंड, खांदे आणि विंग्ज चा भाग या सर्व अवयवांतूून ताकद लागलेली असते. पाते लवचिक असले तरी जर वार करताना पाते लपकले नाही. अन वार सरळ झाला तर सरळ एक घाव दोन तुकडे होतात...

शुक्रवार, जून २६, २०२०

शुर योध्दा प्रयागजी प्रभु

शुर योध्दा प्रयागजी प्रभु

औरंगजेबाला जेरीस  आणणारा किल्लेदार प्रयागजी प्रभू 

मोगल म्हणजे भोंगळ! आणि औरंगजेब म्हणजे त्यांचा बादशहा! दख्खन जिंकण्याकरिता त्याने केवढा पसारा मांडला होता! लाखो माणसं, हजारो घोडे, अमाप धान्य, अलोट खजिना, तंबू, दारुगोळा, जनावरं, कापड.. अश्श्याला तोटा नव्हता; 
फेसबुक लिंक http://bit.ly/2S1jOrY
फक्त अकलेचाच दुष्काळ होता आणि म्हणूनच वर्षानुवर्ष मराठ्यांच्या मागं धावून सुद्धा शेवटी त्याच्या हाती आली गोळाबेरीज भोपळाच! औरंगजेबाच्या गबाळ्या कारभाराचा फायदा मराठे मात्र भरपूर घेत होते. लुटायला, बनवायला आणि खेळवायला यांना कसं अगदी मनाजोगं गिऱ्हाईक मिळालं होतं!
सातारा व परळी या सुभ्याचा अंमल फार पूर्वीपासून एक कणखर छातीचा व अतुल निष्ठेचा स्वराज्य सेवक पहात होता. प्रयागजी प्रभू हे त्यांचं नाव; तसं संपूर्ण नाव प्रयागजी अनंत फणसे पण मावळे आदरानं सुभेदार म्हणत. छत्रपती शिवरायांच्या बालपणापासून ते स्वराज्यात इमानाने चाकरी करीत होते. महाराजांनी शक्तीयुक्तीची लगबग उभ्या हयातभर त्यांनी पहिली होती. अनुभवांची धार त्यांच्या कर्तबगारीला विलक्षण चढली होती. वय सत्तरीला टेकलं होतं, पण गर्दन विट्यासारखी बुलंद होती! नजरसुद्धा अशीच सांगेसारखी तिखट; एक केस काही डोक्यावर काळा राहिला नव्हता; पण म्हातारा समशेरीला असा काही जरबवान होता की तरण्याताठ्यांनाही वाचकावं! सुभेदारांवर छत्रपतींची नजर मोठी मोह्बतीची होती आणि ते स्वाभाविकच होतं. सुभेदारांसारखा अश्राफाचा सरदार गेली पन्नास वर्षे दौलातीशी आदाब बजावून होता.
 सातारच्या किल्ल्याकडे औरंगजेबाची फौज फिरताच प्रयागजी ताबडतोब किल्ल्यावर पोहोचले. चहूबाजूंनी किल्ल्याला मोर्चे लागले, खुद्द औरंगजेब जातीने उत्तरेस असलेल्या करंजगावाजवळ मोर्चांवर उभे राहिला. शहजादा अजीम गडाच्या पश्चिम बाजूस शहापूर येथे फौज घेऊन होता. औरंगजेबाच्या तोफखान्याचा प्रख्यात सरदार तबियतखान गडाच्या पूर्वेस तर दक्षिण बाजूस शिरजीखानास नाकेबंदीस ठेवले होते. वेढा इतका आवळून घातला होता की आतला माणूस बाहेर किंवा बाहेरच माणूस गडावर जाऊ शकत नव्हता.प्रयागजी गडावरून ही परिस्थिती पहात होते, त्यांनीही भराभर तोफा बुरुजांवर चढवल्या, गस्त ठेवून गड जागता ठेवला. होते किती हशम वर! अवघे पाचशे! परंतु दहा हजारांची दुष्मनगिरी ते केवळ पायधुळीशी तोलीत होते.
मोगलांचे हल्ले चालू झाले. तोफा गर्जू लागल्या, वर डोंगर छाती काढून तोफांचे गोळे झेलीत होता. मोगलांच्या छावण्यांवर अकस्मात चालून जाऊन ओरबडे काढण्याचे काम रात्री बेरात्री सुभेदारांनी बेकादार चालू ठेवलं होतं. पंतप्रतीनिधी परशराम त्र्यंबकांनी साताऱ्याच्या नैऋत्तेला तीन कोसांवरील सज्जनगडावर मुक्काम ठोकला. वेढ्याला दोन महिने लोटले तरी प्रयागजी रेसभर ढळले नव्हते; पण गडावरच धान्य कमी होत होतं. गडाची परिस्थिती ओळखून असलेल्या पंतप्रतिनिधींनी आपला मुतालिक शहजादा आजींकडे पाठवला.गड लवकरच खाली करतो सांगून थोडेबहुत धन्य पोहचवण्याची सवलत मागून घेतली. पंतप्रतिनिधींनी तीन महिने पुरेल इतकं ‘थोडं’ धान्य गडावर गुपचूप पोहोचतं केलं! धान्यासोबत तोंडी लावायला दारुगोळाही गडावर चढला!
मराठे आज गड खाली करतील, उद्या करतील अशी अजीम आशा करीत होता परंतु जेव्हा प्रयागजी सुभेदारांनी वरून तोफांचा दणका सुरु केला तेव्हा मात्र शहजादा अजीम खडबडून जागा झाला. दिवसामागून दिवस लोटत होते, गड काही मिळेना! शेवटी अजीमने काहीही करून तटाखाली सुरुंग ठासायचा बेत केला. तबियतखानच्या मदतीने त्याने उत्तर तटबंदीवरच्या मंगळाई बुरुजाजवळ कणखर पहाडात सुरुंग खोदण्याचे काम गुप्तरीतीने चालू केले; थोडे थोडे अंतर ठेवून अंधारात चोरून मारून तीन मातबर सुरुंग खोदण्यास सुरुवात झाली. वेढा दिल्यापासून साडेचार महिने लोटले होते; शहजादा अजीमने आता काय करामत केली आहे हे पाहण्यासाठी औरंगजेबाला बोलावले. 
औरंगजेब आपल्या छावणीतून करामत पाहण्यासाठी निघा, आरसपानी अंबारीत तो बसला, मागेपुढे लवाजमा मातबर होता. उन्तावरच्या नौबती आघाडीवर झाडत होत्या, ताशे मर्फे तडाडत होते; शिंगांच्या लकेरीवर लकेरी उठत होत्या, चोपदार मोठमोठ्याने अल्काब गर्जत होते, हि टोलेजंग मिरवणूक किल्ल्याकडे निघाली. गस्तीवरील मराठ्यांनी हि नवीनच भानगड पहिली; प्रयागजी सुभेदारही तटावर ही गंमत पाहण्यासाठी आले. तटाखालील पहाडाला सव्वा सव्वा हात खोलीचे सुरुंग ठासून तयार ठेवलेले होते, प्रयागजींना या बनावाची अजिबात कल्पना नव्हती. बादशहा आला; निरनिराळ्या फौजेच्या तुकड्या अंतरा अंतरावर दबून सज्ज झाल्या. लांबवर नेलेल्या सुरुंगाच्या वातींना बत्ती देण्यात आली. तिन्ही वाटी पेटल्या, पण त्यातील एक वात सर्रर्र सर्रर्र करीत झपाट्याने पेटत गेली; दुसऱ्या वाती रेंगाळल्या.
पहिला सुरुंग उडाला, खडकाचा प्रंचड ढलपा तटासकट अस्मानात उंच उडाला! भयंकर किंकाळ्या फुटल्या, तटावरचे सगळे मराठे अस्मानात फेकले गेले, प्रयागजी सुभेदारसुद्धा किल्ल्याच्या आतील बाजूस मातीच्या ढिगाऱ्यावर उडाले. गडाखाली हल्ला करण्यासाठी सज्ज असलेले चार हजार मोंगल प्रचंड गर्जना करीत खिंडाराकडे धावले. इतक्यात धुमसत राहिल्याने रेंगाळलेल्या दुसऱ्या सुरुंगाच्या वाती सुरुंगाशी भिडल्या. धडाडधडधड! उंच शिळा अस्मानात भिरकावल्या गेल्या, डोंगराकडे धावत सुटलेल्या मोगलांवर अस्मान कोसळल्याप्रमाणे त्या शिळा कोसळल्या.
भयंकर हाहाकार उडाला! 
डोंगरावर पसरलेले दोन हजार मोंगल ठार झाले, हजारे जखमी झाले. हाहाकाराने गोंधळून घाबरून मोगलसेना मागे पळत सुटली. औरंगजेब ही सारी ‘करामत’ पाहून भयंकर चिडला. तो स्वतः पुढे झाला त्याने सर्व फौजेला माघारी फिरवले, उसन्या अवसानाने मोंगलफौज वर चालून जाऊ लागली. मातीच्या ढिगाऱ्यावर पडलेल्या सुभेदारांच्या अंगावर दोन शिळा कोनाड्यासारख्या कोसळल्या होत्या, प्रयागजी आत सुखरूप होते. गडावरचे मराठे ताबडतोब जमा झाले; त्यांनी घाई करून शिळा उचकटल्या व सुभेदारांना बाहेर काढले. ते बाहेर आले ते चिडूनच! त्यांनी सर्वांना वरून मोगलांवर मारा करण्यास फर्मावले. 
मोंगल फौज आता मात्र जी पळत सुटली ती कोणालाच आवरेना. औरंगजेब तणतणत आपल्या मुक्कामावर चालता झाला. अजीम अगदी शर्मून गेला. आपल्या फौजेला डोकं नाही आणि आपणही योग्य त्या सूचना केल्या नाहीत, त्यामुळे आजचा भयंकर संहार उडाला याचे त्याला फारच वाईट वाटले, ‘करामत’ चांगलीच अंगलट आली! आता कसेही करून गड मिळविलाच पाहिजे, नाही तर आहे नाही ती सारी अब्रू जाईल म्हणून शेवटचे पैशाचे खणखणीत हत्यार त्याने उपसले.
पंत प्रतिनिधींनीही प्रयागजींच्या संमतीने रक्कम ठरवली व गड आजींच्या हवाली करण्याचे ठरवले. मराठ्यांचा असे करण्यात दुहेरी फायदा होत असे गड देताना सैन्यासाठी पैसा मिळे व थोड्या दिवसानंतर गडही! प्रयागजींनी गड आजींच्या ताब्यात दिला. 

शुर योध्दा प्रयागजी प्रभु
गड मिळाला एवढाच आनंद औरंगजेबाला डोंगराएवढा झाला. अजीमने गड मिळविला म्हणून गडाला नाव दिले – अजीमतारा !