Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, नोव्हेंबर २१, २०२०

आदिवासी धर्माच्या शोधात



आदिवासी हिंदू नाहीत. आम्ही हिंदू लिहिणार नाही. जनगणनेत स्वतंत्र धर्म कोड टाका. देशात जनगणना आहे. ते वर्ष २०२१ . दीड महिना बाकी. त्या निमित्ताने नवी मागणी . त्याचे उदघोषकर्ते आदिवासी. ते म्हणतात, जनगणना फार्म बदला. आदिवासींची ही जुनी मागणी. तिने आता जोर पकडला. त्याची सुरुवात केली.  एका राज्य सरकारने.  ते झारखंड सरकार . झारखंड विधान सभेत ठराव आला. एकमताने  तो संमत झाला.  ठराव मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी मांडला. आदिवासींची हिंदू अशी नोंद नको. जनगणनेत वेगळा रकाना करावा .तो धर्म कोड. हा ठराव राष्ट्रपती, जनगणना आयुक्त आदींना पाठविला. विधान सभेत  ठराव चर्चेला आला. भाजप आमदारांनीही पाठिंबा दिला. त्यामुळे एकमताने ठराव झाला. आदिवासी आमदारांचा दबाव होता. त्यापुढे भाजपचे काही चालले नाही.  याच प्रश्नावर यवतमाळतही आदिवासींची  बैठक  झाली. माजी मंत्री शिवाजीराव मोघे, वसंत पुरके यांचा पुढाकार. ही मागणी आता विविध राज्यांतून होत आहे. अ.भा. आदिवासी विकास परिषद सक्रीय झाली. राष्ट्रीय आदिवासी  धर्म समन्वय समितीने जागृती मोहीम उघडली. या मागणीसाठी जतंरमंतरवर धरणे झाली. १८ फेब्रुवारीला आरएसएस प्रमुख मोहन भागवत  झारखंड दौऱ्यावर होते. तिथं जनगणना मुद्दावर बोलले.आदिवासींना हिंदू धर्म लिहिन्याचा सल्ला दिला. त्या विधानाने आग लागली. त्यानंतर  विरोध वाढला. आता  विधान सभेनेच ठराव केला. आदिवासींचा आवाज राज्य सरकारनं उचलला.असं काही  घडेल कोणाला वाटलं नव्हतं. या ठरावानं  देशाच लक्ष वेधलं. पश्चिम बंगालच्या निवडणुका आहेत. तिथं हा आवाज गुंजेल. ही शक्यता आहे. तिथं आदिवासी अनेक मतदार संघात निर्णायक आहेत. त्यांना रिजविण्यास भाजप कामाला लागली. गृहमंत्री अमित शहा दोन दिवस  पश्चिम बंगालात होते. आदिवासी नेत्यांकडे गेले. त्यांच्याकडे जेवले. 



व्यवस्थेचे बळी आदिवासी
आदिवासी व्यवस्थेचा बळी. तो अर्धनग्न. पोट पाठीला भिडलेले. चिप्पाड झालेली शरीरयष्टी . कुपोषित.असं चित्र डोळ्यासमोर येतं. बहुसंख्ये जंगलांच्या सानिध्यात. नागरी सोयींचा प्रंचड अभाव. त्यापैकी काही शिकले. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या आरक्षणाचे लाभार्थी झाले. काही राजकारणात आले. काहींनी नोकऱ्या पत्करल्या. लहानमोठ्या शहरात आले. त्यांची दुसरी पिढी शिकू लागली. ती आता गुरगुरते. भाजप सरकारने जनगणनेची खेळी  केली. सीएए, एनआरसीचा फास  फेकला. त्यावर दिल्ली गाजली. अनेक राज्य अस्वस्थ झालीत. आता आदिवासींनी  वेगळ्या धर्म कोडची मागणी केली. १८७२ ला पहिल्यादा जनगणना झाली.१९४१ पर्यंत ट्रायबल रिजनल कोड होता. त्यात आदिवासी धर्म लिहित.१९६१  मध्ये हिंदु, मुस्लिम, शीख, इसाई, जैन, बौध्द असे सक्षिप्त कोड आले. तरी अन्य धर्म अशी सोय होती. २०११ मध्ये अन्य विकल्प हटविण्यात आले. तेव्हापासून आदिवासींची ही मागणी आहे. बर्थ थेअरी मानणारे धर्म आहेत. ते समानता विरोधी. त्यात ब्राह्मण ,येहुदी आणि पारसी आहेत. येहुदी दुसऱ्या कोणाला होता येत नाही. पारसी कुटूंबात जन्मलेलाच पारसी. तसेच ब्राह्मण कोणाला होता येत नाही. जैन, बौध्द, इस्लाम, ख्रिश्चन कोणालाही होता येते. हे धर्म समानतेला मानणारे आहेत. ते वाढत आहेत.

वनवासीला विरोध

आदिवासींना कोणी वनवासी म्हटले. त्यांना हिंदू  संबोधले. आदिवासींना हे दोन्ही मान्य नाही. तो आपली ओळख शोधतो आहे. तो रावणाला आराध्य दैवत मानतो. आपला आदर्श मानतो. खोटा इतिहास लिहिला. रावणाला बदनाम केल्याचा आरोप करतो. रावण दहनाला विरोध करतो. रावणाची पुजा करतो. रावणात चांगुलपणा शोधतो. वर्णव्यवस्थेच्या विरोधात आवाज उचलतो. एकलव्याचा अांगठा कापणाऱ्या संस्कृतिला विरोध करतो. राक्षस, दानव, पिशाच्च आम्हाला ठरविणारे तुम्ही कोण ? असा प्रश्न करतो. बोगस आदिवासींना विरोध करतो. आपल्या अधिकाराचे, हक्काचे बोलतो. आदिवासी हा मुलनिवासी. त्याला वनवासी बनविण्याचा डाव. त्याचा ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या विरोधात वापर. खटले, पोलिस कारवाईला तुम्ही पुढे जा.  चिथावणी आमची. भोगा तुम्ही. कपडे आम्ही सांभाळतो. हे कावे ओळखतो. मुका आदिवासी आता बोलू लागला. बोलणाऱ्यांना नक्षली ठरविले जाते. पोलिसांच्या गोळीचाही तोच  बळी. ही व्यवस्था बदलण्यासाठी तो भांडतो. त्यालाही विविध जातीत विभागले. तो आदिवासी या नावावर एकत्र येण्यास धडपडतो. स्वतंत्र धर्म कोडची मागणी. हा त्या धडपडीचा भाग होय.बिरसा मुंडा यांचा लढवय्यपणा त्यांना भावला.मुंडा यांनी जल,जमीन, जंगल आदिवासींची हा नारा दिला. त्यासाठी संघर्ष केला. हा संघर्ष अनेक भागात चालू आहे.बिरसा मुंडा यांनी अंधश्रध्दा, जातीभेद, पांखडवादाला विरोध केला. नवी पिढी त्या वाटेने जात आहे.त्यांना वैचारिक बळ देण्याची गरज आहे.


नवे धर्म.......

सनातनी तीन टक्के. ते हिंदूच्या नावावर हिंसाचार करतात. शोषण करतात. प्रगतीत रोडे आणतात. हे ज्यांना कळले. ते समाज बाहेर पडत आहेत. आपली ओळख शोधत आहेत. लिंगायत समाज कर्नाटक व महाराष्ट्रात आपली ओळख शोधतो. हिंदू धर्म नाकारतो. त्या समाजतातील साहित्यिक  विचारवंत कुलबर्गी यांच्यावर गोळ्या झाडल्या जातात. विचार धाक, दमन, दबाव, गोळ्यांनी दाबता येत नाही. लिंगायत धर्म मागणी वाढतंय. नवा शिव धर्म आला. जंगी मेळावे घेत आहे. आदिवासी देशभर विखूरलेला. साडे सात टक्के लोकसंख्या. गरिबीत जगत आहे. त्या समाजाचा स्वाभिमान जागृत झाला. त्याचे हे पडसाद आहेत. जनगणनेत स्वतंत्र धर्म कोडची मागणी एक निमित्त आहे.
-भूपेंद्र गणवीर
............BG................

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.