Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, जानेवारी ०५, २०२१

चंद्रपूर जिल्ह्यातील पत्रकारिता आणि पत्रकार





हाताने खिळे जुळवून त्यावरुन छपाई करून प्रकाशित होणारे वृत्तपत्र आणि त्यानंतर झालेली संगणकीय क्रांती आणि मुद्रण छपाईच्या बदलानंतर आजच्या डिजिटल पत्रकारितेपर्यंतचा बदलता इतिहास चांदानगरीने अनुभवला आहे.


मुहूर्तमेढ
चंद्रपूर जिल्ह्यात माजी मुख्यमंत्री मा. सा. कामवार यांनी वृत्तपत्राची मुहूर्तमेढ रोवली. दादासाहेब अगदी लहानपणापासून संघटक वृत्तीचे होते. त्यांनी पहिल्यांदा फक्तं लोकमान्य हेच दैनिक विकत असले तरी नंतर स्वराज्य, तिलक, वंदे मातरम, यंग इंडिया, मराठी नवजीवन अशी अनेक पत्रक विकत होते. या वर्तमानपत्राच्या माध्यमातून ते असहकार चळवळीचा प्रचार करीत होते आणि ज्यांची वर्तमानपत्र घेण्याची ऐपत नव्हती, त्यासाठी चंद्रपूर येथील गांधी चौकात फळ्यावर देशातील घडामोडी लिहून लोकांपर्यंत संदेश पोहचवत होते. म्हणूनच ते चंद्रपूर जिल्ह्याचे आद्य पत्रकार ठरले. या संघर्षातून ते मंत्री नंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. पेपर विकणारा मुलगा मुख्यमंत्री बनू शकते, हा इतिहास पत्रकारासांठी आदर्शवत आहे. हाच आदर्श माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री शांताराम पोटदुखे यांनी घेतला. बीए व बीजेची पदवी घेऊन शांतारामबापूंनी काही काळ पत्रकारिता केली. दादासाहेब कन्नमवार यांना प्रेरणास्रोत माणून केशवराव नालमवार यांनी महाविदर्भ दैनिक सुरू केले. रामदास रायपुरे यांनी चंद्रपूर समाचार, श्रीधर बलकी यांनी लोकशाही, तर चंपतराव लडके यांनी सन्नाटा हे दैनिक सुरू केले. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दैनिकांच्या आवृत्ती येण्यापूर्वी स्थानिक वर्तमानपत्रांची चलन होती. साप्ताहिक स्वरूपात निघणारे या वर्तमानपत्रांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. त्यामध्ये हे मूल येथून प्रकाशित होणारे बाबुरावजी वरगंटीवार संपादित साप्ताहिक निपटारा, सुरेश धोपटे संपादित चंद्रपूर पत्रिका, राजेंद्र अल्लेवार संपादित चंद्रपूरची डायरी या साप्ताहिक वर्तमानपत्राचे त्याकाळी वाचक अपेक्षेने प्रतीक्षा करीत होते.

दुसरी पिढी
केशवराव नालपवार यांच्या महाविदर्भ तर रामदास रायपुरे यांच्या चंद्रपूर समाचार या वृत्तपत्राने पत्रकारांची शाळा भरविली. पत्रकारितेतील 'अआई' त्यांनी तरुणपोरांना हात धरून शिकविले. त्यांच्या वृत्तपत्रात पेपर वाटणारे बातम्या लिहायला शिकले आणि आज प्रादेशिक वृत्तपत्रात जिल्हा प्रतिनिधी ते संपादक या मोठ्या पदांवर पोहोचले. २००२ च्या काळात दत्तात्रेय पत्तीवार यांनी चंद्रथून नावाचे दैनिक सुरू केले. त्यांना फार काळ तग धरता आला नाही. मात्र, स्थानिक वृत्तपत्राचे कार्यालय कसे असावे, हे दाखवून दिले. पुढे महाविदर्भ ही रंगीत झाले. आज त्यापाठोपाठ इतरही दनिक रंगीत झालेत. आजघडीला साप्ताहिकांची संख्या शेकडोवर गेली आहे. संपादक श्रीकृष्ण चांङक यांचे नागपूरातून निघणारे महासागर ही चंद्रपूरची स्थानिक आवृत्ती गेल्या अनेक वर्षापासून प्रकाशित करीत आहे. सध्या महाविदर्भची धुरा कल्पना पलिकुंडावार, चंद्रपूर समाचारची चंद्रगुप्त रायपुरे, 'सत्राटाची बंडू लडके ही दुसरी पीढी तर चंद्रधूनची जबाबदारी पुरुषोत्तम चौधरी पेलत आहेत.


चंद्रपूर ते नागपूर
प्रा. सुरेश द्वादशीवार, मदन धनकर यांच्यासारख्या अभ्यासू पत्रकारांनी नवा आयाम दिला. द्वादशीवार सर लोकसत्तानंतर लोकमतचे संपादक म्हणून आजही कार्यरत आहेत. चंद्रपुरातून कारकीर्द सुरू करणारे बरीच मंडळी राज्यात विविध ठिकाणी मोठ्या पदावर आहेत. सुनील कुहीकर यांनी 'तरुण भारत मध्ये बल्लारपूर तालुका वार्ताहर ते ते मुख्य कार्यकारी अधिकारी असा मोठा पल्ला गाठून 2020च्या अखेरीस वेगळी वाट धरली. देवेंद्र गावंडे अनेक वर्ष चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी होते. मागील पाच वर्षापासून नागपूर (संपादकीय प्रमुख) ब्युरो चिफ म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा नक्षलविषयक अभ्यास ख्यातनाम आहे.
चंद्रपूरात लोकमतचे जिल्हा प्रतिनिधी राहिलेले आनंद आंबकर यांनी गोंदिया आणि नागपूरात पत्रकारिता केली. सकाळच्या नागपूर आवृतीत सहयोगी संपादक आणि जळगाव आवृत्तीचे निवासी संपादक राहिले. त्यांनीही मागील चार वर्षापासून पत्रकारितेच्या मुख्य प्रवाहातून दूर गेले. तरीही त्यांनी ङिजिटल ऑनलाइन मीङियातून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
'महाराष्ट्र टाइम्स' चे सध्याचे निवासी संपादक श्रीपाद अपराजित यांनी चंद्रपूरात पत्रकारिता केली नसली तरी त्यांचे शिक्षण याच जिल्ह्यातील ब्रह्मपुरीत झाले. लोकसत्तातून प्रारंभ केल्यानंतर त्यांनी सकाळमध्ये वृत्तसंपादक, कार्यकारी संपादक म्हणून काम पाहिले. याच भूमितले प्रमोद चुचुवार यांचे नाव महाराष्ट्राला परिचित झाले. मुंबई, दिल्लीतील पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर त्यांनी टीव्ही-९ ला सहयोगी संपादक म्हणून काम केले. सध्या मुक्त पत्रकार म्हणून राजकीय पत्रकारितेवर सक्रीय लिखाण करतात.

वार्ताहर ते जिल्हा प्रतिनिधी 
प्रादेशिक वृत्तपत्राचे पहिले जिल्हा कार्यालय लोकमतने सुरू केले. तेव्हा भूपेंद्र गणवीर यांनी जिल्हा प्रतिनिधी म्हणून धुरा सांभाळली. त्या पाठोपाठ अन्य दैनिकांनीही जिल्हा कार्यालयांची संकल्पना सुरू केली. त्या आधीच्या काळात फोन किंवा फॅक्सद्वारे नागपूरला बातम्या कळविल्या जायच्या. जिल्हा कार्यालये सुरू झाल्यानंतर खऱ्या अर्थाने वृत्तपत्रांची स्पर्धा सुरू झाली. लोकमतनंतर तरुणभारत, नवभारत या दैनिकांनी जिल्ह्यातील बातम्यांसाठी स्वतंत्र पाने सुरू केलीत. २००२ भूपेंद्र गणवीर हे 'सकाळ'चे निवासी संपादक म्हणून निवृत्त झाले. लोकमतला गजानन जानभोर, तरुण भारतला सुनील कुहीकर, लोकसत्ताला देवेंद्र गावंडे तर नवभारतला प्रकाश शर्मा ही दिग्गज मंडळी होती. पुढे जिल्हा कार्यालयांनी जिल्हा प्रतिनिधीसोबत उपसंपादक, शहर वाताहर अश्या नियुक्त्या होऊ लागल्या. तेव्हा स्थानिक दैनिकात काम करणाऱ्या तरुणांना कामाची संधी मिळाली. त्यातूनच संजय तायडे, आनंद आंबेकर, संजय तुमराम, महेंद्र ठेमस्कर, रविंद्र जुनारकर, प्रमोद काकडे, प्रमोद उदिखाडे, नंदकिशोर परसावार, रवि जवळे, श्रीकांत पेशट्टीवार, मुकेश वाळके, देवनाथ गंडाटे, मंगेश खाटिक, प्रशांत देवतळे, सुशील नगराळे, जितेद्र मशारकर ही मंडळी स्थानिक दैनिकांतून प्रादेशिक दैनिकात आली. अनेक वर्षे पत्रकारितेत योगदान देणारे गजानन ताजणे, अजय धर्मपुरीवार, अरविंद खोब्रागडे याशिवाय अनेकजण आज शासकीय आणि खासगी नोकरीत आहेत. पंकज मोहिरीर यांनी सामना, सकाळ आणि आता महाराष्ट्र टाईम्स या दैनिकात काम करीत आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या अध्ययनातूनच अनेक पत्रकार घडले. सुनील कुहीकर, अरविंद खोब्रागडे, रविंद्र जुनारकर यांनीही पत्रकार घडविण्यासाठी वेळ दिला.
हिंदी- इंग्रजीत योगदान
हिंदी पत्रकारितेत गिरिश खत्री गुरुजींनी मोलाचे योगदान दिले. श्रमिक पत्रकार संघाच्या उभारणीत त्यांचा मोठा वाटा होता. हिंदी वृत्तपत्रात पूर्वी केवळ नवभारत हे दैनिक होते. प्रकाश शर्मा यांच्यानंतर संजय तायडे नवभारतची धुरा पेलत आहेत. लोकमतने हिंदी आवृत्ती सुरू केली, तेंव्हा जिल्हा प्रतिनिधी होते. पुढे दैनिक भास्करमध्ये ते गेल्यानंतर अरुण सहाय रुजू झाले. हिंदीत मुकेश वाळके सारख्या मराठी भाषिक तरुणांनीही मोलाचा वाटा दिला आहे. पूर्वी हितवाद हे एकमेव इंग्रजी दैनिक होते. पूर्वी सुनील देशपांडे व आता त्यांच्याच हाताखालून धडे गिरविणारे कार्तिक लोखंडेसह अंजय्या अनापली नागपुरात मोठ्या पदावर आहेत. मजहर अली यांनी हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेत योगदान दिले. तेलगू भाषिक रमेश कालेपल्ली यांनी गेल्या अनेक वर्षांपासून इंग्रजीत योगदान देत आहेत.


ऑपरेटर ते उपसंपादक 
वृत्तपत्र म्हटलं की, जिल्हा प्रतिनिधीसह उपसंपादक, वार्ताहर आणि पाने लावण्यासाठी ऑपरेटर असतात. एकेकाळ ऑपरेटर म्हणून कारकीर्द सुरू करणारे ही आज स्व-बळावर शिकून वार्ताहर ते उपसंपादक असा प्रवास गाठला आहे. यात रविंद्र जुनारकर (लोकसत्ता), साईनाथ सोनटक्के (सकाळ), साईनाथ कुदनकर (लोकमत, चंद्रपूर) यांचे नाव पुढे येते. 

गाव ते शहर
अनेक शहर वार्ताहर अनुभवाच्या भरवशावर जिल्हा प्रतिनिधी झालेत. मात्र, गावात पत्रकारिता करून पुढे जिल्ह्याच्या स्थानी आलेत. याचीही काही उदाहरणे आहेत. सुनील कुहीकरांनी बल्लारपुरातूनच पत्रकारितेला प्रारंभ केला. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत बल्लापुरात तालुका प्रतिनिधी राहिलेले प्रशांत विघ्नेश्वर यांनी जिल्हा कार्यालयात प्रवेश मिळविला. वर्धा तरुण भारतमध्ये जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम पाहिल्यानंतर ते लोकशाही वार्तांता जिल्हा प्रतिनिधी होते. आता त्यांनी पत्रकारिता सोडली आहे. विसापूर येथे वाताहर राहिलेले राजेश भोजेकर यांनी लोकमतमध्येच शहर वार्ताहर आणि पुढे वर्धा जिल्हा प्रतिनिधी आणि परत चंद्रपूर असा प्रवास केलेला आहे. प्रारंभी साप्ताहिक सुरू करून पत्रकारितेत आलेले गोपालकृष्ण मांडवकर यांनी लोकमतमध्येचं यवतमाळ, वर्धा, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्यातून चंद्रपूरमध्ये जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम पाहिले आहे. चिमूर तरुण भारत तालुका प्रतिनिधी कामाला प्रारंभ करणारे प्रशांत देसाई यांनी ही चंद्रपूर आणि आत भंडारा येथे कार्यरत आहेत. राजुरा येथे तरुण भारतचे वातावर नागेश दाचेवार आता मुंबईचे ब्युरो चिफ म्हणून कार्यरत आहेत. ही उदाहरणे त्यांच्या जिद्दीचे फळ आहे. चंद्रपूरच्या मातीत जन्म घेऊन येथेचं पत्रकारितेचे प्राथमिक धडे घेणारे नागपुरात संपादकपदावर कार्यरत आहेतच. त्यांच्याच पाऊलांवर पाऊल ठेवून याच भूमिची लेकरे नागपूरात स्थायिक झालीत. यात कार्तिक लोखंडे, अंजय्या अनापली, राखी चव्हाण, देवनाथ गंङाटे, अंकुश गुंडावार, इरशाद शेख, मनोज डोमकावळे यांचा समावेश आहे. 
टीव्ही पत्रकार 
पहिला वृत्तवाहिनी पत्रकार म्हणून महेश तिवारी यांनी कामाला प्रारंभ केला. चंद्रपूर आणि गडचिरोली या जुळ्या जिल्ह्यात त्यांनी तत्कालिन इ-टीव्हीसाठी वार्तांकन केले. त्यांच्या पाठोपाठ झी-२४ ताससाठी आशिष अंबाडे, पूर्वी स्टार माझात सुनील तायडे, टीव्ही-९ मध्ये नीलेश डहाट, सध्याच्या एबीपी माझात सारंग पांडे कायरंत आहेत. सकाळचे जिल्हा प्रतिनिधी राहिलेले संजय तुमराम यांनी सामटीव्हीत प्रवेश घेतला. येथील स्थानिक वृत्तवाहिन्यांत सीटी केबल, चंद्रपूर लाइव्ह आणि अन्य केबल न्यूज चैनेलमुळे कॅमरमेन तयार झाले. अनिल, राजू, हैदर आणि अन्य तरुण आज दिसत आहेत. हैदर अली लोकमत news18, अनिल ठाकरे लोकशाही मध्ये दिसू लागला आहे.

महिलांचे योगदान 
पत्रकारितेच्या क्षेत्रात महिलांची संख्या फार कमी दिसते. मात्र, कल्पनाताई पलिकुंडावर आजही महाविदर्भची जबाबदारी त्याच ताकदीने पेलत आहेत. चंद्रपूरात अनेक वर्षांपूर्वी एका महिलेने साप्ताहिक सुरू केले. पुढे श्रमिक पत्रकार संघाने गौरव ही केला. लोकसत्तात राखी चव्हाण, लोकमतला रुपाली टवलारकर, मध्यंतरीच्या काळात वैशाली अलोणे, तुलना येरेकर, नम्रता शास्त्रकार, नम्रता आचार्य, भारती टोंगे या भगिनीनी योगदान दिले.

पत्रकार संघाची नवी इमारत
नागपूर मार्गावरील जुना वरोरा नाका चौकात श्रमिक पत्रकार संघाचे कार्यालय आहे. पूर्वी पत्रकार परिषद घेण्याचे ठिकाण अशी ओळख होती. मात्र, पत्रकारांच्या हक्काचे ठिकाण अशी ओळख झाली आहे. नवनवीन उपक्रम, मीट द प्रेस, इमारतीची रंगरंगोटी, वार्षिक सहल, क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन यामुळे कौटुंबिक नात्याचा गोडावा येथे दिसून येतो. श्रमिक पत्रकार संघासह मराठी पत्रकार संघातर्फे तरुण पत्रकारांना बातम्यामध्ये प्रोत्साहन देण्यासाठी पुरस्कार, तर ज्येष्ठांना त्यांच्या योगदानाबइल सन्मानित केले जाते. आता तर भव्य दिव्य इमारत उभी झाली आहे. 


आज पत्रकारितेने नवी कात टाकली आहे. मुद्रित माध्यमासोबत ऑनलाइन पत्रकारितेने नवीन मुहूर्तमेढ रोवली आहे. कोरोणाच्या काळात वृत्तपत्र वाचक संख्या रोडावल्यानंतर देशभरातील आणि कानाकोपऱ्यातील इत्यंभूत बातमी वाचकांपर्यंत पोहोचविण्याचे काम या डिजिटल मीडियाने केले. म्हणूनच ही नवपत्रकारिता आता पुढे नवीन संधी, नवीन आव्हाने आणि जबाबदारी घेऊन येत आहे. 

......

- देवनाथ गंडाटे, नागपूर
9022576529

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.